Sharad Pawar
1.6K views
2 years ago
‘नॅशलिस्ट महिला काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’पक्षाच्या वतीने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित ‘ज्योत निष्ठेची, सावित्रीच्या लेकींची..!’ या महिला मेळाव्यातून उपस्थितांना संबोधित केले. पक्षाचे अध्यक्ष आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे ते श्री. जयंतराव पाटील, खासदार फौजिया खान, खासदार वंदनाताई चव्हाण, श्री. अनिल देशमुख, श्री. राजेश टोपे, श्री. शशिकांत शिंदे, राखीताई जाधव, श्री. नसीम सिद्दिकी, श्री. महेबूब शेख, सक्षणा सलगर आणि आजचा हा पूर्ण सोहळा आयोजित करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्या राज्याच्या राष्ट्रवादीच्या महिलांचे नेतृत्व करणाऱ्या ऍड. रोहिणीताई आणि उपस्थित बंधू भगिनींनो..! पक्षाची उभारणी मजबुतीने करण्याची आवश्यकता आहे, या भावनेने तुम्ही सर्व महिला भगिनी या ठिकाणी आलात. मला आठवतंय की, २५ वर्षांपूर्वी या सभागृहामध्ये राष्ट्रवादीच्या निर्मिती करण्यासाठी ठराव आम्ही केला. या ठिकाणी आम्ही पक्ष स्थापन केला. संध्याकाळी शिवाजी पार्कवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून १ लाखांहून अधिक कार्यकर्ते आले होते. त्या सर्वांनी या पक्षाची धुरा खांद्यावर घेण्याची शपथ घेतली आणि पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने पावले टाकली. आपला पक्ष हा असा पक्ष आहे की, ज्याची स्थापना झाल्यानंतर ३ महिन्यांच्या आत महाराष्ट्राच्या जनतेने सत्तेवर जाण्याची जबाबदारी आपल्यावर सोपावली. अनेक लोक एकत्रित आले. ज्यांनी कधी विचार केला नव्हता, सामान्य कुटुंबातल्या तरुणांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. ५ ते १० वर्षांमध्ये महाराष्ट्राला हे दाखवून दिले की, सामान्य माणसाच्या प्रश्नांची सोडवणूक हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता करतो आणि त्याचे कारण, तुम्हा सर्वांचे सामुदायिक कष्ट घेण्याची जी भूमिका आहे त्यामुळे हे सर्व शक्य झाले. काही विचारधारा आपण स्वीकारली. महात्मा फुले, ज्योतिराव फुले, शाहू राजे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आपल्या सर्वांसमोर आहे. आदर्श याचा अर्थ काय? फक्त फोटो लावणे, भाषणांमध्ये उल्लेख करणे या गोष्टी पुरेशा नाहीत. या महान व्यक्तींनी काय करून दाखवले, आपल्यापुढे आदर्श काय ठेवला आणि त्यामधून आपण समाजाची उभारणी ही कशी करणार आहोत या सर्व गोष्टींकडे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी समाजाचा अशिक्षित वर्ग, ज्यांना सन्मानाने जगण्यासाठी शिक्षित करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले. सावित्रीबाईंनी पुण्याच्या भिडे वाड्यामध्ये मुलींची शाळा काढल्यानंतर विरोध होत असताना सुद्धा त्याची चिंता न करता स्त्री शिक्षणाचा पाया घातला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी आधुनिकता, विज्ञान याचे महत्त्व आणि समाजाची गरिबी घालवण्यासाठी जी काही धोरणे राबवण्याची आवश्यकता आहे, त्यासंबंधीचा आग्रह त्यांनी इंग्रज सरकार समोर ठेवला. देशात इंग्रजांचे राज्य होते आणि ते राज्यकर्ते भारतात यायला निघाले, त्यांच्या स्वागतासाठी इथल्या घटकांनी एक कमान बांधली, ज्याला आपण ‘गेटवे ऑफ इंडिया’ असे संबोधतो. त्या गेटवे ऑफ इंडियाकडे इंग्रज राजाची तुकडी आली आणि ते उतरले. तिथे एक फेटा बांधलेला आणि हातात कागद असलेला एक ग्रामीण भागाचा गृहस्थ उभा होता. राज्यकर्ते बोटीतून उतरले आणि गाडीत बसायला जात असताना त्यांच्या लक्षात आले की, हा कोण माणूस आहे ? हा का उभा आहे आणि म्हणून त्यांनी त्याची चौकशी केली. ती चौकशी केल्यानंतर सांगण्यात आले की, त्यांना एक निवेदन द्यायचे आहे आणि ते निवेदन इंग्रज राजाने स्वीकारले आणि त्यात ३-४ गोष्टींची मागणी होती. एक मागणी होती मुलींच्या शिक्षणाची, दुसरी मागणी होती शेतीवाडी सुधारायची असेल तर पाऊस जो पडतो आणि त्याचे पाणी वाहून जाते त्यातील थेंब ना थेंब कसे साठवता येईल आणि त्यामुळे शेती बागायत कशी होईल आणि उत्पादन वाढेल या प्रकारची, तिसरी मागणी होती की, शेतकऱ्याला जो धंदा हवाय त्यासाठी दुधाचा धंदा वाढायला चांगल्या जातीच्या गाई या अमेरिकेतून इथे आणाव्यात आणि अधिक उत्पादन देण्यासाठी उत्पन्न वाढीसाठी आपण कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करावी या सर्व मागण्या ज्योतिबा फुले यांनी केल्या. १०० वर्षांपूर्वी उत्तम जातीची गाय आणा त्यातून जोडधंदा वाढेल हे सांगणे, मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरणे ही सर्व दृष्टी एक वेगळा समाज उभा करण्याबद्दल विचार करणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाची होती आणि त्यामुळे, सहाजिकच त्याचा आदर्श हा आज आपण केलाच पाहिजे. दुसरे म्हणजे शाहू राजे ते फारच गमतीशीर होते. त्यांना खोटेपणा, ढोंगीपणा हा कधी पटायचा नाही. एक दिवशी त्यांच्या दरबारात एक सरदार आला आणि त्यांनी विनंती केली की, कर्नाटकमधून एक विद्वान व्यक्ती इथे येणार आहे आणि त्या व्यक्तीचे वैशिष्ट्य आहे की, त्याला उद्या काय होणार आहे ते कळते. शाहू महाराजांनी सांगितलं, ‘उद्या काय होणार आहे हे कळते, असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. ही भोंदूगिरी आहे आणि अशा भोंदूगिरीला मी प्रोत्साहन देऊ इच्छित नाही.’ सरदार लोकांनी फार हट्ट केला आणि सांगितलं की, काहीही करा पण, त्याला एकदा ऐकून घ्या. शेवटी त्यांना दुखवायचे नाही म्हणून शाहू राजांनी त्यांना वेळ द्यायला सांगितला. ३-४ दिवसांनी कर्नाटकातून आलेले ते गृहस्थ शाहू महाराजांच्या राजवाड्यात पोहोचले आणि शाहू महाराजांच्या पुढे उभे राहून रडायला लागले. महाराजांनी विचारले, की तुम्हाला रडायला झाले काय? ते बोलले की, ‘तुमच्या अधिकाऱ्यांनी ४ दिवसांपूर्वी तुमच्या राज्यात आम्ही आल्यावर मला अटक केली, तुरुंगात टाकले, मारले, जेवण दिले नाही. शाहू महाराज बोलले, फार वाईट झाले. त्याचं मी समर्थन करणार नाही. पण, तुम्ही उद्या माझं काय घडणार आहे हे भविष्य सांगायला इथे आलात, तर तुम्हाला हे कळलं नाही का, की तुमचे भविष्य काय आहे. याचा अर्थ असा आहे की, हा ढोंगीपणा अशा गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. विज्ञानावर आधारित काही विषय असतील तर त्याचे समर्थन मी करतो. असल्या भोंदू आणि खोटं लोक मला आवडत नाही. तिसरे गृहस्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर; आपण नेहमीच सांगतो की, बाबासाहेबांनी घटना लिहिली पण, त्याहीपेक्षा खूप महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी केल्या. या देशांमध्ये स्वातंत्र्यापूर्वी धरणे नव्हती, पाण्याची कमतरता होती, या देशातले सर्वात मोठे धरण ‘भाक्रा नांगल’ याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या आधीच्या मंत्रिमंडळात जल आणि विद्युत खात्यावर त्यांची नियुक्ती झाली तेव्हा त्यांनी घेतला. शेती कशी सुधारेल, यावर दूरदृष्टी ठेवून या अशा अनेक लोकांनी काम केले. आज आपण इथे सर्व एकत्र आहोत. संघटनेमध्ये काम करण्याची तयारी केली. याचा अर्थ असा आहे की, समाजाचा चेहरा, सामान्य माणसाचे जीवन हे आपल्याला बदलायचे आहे. स्त्री आणि पुरुष यामध्ये कोणत्याही प्रकारचे अंतर ठेवायचे नाही. कर्तृत्व दाखवण्याचा मक्ता हा फक्त पुरुषाकडे असतो हे खरे नाही. स्त्रीला जर संधी मिळाली तर ती देखील कर्तुत्व दाखवू शकते. हे इंदिरा गांधींच्या हातात देश दिल्यानंतर सगळ्या जगाने पाहिलेले आहे. या देशाची प्रतिष्ठा त्या भगिनीने वाचवली आणि त्यामुळे, या कामाला प्रोत्साहन दिले पाहिजे. मला स्वतःला असे वाटते की, संधीही द्यायला हवी. मी देशाचा संरक्षण मंत्री होतो आणि संरक्षण मंत्री असताना २६ जानेवारीची परेड होती, त्या परेड नंतर जगामध्ये मी पाहिले की, अनेक देशांमध्ये लष्करामध्ये महिला महत्त्वाचे काम करतात. आपल्या देशात ही पद्धत नव्हती. आपल्या देशाचे लष्कर प्रमुख, हवाई जहाज प्रमुख, नौसेनांचे प्रमुख या तिघांनाही मी बोलावले आणि त्यांना सांगितलं की, आपल्या लष्करामध्ये मुलींना का घेतलं नाही ? त्या तिघांनी मला सांगितलं की, अजिबात घेणे शक्य नाही. योग्य नाही. या देशाची रक्षण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही आणि त्यामुळे हे शक्य नाही. एक बैठक झाली, दुसरी बैठक झाली, तिसरी बैठक झाली, तिन्ही बैठकांमध्ये तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांनी दरवेळी हेच उत्तर मला दिले. चौथ्या बैठकीमध्ये मी सांगितलं की, ‘या देशातल्या जनतेने संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे, निर्णय घ्यायचा अधिकार मला आहे’ आणि माझा हा निर्णय आहे की, ‘पुढच्या महिन्यापासून या देशाच्या लष्करामध्ये सुरुवातीला ११% मुलींना जागा देण्यात येईल आणि हा निर्णय घेतला’ आणि आज आपण बघतो आहोत की, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या दिवशी आपल्या देशातील मुली परेड करतात. सीमेवरच्या अतिशय महत्त्वाच्या भागांचे रक्षण मुली करतात. अनेक ठिकाणी वैमानिक म्हणून अतिशय महत्त्वाची जबाबदारी मुली पार पाडतात आणि एक आणखीन गोष्ट गंमत म्हणून सांगतो, एक दिवशी मी मुंबईवरून दिल्लीला गेलो होतो आणि माझ्या शेजारी जे गृहस्थ होते त्यांनी त्यांची ओळख करून दिली की, मी असा-असा आहे आणि लष्करामध्ये माझी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांनी एक गोष्ट मला सांगितली की, तुमचा एक निर्णय आम्हाला पटला नाही. तुम्ही मुलींना यामध्ये घेतलं हे काही बरं केलं नाही. मी विचारलं काय चुकलं माझं, त्यावर ते बोललेत, ‘मुलं जेवढ्या बारकाईने काम करतात, तेवढ्या मुली करत नाही. त्याच्यावर मला शंका आहे.’ मी त्यांना २-३ गोष्टी सांगितल्या की, तुमच्या घरामध्ये घर चालवण्याची जबाबदारी, स्वयंपाक करण्याची जबाबदारी, भाजी कापण्याची जबाबदारी महिला करतात. मी त्यांना विचारलं महिलाच का ? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘महिलांचा एक स्वभाव आहे की, कोणतेही काम त्यांच्यावर सोपवले तर ते अत्यंत बारकाईने त्या करतात.’ त्याउलट मुले त्यांच्यावर असलेली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडायला जेवढं लक्ष देतात त्यापेक्षा कितीतरी अधिक लक्ष मुली या देत असतात. आपण संघटनेमध्ये सहभागी झालेलो आहोत. हा पक्ष सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. या पक्षावर आघातही खूप होतात, पण त्या आघाताची फिकीर ही तुम्ही आणि आपण करणे सोडून देऊया. आपण एकसंघ राहू. जे काही पक्षाचे कार्यक्रम असतील ते करू. तुमच्या हिताची जी जी धोरणे तयार करायची असतील, त्यामध्ये लक्ष देऊ आणि एकजुटीने आपण या महाराष्ट्राचे चित्र आणखीन चांगले कसे होईल याची खबरदारी घेऊ आणि ते करण्यामध्ये स्त्री शक्ती ही अत्यंत मोलाची शक्ती आहे. मला आनंद आहे की, रोहिणी ताई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या आजूबाजूच्या ३-४ जिल्ह्यांतून तुम्हा सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केले. आपण सर्व आता जाताना आपल्या गावात, आपल्या आजूबाजूच्या घरात हा राष्ट्रवादीचा विचार पोहोचवण्यासाठी जे काही करता येईल ते तुम्ही करा. त्याचा लाभ तुमच्या कुटुंबाला तर होईल, पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला होईल. तो महाराष्ट्राचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे आणि ते तुम्ही करू शकाल याची खात्री या ठिकाणी मी बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो. #sharadpawar #pawarspeaks #ncp #शरद पवार