Adv. Jitesh Potdar
511 views
2 days ago
*“आता फक्त गंमत बघायची…”* “मै रास्ते से जा रहा था, मेरे कुछ अरमान थे… आसपास देखा—दोनों तरफ कब्रिस्तान थे… पैर गिरा हड्डी पर… हड्डी के ये बयान थे— ‘ए नादान इंसान, संभल कर चल… हम भी कभी इंसान थे…’” या ओळींमध्ये दडलेला अर्थ भीतीचा नाही—तो इशाऱ्याचा आहे.. जाणीवेचा आहे. कारण मृतदेह कधीच धोकादायक नसतात… धोकादायक असतात ते जिवंत चेहरे—हसरे, सभ्य, आणि आतून निर्विकार. आजच्या जगात माणूस माणसाला दुखावतो— शब्दांनी, वागणुकीने, आणि सर्वात जास्त— परकेपणाने.. काही माणसं असतात— ज्यांच्या स्वभावातच जपणूक असते. ती माणसं नात्यांना पाणी घालतात, भावनांना आधार देतात, आणि दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा अर्थ शोधतात. पण हाच त्यांचा सर्वात मोठा दोष ठरतो. कारण जगाला प्रामाणिकपणा नको असतो— जगाला सोय हवी असते. तुम्ही उपलब्ध असता—तोपर्यंत तुमची किंमत नसते. तुम्ही समजून घेता—तोपर्यंत तुम्हाला गृहित धरलं जातं. काही लोक मुद्दाम दुर्लक्ष करतात— कारण त्यांना ठाऊक असतं, तुम्ही तुटणार नाही. काही लोक तुमच्यासमोरच इतरांना महत्त्व देतात— कारण त्यांना तुमच्या भावना चाचपडायच्या असतात. पण इथेच एक लक्षात ठेवा— "तुमची किंमत समजू द्या.." भावनिक माणूस कमकुवत नसतो— तो फक्त जास्त जिवंत असतो. पण जिथे जिवंतपणाची कदर नाही, तिथे स्वतःला जपणं हीच शहाणपणाची खूण असते. म्हणून प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं. कधी कधी… स्वतःहून काही चांगलं करणं थांबवायचं असतं.. कारण आपलं काही न करणं हे सुद्धा समोरच्यासाठी आपली किंमत कळू देणारच ठरतं.. आणि हेच सर्वात मोठं उत्तर असतं. ओशो म्हणतात— “वाईट केल्यावरच दुःख मिळतं असं नाही… कधी कधी जास्त चांगलं केल्यावरही मिळतं. कारण लोक तुमच्या चांगुलपणाची कदर करत नाहीत— ते त्याची सवय करून घेतात.” म्हणून आता नवे नियम— ना अति जपणूक, ना अति अपेक्षा… ना स्वतःला सिद्ध करण्याची घाई, ना कुणाला पटवण्याचा हट्ट. फक्त एक शांत निर्णय— “आता फक्त गंमत बघायची…” अन हीच तुमची सर्वात मोठी ताकद. काही लोक असतात— जे मनापासून जपतात, विचार करतात, आधार देतात. पण त्याच वेळी काही लोक असेही असतात— जे नाईलाजाने कठोर वागतात. कधी परिस्थिती माणसाला बदलते… कधी जबाबदाऱ्या त्याला थंड करतात… कधी स्वतःच्या जखमा दुसऱ्यांवर उमटतात… काही लोकांना असं वागताना त्रासही होत असेल, पण त्यांची तीच मजबुरी बनलेली असते— त्यांच्या जगण्याचा एक बचाव. एखादी व्यक्ती जी स्वतः नात्यांमध्ये वारंवार दुखावली गेली आहे, त्याला भावना दाखवण्याची मुभा नसते. आता तिला पुन्हा तुटायचं नसतं. एखादा व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातल्या गोंधळाशी झगडत असतो. म्हणजेच— प्रत्येक वेळी समोरचा वाईट नसतो… पण त्याची वागणूक तरीही दुखावणारी असते. आणि इथेच खरा प्रश्न उभा राहतो— पण जे लोक दुसऱ्यांना असं वागायला भाग पाडतात, त्यांना तरी काय मिळतं? एखाद्याला कमी लेखून, एखाद्याच्या भावनांशी खेळून, एखाद्याला जाणीवपूर्वक टाळून— माणूस खरोखर सुखी होतो का? उत्तर बहुतेक वेळा “नाही” असंच असतं. कारण दुसऱ्याला दिलेला त्रास हा नेहमीच एखाद्या स्वरूपात परत येतो— कधी रिकामेपणात, कधी नात्यांच्या तुटण्यात. माणूस दुसऱ्याला दुखावतो तेव्हा तो स्वतःच्या मनाशी युद्ध करतं असतो.. म्हणूनच— तुमची जाणीव जागी ठेवा— आणि स्वतःला ठाम ठेवा. म्हणूनच एक नवा दृष्टिकोन— जे समजून घेता येईल, ते समजून घ्या… जे स्वीकारता येईल, ते स्वीकारा… कारण स्वतःचं मन जपणं हा स्वार्थीपणा नाही— ती गरज आहे. आणि शेवटी— ना राग, ना सूड… फक्त एक शांत, सजग भूमिका— “आता फक्त गंमत बघायची…” आणि समोरच्याला त्याचं हरणारं युद्ध खेळू द्यायचं.. कारण जेव्हा लोक त्यांच्या खऱ्या स्वरूपात समोर येतात. त्या वेळी… तुम्हाला उत्तर द्यायची गरजच उरत नाही— त्यांना त्याचं उत्तर कळलेलं असतं.. © ॲड. जितेश पोतदार #☀️गुड मॉर्निंग☀️