Sharad Pawar
1.7K views
1 years ago
छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजचे आपले लोकसभेच्या निवडणुकीला निवडणूक लढवणारे आघाडीचे उमेदवार श्री. खैरे, दुसऱ्या मतदारसंघाचे उमेदवार कल्याण काळे, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे, ज्येष्ठ नेते केशवराव, शैक्षणिक क्षेत्रामध्ये औरंगाबादचे नाव किंवा मराठवाड्याचे नाव देशात आणि देशाच्या बाहेर ज्यांनी केलं ते बाबुरावजी कदम, उत्तमसिंह राजपूत, जयसिंहराव गायकवाड, रघुनाथराव सुधाकर सोनवणे, किशोर पाटील, सूर्यकांता ताई गाडे, विजय अण्णा बोराडे, अनिल पटेल, कमाल फारुकी, छायाताई जंगले, मीनाताई खरे, नामदेव पवार, संजय वाकचौरे, रंगनाथ काळे, द्वारका भाऊ पाटेकर, जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग तांगडे, शहराचे अध्यक्ष ख्वाजाभाई, व्यासपीठावरील सर्व आघाडीच्या विविध पक्षांचे नेते आणि गेले दोन अडीच तास ११ वाजल्यापासून या उन्हामध्ये, गरमीमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्ही बंधू-भगिनींनो..! लोकसभेची निवडणूक आली. आपल्याला निकाल घ्यायचा आहे की या देशाचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा? तो कारभार कशा पद्धतीने चालवायचा? देशासमोर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ताकद ही कोणामध्ये आहे, याचा विचार करून निर्णय घ्यायचा. तुम्ही मी सगळेजण एका विचाराने काम करणारी लोक आहोत आणि म्हणून आपली जबाबदारी ही आहे की देशाचे राजकारण हे योग्य रस्त्यावर आणायचं असेल, तर आम्ही सगळ्यांनी बसून एक देश पातळीवर आघाडी केली, त्या आघाडीला साथ देण्यासाठी देशाच्या अनेक राज्यातील अनेक मंत्री, अनेक मुख्यमंत्री, अनेक खासदार, अनेक पक्षाचे नेते हे सगळे एकत्र आले आहेत आणि आज या निवडणुकीला सामोरे जात आहेत. माझी खात्री आहे, की अनेक ठिकाणी मी पाहिलं, महाराष्ट्राच्या बाहेरची माहिती घेतली, लोकांना बदल पाहिजे आहे. लोक या आघाडीला पाठिंबा द्यायला मनापासून तयार आहेत आणि त्या आघाडीचे दोन खंदे उमेदवार श्री. खैरे आणि श्री. काळे आज आपल्या सगळ्यांच्या वतीने या निवडणुकीला सामोरे जात आहेत. तुमची माझी जबाबदारी आहे की त्यांना मोठ्या मतांनी विजयी करायचं आणि देशाचं राजकारण योग्य रस्त्यावर न्यायचं. मी इथे यायच्या आधी मोदी साहेबांचे भाषण ऐकत होतो, ते आज मराठवाड्यात आहेत. सबंध भाषणामध्ये त्यांनी सांगितलं काय? हे भाषण असो, याच्या आधीचं भाषण असो, अन्य राज्यातील भाषणं असोत अपेक्षा अशी असते की देशाचा प्रधानमंत्री हा सबंध देशाचा असतो. त्यांची भाषणे ऐकली, त्यांचे विचार समजून घेतले, तर एक गोष्ट स्पष्ट होते की हे सबंध देशाचे प्रधानमंत्री नाहीत तर भाजपचे प्रधानमंत्री आहेत. देशाचे नेतृत्व ही करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनी राजकीय दृष्टिकोन ठेवावा लागतो. मतभिन्नता असू शकते, पण राजकीय दृष्टिकोन याची राष्ट्रीय गरज असते. आज मोदी कुठेही गेल्यानंतर आपण राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत, राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे याचे विस्मरण त्यांना होते आणि ते सातत्याने कधी नेहरूंवर टीका करतात, कधी राहुल गांधी यांच्यावर टीका करतात, कधी माझ्यावर टीका करतात, कधी आघाडीवर टीका करतात. या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही काय करणार? हे देशाला सांगा. जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आयुष्यातील १० वर्षांपैकी जास्त वर्ष ज्यांनी इंग्रजांविरुद्ध लढायला घालवली, तुरुंगामध्ये गेले, स्वतःच्या घरादाराचा विचार केला नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश संसदीय लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे यासाठी प्रयत्न केले, विज्ञानाला प्रोत्साहित केले आणि जगातली महत्त्वाची सत्ता भारत व्हावी यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. अशा देशासाठी प्रचंड योगदान देणारे जवाहरलाल नेहरू यांच्यासारखे नेतृत्व त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करणे याचा अर्थ आज या देशाचे प्रधानमंत्री यांची मानसिकता काय आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट होते. त्यांनी सांगितलं, माझ्या हातात सत्ता द्या, ५० दिवसांच्या आत मी महागाईचे प्रश्न सोडवतो. महागाईचा प्रश्न सोडवला? पेट्रोलच्या किंमती कमी केल्या? आज त्यांनी सांगितलं ५० दिवसांच्या आत मी पेट्रोल, डिझेल, गॅस या सगळ्यांच्या किंमती ५० टक्क्यांनी कमी करीन. नाही करता आली, उलट त्या किंमती वाढल्या. इथे आमच्या आया-बहिणी बसल्या आहेत त्यांनी सांगितलं होतं की गॅसच्या किंमती मी कमी करणार, त्या दुप्पट केल्या. आज संसार चालवणं, हे भगिनींना अवघड झालं आणि त्याचे महत्त्वाचे कारण जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात या प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या सरकारनी काहीही पाऊले टाकलेली नाहीत. आपल्याला संकटामध्ये टाकण्याचं काम केलं. आज हिंदुस्थानामध्ये बेकारांची संख्या जास्त आहे. मध्यंतरी जगातली एक संघटना आहे तिचं नाव आयएलओ (इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायजेशन) या ऑर्गनायजेशनने जगामध्ये बेकारी किती आहे? आणि कुठे आहे? याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून एक अहवाल सादर केला. त्यांचा अहवाल असं म्हणतो की भारतामध्ये जे १०० मुलं शाळा कॉलेजमधून बाहेर पडतात त्यातील ८७ मुलं ही बेकार आहेत. ८७ टक्के तरुण पिढी या देशात आज बेकार आहे, त्या देशाचा प्रधानमंत्री या तरुणांच्या भविष्याचा विचार करत नसेल तर सत्तेवर बसण्याचा त्यांचा अधिकार किती आहे? हा जर एखाद्या तरुणाने प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे. म्हणून शेतकरी असो, आज शेतीची अवस्था काय आहे? आज मराठवाड्याची काय अवस्था आहे? आज मराठवाड्यामध्ये पाणी नाही, जनावरांना चारा नाही, दुष्काळाचे संकट आहे. ते इथं आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे अनेक ठिकाणी आहे. जबाबदारी असते सरकारची की दुष्काळासारखे संकट आल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी कष्ट घ्यायचे. काही लोकांनी मला सांगितलं फळबागा केल्या, फळबागाची योजना आम्ही लोकांनी सुरू केली आणि त्या फळबागा केल्या आज त्या फळबागांना पाणी नाही आणि त्यामुळे ही फळबाग आज जळून जायला लागली आहेत आणि केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, देशाचे मुख्य प्रधानमंत्री या प्रश्नांकडे ढुंकवूनही बघत नाहीत. मला आठवतंय, दुष्काळ पडला, त्यावेळी देशाचा शेती मंत्री होतो, औरंगाबादला आलो होतो. फुलंब्री आणि आजूबाजूला मोसंबीची पिकं जळत होती. आम्ही लोकांनी २५ हजार रुपये एका जणाला पाणी घालण्यासाठी दिले आणि बागा वाचवल्या. कष्टाने बाग केली आणि ती बाग पाणी नाही म्हणून जळून गेली, तेव्हा शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होतं. त्या शेतकऱ्याला योग्य रस्त्यावर आणण्यासाठी आपल्या हातातली सत्ता ही वापरायची हे सूत्र राज्यकर्त्यांनी करायचं असतं, पण राज्यकर्त्यांना त्या संबंधित यतकिंचितही खात्री नाही, त्यांना चिंता नाही आणि म्हणून शेतकरी असेल, बेकार तरुण असेल, महागाईचा प्रश्न असेल यांसारख्या प्रत्येक प्रश्नावर आजच्या राज्यकर्त्यांचे लक्ष नाही. मग सत्ता वापरतात कशासाठी? ते सत्ता वापरतात, त्याचा गैरवापर करण्यासाठी. आज हा देश स्वतंत्र देश आहे, माणसाला अधिकार आहेत, आज आम्ही बघतो की या अधिकारांवर गदा यायला लागली, मूलभूत अधिकार संकटात आले. याचा अर्थ, आज ना उद्या संसदीय लोकशाही संकटात येईल. लोकशाहीवरचं संकट, घटनेवरचं संकट आणि सामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका ही स्थिती जर या ठिकाणी असेल तर त्याला उत्तर द्यावे लागेल, आणि ते उत्तर द्यायचे असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा १०० टक्के पराभव करणे आणि या मतदारसंघामध्ये काळे आणि खैरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणे हेच काम तुम्ही करावं, त्याला आमची साथ राहील, ही खात्री या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. #sharadpawar #pawarspeaks #शरद पवार