_*काही माणसांना स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्याची एक विचित्र घाई असते.त्यांना असं वाटतं की,समोरच्याच्या अंगावर चिखल उडवला की आपला पांढरा शुभ्र शर्ट जास्त उठून दिसेल.पण दुर्दैवाने,दुसऱ्याच्या दोषांवर बोट ठेवल्याने आपलं चारित्र्य उजळत नाही,तर आपली संकुचित वृत्ती मात्र जगासमोर उघडी पडते.खरं तर,ज्याला स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वभावावर पूर्ण विश्वास असतो,त्याला कुणालाही कमी लेखण्याची गरजच उरत नाही.जेव्हा एखादी व्यक्ती सतत दुसऱ्याच्या चुका काढण्यात,त्यांचे दोष मोजण्यात आणि ते किती चुकीचे आहेत हे सांगण्यात धन्यता मानते,तेव्हा समजून घ्यावं की त्या व्यक्तीच्या आत कुठेतरी एक मोठी पोकळी आहे.ही पोकळी भरून काढण्यासाठी ती नकारात्मक श्रेष्ठत्वाचा आधार घेते.दुसऱ्याचा दिवा विझवून आपल्या घरात प्रकाश पडेल,हा विचारच मुळात चुकीचा आहे.पण अशा स्वभावाच्या लोकांना हे उमजत नाही की,उंची वाढवायची असेल तर ती स्वतःच्या कष्टाने आणि गुणांनी वाढवायची असते,दुसऱ्याचे पाय खेचून मिळालेली उंची ही आभासी असते आणि ती फार काळ टिकत नाही.खरे मोठेपण हे चंदनासारखं असतं,ज्याला ओरडून सांगावं लागत नाही की;'मी सुगंधित आहे 'त्याचा दरवळ आपोआप आजूबाजूच्या वातावरणात पसरतो.दुसऱ्याला तुच्छ लेखून मिळवलेलं हे तथाकथित मोठेपण म्हणजे केवळ अहंकाराचा एक फुगा असतो,जो सत्याच्या एका टाचणीने कधीही फुटू शकतो.माणसाने हे विसरता कामा नये की,समोरच्याच्या उणिवा दाखवणं सोपं असतं,पण स्वतःच्या चुका मान्य करून त्या सुधारणं हेच खऱ्या मोठ्या मनाचं लक्षण आहे.आयुष्यात जर खरंच मोठं व्हायचं असेल,तर कुणाला तरी पाडून किंवा मागे सारून पुढे जाण्यात काय अर्थ?त्यापेक्षा कोणाचा तरी आधार बनून,कुणाला तरी सावरून जे समाधान मिळतं,ते कोणत्याही सिद्ध केलेल्या मोठेपणापेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ असतं.शेवटी इतिहास त्यांचंच नाव लक्षात ठेवतो ज्यांनी इतरांच्या आयुष्यात प्रेमाचा आणि विश्वासाचा प्रकाश पेरला,ज्यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ आणि अहंकार जपला त्यांना काळ कधीच माफ करत नाही.म्हणूनच,दुसऱ्याचे दोष शोधण्यापेक्षा स्वतःमधलं माणूसपण शोधण्यात जास्त आनंद आहे.*_
_*"मित्रांनो;काळजी घ्या. ..."*_
#☕good morning Friends🌞