सिर्सी गावची 'दशा' आणि 'दिशा': श्रेयवादाच्या लढाईत विकासाचे 'गावगाडे' रखडले! प्रतिनिधी :-सिर्सी उमरेड सिर्सी: सध्या सिर्सी गावात वार्ड क्रमांक १ आणि वार्ड क्रमांक ४ च्या पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहेत. गावात 'तू काँग्रेसचा की मी भाजपचा' अशा वातावरणाने राजकीय पारा चांगलाच चढला असून, हॉटेलमधील पार्ट्या आणि छुप्या बैठकांना उधाण आले आहे. मातब्बर राजकारण्यांनी आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी तगडी 'फिल्डिंग' लावली असली, तरी सामान्य ग्रामस्थांमध्ये मात्र संतापाची लाट आहे. नेत्यांच्या श्रेयवादाच्या लढाईत गावाचा विकास मात्र 'कोई मिल गया' चित्रपटातील 'जादू'सारखा गायब झाला असल्याची चर्चा आता गावच्या पानठेल्यांवर रंगू लागली आहे. *रस्ते की पांदण? गाड्यांचा होतोय 'भंगार'* गावात नवीन नळ फिटिंगचे काम पूर्ण झाले असले, तरी या कामासाठी खोदलेले रस्ते पुन्हा नीट न केल्यामुळे मुख्य रस्त्यांची अवस्था पांदण रस्त्यांपेक्षाही भयानक झाली आहे. "गावात गाडी नेली की ती भंगार होऊनच बाहेर येते," अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. धुळीचे साम्राज्य आणि खड्ड्यांच्या अडथळ्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. *बस स्थानकाची दुरवस्था: महिलांची सुरक्षा वाऱ्यावर* गावच्या बस स्थानक परिसराला घाणीचा वेढा पडला आहे. हॉटेलमधील शिळे अन्न आणि अंडा टपरीचालक उरलेले कचरा तिथेच फेकत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, महिलांसाठी उभारलेल्या शौचालयाची निगा राखली जात नसून, तिथे कुत्रे आणि मद्यपींचा वावर असतो. अशा परिस्थितीत महिलांनी जायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. *आरोग्य आणि सुविधांचा बोजवारा* आरोग्य केंद्र: प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था 'असून अडचण नसून खोळंबा' अशी झाली आहे. नर्सची बदली झाली पण नवीन नियुक्ती नाही. कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत, तरीही ते घरभाडे भत्ता लाटत असल्याची तक्रार गावकरी करत आहेत. पिण्याचे पाणी: गावात शुद्ध पाणी केंद्र नक्की सुरू आहे की कायमचे बंद पडले, याचा पत्ताच कोणाला नाही. लेंडी पूल: एका पावसात 'लेंडी पूल' पाण्याखाली जातो आणि गावाचा संपर्क तुटतो. हा पूल कधी बांधला जाणार? याचे उत्तर कोणत्याही नेत्याकडे नाही. युवाशक्ती उपेक्षित: तरुणांना रोजगाराची संधी नाही, तसेच वृद्ध आणि खेळाडूंना फिरण्यासाठी किंवा खेळण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध नाही. *पोटनिवडणुकीचा तमाशा अन् विकासाचा वनवास* निवडणुकीत आपला उमेदवार जिंकवण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत आहेत. मात्र, हेच 'जीवाचे रान' गावच्या विकासासाठी का केले जात नाही? असा रोकडा सवाल जनता विचारत आहे. निवडणुका येतील आणि जातील, पण लोकप्रतिनिधींनी सत्तेच्या खुर्चीसाठी आपसात न लढता, गावातील रस्ते, आरोग्य आणि रोजगाराचे प्रश्न सोडवावेत, अशी आर्त हाक सिर्सीतील नागरिक देत आहेत. थोडक्यात काय तर... राजकारण्यांच्या श्रेयवादाच्या खेळात सिर्सीची 'दशा' झाली आहे. आता या पोटनिवडणुकीनंतर तरी गावाला विकासाची नवी 'दिशा' मिळते की पुन्हा 'जैसे थे' परिस्थिती राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. - अखिल रोडे , सिर्सी