#JKK_Weekly_News_Bulletin
*आणि सर हॉरमसजी पिरोशॉ मोदी झाले मुंबईचे पहिले ऍक्टिंग गव्हर्नर*
उमेश काशीकर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी - आणि त्यानंतर तब्बल पाच महिने - मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते जॉन कॉलव्हिल !
कॉलव्हिल हे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर होते. त्यांनाच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मुंबई राज्यासाठी भारतीय गव्हर्नरची नियुक्ती होईपर्यंत पदभार सांभाळण्यास सांगण्यात आले होते.
आजचे 'लोकभवन' त्यावेळी 'राजभवन' देखील झाले नव्हते. तर ते होते 'गव्हर्मेंट हाऊस' ऑफ बॉम्बे !
ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि पहिल्याच महिन्यात म्हणजे सप्टेंबर १९४७ मध्ये गव्हर्नर जॉन कॉलव्हिल यांना तातडीची इंग्लंडला जाणे आवश्यक झाले.
कॉलव्हिल यांची बहीण लेडी अरस्किन - हिल हिची प्रकृती गंभीर असल्याचा निरोप आला आणि त्यामुळे कॉलव्हिल यांना इंग्लंडला लगेचच जाणे भाग पडले.
कॉलव्हिल यांनी गव्हर्नर - जनरल लॉर्ड माऊंटबॅटन (स्वातंत्र्यानंतर काही महिने ते देखील होतेच !!) यांचेकडे रजेची विनंती पाठवली व त्यांनी देखील ती लगेच मान्य केली.
दहा दिवसांची रजा होती व कॉलव्हिल यांना कराची मार्गे लंडनला जायचे होते.
ही रजा कदाचित वाढू देखील शकते असा विचार करून रजेच्या कालावधीत मुंबईसाठी हंगामी गव्हर्नर (ऍक्टिंग गव्हर्नर) नेमणे सरकारला आवश्यक वाटले.
*नियुक्ती करावी कुणी !*
ब्रिटिश शासनकाळात गव्हर्नरची नियुक्ती ब्रिटिश 'क्राऊन' म्हणजे सम्राटांकडून (त्यावेळी जॉर्ज सहावे) होत असे.
परंतु भारत स्वतंत्र झाल्यामुळे आता हंगामी गव्हर्नरची नियुक्ती करणे राजे जॉर्ज सहावे यांना शक्य नव्हते.
त्यामुळे ऍक्टिंग गव्हर्नरच्या नियुक्तीचा चेंडू पुन्हा गव्हर्नर - जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या कोर्टात येऊन पडला !
कुणाला ऍक्टिंग गव्हर्नर नेमायचे ते तुम्हीच ठरवा !!
लॉर्ड माउंटबॅटन यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचेशी सल्लामसलत केली व कॉलव्हिल यांच्या रजेच्या कालावधीत उद्योगपती व टाटा समूहाचे संचालक सर हॉरमसजी पिरोशॉ मोदी (Sir Hormasji Peroshaw Mody) यांना मुंबई प्रांताचे हंगामी गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्याचे ठरले.
*शपथ कोणती घ्यावी !*
नियुक्ती कुणाची करावी हे ठरले. पण लगेच दुसरा प्रश्न उद्भवला. शपथ घ्यायची कोणती ?
राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया सुरु होती.
भारत अजूनही इंग्रजांचे 'स्वतंत्र अधिराज्य' (Independent Dominion) होते.
केंद्र सरकारकडे लगोलग विचारणा केली गेली.
केंद्र सरकारच्या विधी विभागाने ऍक्टिंग गव्हर्नरच्या शपथेचा एक मसुदा तयार करून मुंबईला पाठवून दिला.
त्यानुसार सर हॉरमसजी पिरोशॉ मोदी यांनी मुंबईच्या हंगामी गव्हर्नर पदाचा कार्यभार स्वीकारला. ही शपथ एकदा वाचावी !
*शपथेचे प्रारूप :*
'I, Hormasji Peroshaw Mody, do swear that in the office of Governor of Bombay I will be faithful and bear true allegiance to His Majesty King George The Sixth, His Heirs and Successors and to the Constitution of India as by law established and that I will do right to all manner of people after the laws and usages of India without fear or favour, affection or ill - will. So help me God.'
म्हणजे शपथेमध्ये एकाच वेळी जॉर्ज सहावे यांच्याप्रती आणि भारताच्या राज्यघटनेप्रती - तोवर राज्यघटना तयार झाली नव्हती तरीही - निष्ठा व्यक्त करण्यात आली.
या शपथेनुसार मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एम सी छगला यांनी दिनांक ७ सप्टेंबर १९४७ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता सर हॉरमसजी पिरोशॉ मोदी यांना गणेशखिंड पुणे येथील 'गव्हर्मेंट हाऊस' येथे ऍक्टिंग गव्हर्नर पदाची शपथ दिली.
शपथविधीला मुंबईचे मुख्यमंत्री बी जी खेर व इतर मान्यवर उपस्थित होते.
*जॉन कॉलव्हिल यांच्या बहिणीचे निधन; सुटी लांबली !!*
दरम्यान ज्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी गव्हर्नर जॉन कॉलव्हिल हे इंग्लंडला रजेवर गेले होते त्या लेडी अरस्किन-हिल यांचे निधन झाले व जॉन कॉलव्हिल यांना रजा वाढवणे आवश्यक झाले !
वाढीव रजा आटोपून जॉन कॉलव्हिल दिनांक २४ सप्टेंबर १९४७ रोजी मुंबईला परत आले व त्यांनी मुंबईच्या गव्हर्नर पदाचा कार्यभार पुन्हा स्वीकारला.
दिनांक ६ जानेवारी १९४८ रोजी कपूरथाला राजघराण्याचे सदस्य राजा महाराज सिंह यांची मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आणि कॉलव्हिल मायदेशी रवाना झाले.
दरम्यान सर हॉरमसजी पिरोशॉ मोदी यांची युनायटेड प्रोव्हिन्सचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक झाल्यावर सर हॉरमसजी पिरोशॉ मोदी - त्यांना लोक 'होमी' मोदी म्हणत ) यांना उत्तर प्रदेशचे पहिले राज्यपाल बनवण्यात आले व ते त्यापदावर १९५२ पर्यंत कार्यरत होते.