Sharad Pawar
2K views
2 years ago
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कापसेवाडी या गावी आयोजित शेतकरी मेळावा या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शवत सर्व शेतकरी बंधू-भगिनींना मार्गदर्शन केले. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आणि द्राक्षाच्या पिकामध्ये ज्यांनी अतिशय कष्टाने फार मोठे काम केले ते नितिन बापू कापसे, संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष बदाम काका साठे, शहराचे अध्यक्ष भरत जाधव, विधानसभेचे आमचे जुने सहकारी विनायकराव पाटील, धनाजीराव साठे, पंढरपूरच्या कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश बारसकर, माढाच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे, नागेश काकड, रवींद्र पाटील, त्यांचे विचार आपण ऐकले ते संजय घाटणेकर, रणजित शिंदे, कैलास पाटील अन्य सर्व सहकारी आणि बंधू-भगिनींनो..! मला आनंद आहे, आज या ठिकाणी मला येता आले. कापसेवाडीचे वैशिष्ट्य अतिशय कष्टाने कापसाचे पीक घेणे आणि तो माल देशात व परदेशात पाठवणे, पीक वेगाने तयार करून दोन पैसे अधिक कसे येतील यासाठी प्रयत्न करणे आणि गेले २५ वर्षे नितीन कापसे यांनी कापसाची शेती आणि पीक या सर्व क्षेत्रात भरीव आणि अतिशय कष्टाने काम केलेले आहे. त्यांनी एकदा १ एकर डाळिंब लावले, पण ते पीक काही नीट आले नाही. डाळिंब काढून टाकावे लागले आणि नंतर १ एकर द्राक्षाची बाग लावली, द्राक्षाचा अभ्यास केला, जे उत्तम शेतकरी आहेत त्यांच्याशी सुसंवाद करून द्राक्षाची शेती यशस्वी केली, ज्यांनी १ एकरपासून सुरुवात केली ते आज ४० एकरावर जाऊन पोहोचले, त्यांचे आज यानिमित्त अभिनंदन केले पाहिजे. ते स्वतःच मोठे झाले असं नाही त्यांनी आपल्या भागातील अनेक तरुण आणि शेतकरी ज्यांना द्राक्षाच्या पिकात ज्ञान हवे असेल त्यांना मदत, मार्गदर्शन करून मोठे केले ही कामगिरी नितीनने गेली अनेक वर्ष केली. हजारो शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे लोक सांगतात हा नुसता शेतकरी नाही तर द्राक्षाचा डॉक्टर आहे आणि हा डॉक्टर बनून अनेकांना दुखण्यातून बाहेर काढण्यात यशस्वी देखील झाला, म्हणून आज आनंदाने आपण त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. सोलापूर जिल्हा हा एकेकाळचा दुष्काळी जिल्हा. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळी पाहणी करायला इंदिरा गांधी याठिकाणी आल्या होत्या आणि कधीही न पाहिलेले एवढे मोठे संकट तेव्हा आम्ही पाहिले. ५ लाख लोक दुष्काळी भागात काम करण्यासाठी जात होते त्यांचा पगार आणि बाकीची व्यवस्था करण्यासाठी अधिकाऱ्यांना रात्रीच्या ३-३ वाजेपर्यंत बसावे लागत असत या सर्वांचा आठवड्याचा पगार काढणं ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यावेळी अनेक सहकारी मदतीला होते त्यात, नामदेवराव जगताप, विठ्ठलराव शिंदे भाजपचे त्या काळातले आमदार होते. शिवराजे म्हणून दक्षिण सोलापूरचे एक आमदार होते असे अनेक सहकारी होते, ज्यांनी त्या काळात मदत केली आणि दुष्काळातून बाहेर काढायला लोकांसाठी मदत केली. हे सर्व यश मिळाल्यानंतर या जिल्ह्यातील लोकांना शेतीसाठी अधिक पाणी कसे देता येईल यावर आम्ही अभ्यास केला. उजनीच्या धरणाचा सुदैवाने त्यात लाभ झाला आणि शेतीचे संबंध तंत्रज्ञान बदलण्याचा आम्ही विचार केला आणि हा जिल्हा फळ बागांच्या शेतीला अतिशय उत्तम जिल्हा झाला. डाळिंब, द्राक्ष अन्य भागात अन्य पिकं ही सगळी फळांची शेती या ठिकाणी व्हायला लागली आणि याचा परिणाम लोकांच्या आयुष्यात दिसायला लागला आणि त्यानंतर ऊसात लक्ष घातले. महाराष्ट्रात ऊसाच्या शेतीला सर्वात जास्त महत्त्व अहमदनगर मध्ये होते आणि त्यानंतर कोल्हापूर, आज सोलापूर त्यात एक नंबरला असून साखर कारखाने आणि उसाच्या निर्मितीला महत्त्वाचा जिल्हा आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत, शेत तलाव, काळ्या आईची इमान राखायची ही भूमिका सर्वांनी घेऊन कष्ट, मेहनत करून हा निर्णय अनेकांनी या जिल्ह्यात घेतला आणि त्याचा परिणाम आज या जिल्ह्याचे चित्र बदलत आहे. राज्य, केंद्र सरकारच्या संबंधित इथे अनेक प्रश्न उपस्थित झाले, पण यापैकी मी कुठेच नाही परंतु काळजी नसावी मी कुठेच नसलो तरी सर्व ठिकाणी आहे, जी काही दुखणे असतील त्या सर्वांची नोंद मी घेतली आहे आणि यानंतर प्रमुख सहकाऱ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्यातील जे-जे काही शेतीसंबंधी प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या सोडवणुकीला राज्य व केंद्र सरकार यांच्याशी काय बोलावे आणि त्यातून तुमची सुटका कशी होईल यासंबंधी चर्चा करेल. देशाचे प्रधानमंत्री यांनी असा उल्लेख केला की, मला शेतीतलं काय समजतं पण हे काही नवीन नाही त्यामुळे ते जाऊ देत. काही दिवसांपूर्वी निवडणुकीआधी अमित शहा नावाचे गृहस्थ या जिल्ह्यात आले होते तेव्हा त्यांनी असेच सांगितले की, शरद पवार को क्या समझता है ? लोकांनी त्यांच्या उमेदवारांचा पराभव केला आणि सांगितलं की, त्यांना हे समजतं व नीटनेटकं समजतं. राजकारण या ठिकाणी काढायचं नाही, पण दोन-तीन गोष्टींवर मला अधिक लक्ष द्यायचं आहे. आज शेतकरी कर्जबाजारी होत आहे हे दुखणे आहे. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो त्यावेळेला शेतीवर काम देण्यासाठी एक कार्यक्रम होता. त्या काळामध्ये दुसरं काही काम देता यायचं नाही, काम काय द्यायचं ? सबंध जिल्ह्यात बल्डिंग केलं, त्यावर कर्ज झालं आणि ७८ साली माझ्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्र आल्यावर पहिला निर्णय आम्ही हा घेतला की, बल्डिंगचे कर्ज माफ करायचे. अलीकडच्या काळामध्ये देशाच्या शेतीची जबाबदारी माझ्याकडे असताना काही ठिकाणी आत्महत्या झाल्या. त्यानंतर विशेषतः देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना सांगितलं की, या देशातला शेतकरी आत्महत्या करतोय ही आपल्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट आहे, म्हणून आपण जाऊन तिथे चौकशी करू, तुम्ही माझ्याबरोबर चला. मी त्यांना नागपूरला घेऊन आलो. नागपूरवरून यवतमाळला गेलो. ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरामध्ये जाऊन सविस्तर चर्चा केली, कारण एकच होतं की, शेतीमालाच्या किमती घसरल्या, कर्जाचे व्याज वाढले आणि कधीतरी घरातल्या भांड्या-कुंड्याचे लिलाव निघेल ही स्थिती निर्माण झाली, म्हणून घरातल्या प्रमुख माणसाने सगळ्यांसमोर आपल्या अब्रूचा पंचनामा नको म्हणून शेवटी हा निर्णय घेतला आणि जीव दिला. आम्ही दोघेही परत गेलो आणि प्रधानमंत्री यांना सांगितलं की, काहीही झालं तरी या देशामध्ये मोठ-मोठे उद्योजक आहेत. या उद्योगपतींनी कोट्यावधी रुपयांचे कर्ज थकवलेले आहेत काहींना बँकांनी सूट दिली. कोट्यवधी रुपये जो थकवतो त्याला बँक सूट देते आणि हजारोंमध्ये कर्ज घेतो व नाईलाजाने ते कर्ज थकते त्यांची मात्र आपण भांडीकुंडी बाहेर काढून अब्रूचा पंचनामा त्या ठिकाणी करतो हे सूत्र बदलले पाहिजे ते बदलायचे असेल तर शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ केलं पाहिजे आणि एका निर्णयाने ६७ हजार कोटी एवढे या देशाचे कर्ज माफ केले, मला त्याचा आनंद आहे. आमचे सहकारी संजय घाटणेकर यांनी सांगितलं की, भलत्याच्या नावावर कर्ज काढलं आणि ते पैसे तिसऱ्यानेच उचलले त्याचा परिणाम आज अनेक शेतकरी कर्जमाफी पासून बाजूला राहिलेले आहेत. आता हे काम कोणी केलं असेल? हे मला माहिती नाही, पण माझी माहिती तुम्हाला एकच आहे, हे जर कोणी केलं असेल तर, तुम्ही संजय यांच्याकडे ती माहिती द्या. ती सगळी माहिती एकत्रित करून माझ्याकडे द्या, मी त्यांचा काय बंदोबस्त करायचा ते बघतो. तुम्ही त्याची काही चिंता करू नका. शेतकऱ्यांची फसवणूक करणे हे काम जर नेत्यांकडून होत असेल तर त्याला नेता म्हणवून घ्यायचा अधिकार नाही. त्याबद्दलचा निकाल हा आपल्या सर्वांना घ्यावा लागेल. दुधाचा धंदा, द्राक्ष, डाळिंबाचा व्यवसाय असेल या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही अतिशय कष्ट करत आहात त्यामुळे चित्र बदलत आहे. आपण सर्वजण या कामात अधिक लक्ष घालू. ज्या काही अडचणी या ठिकाणी सांगितल्या त्याला पर्याय आहेत, त्याला उत्तरं आहेत, पण त्या उत्तरासाठी आपण बसून चर्चा केली पाहिजे आणि केंद्र व राज्य सरकारला त्यात लक्ष द्यावे लागेल, ते काम आम्हा लोकांकडून केले जाईल. या जिल्ह्याचा १९७२ पासून माझा घनिष्ठ संबंध आहे. अनेक माणसे जिवाभावाची आहेत. राजकारणात काहीही असेल पण त्यांनी आमच्याशी माणुसकी कधी सोडलेली नाही. अलीकडेच एक गोष्ट ऐकायला मिळाली की, काही ठिकाणी राजकारणामध्ये त्यांच्या मनासारखं काम केलं नाही तर दबाव आणतात. दबावाने आज चांगलं काम करणाऱ्याला त्याच्या कामापासून बाजूला करायचं काम करतात. मी एवढेच सांगू इच्छितो की, जसं कर्जमाफीत कुणाला फसवणूक केली असेल किंवा प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत म्हणून दबावाचे राजकारण या ठिकाणी कुणी करत असेल तर तो दबाव सुद्धा संपवायचा कसा ? याचा विचार आम्ही करू. तुम्ही त्याची काळजी करू नका. परदेशात माल पाठवायला मुंबईचे बंदर. देशात अनेक ठिकाणी बंदरे आहेत ही समुद्रातील बंदरं, समुद्राच्या बाहेरची. माळरानावर सुद्धा बंदर करता येतात त्यांना फोर्ट असं म्हणतात. आज महाराष्ट्रामध्ये आपण विदर्भामध्ये एक बंदर करत आहोत त्यासोबतच जालन्यात देखील करत आहोत. आज सोलापूरचा माल कंटेनरने इतक्या मोठ्या प्रमाणावर परदेशात जात असेल, तर इथे सुद्धा फोर्ट करावा ही जी मागणी आहे त्यातून सुद्धा काही मार्ग काढणे शक्य आहे. त्याचे जे मंत्री आहेत ते जाणकार आहेत त्यांचं नाव नितीनजी. त्यांना मी स्वतः सांगेन आणि त्यांना हे पटवून देईन तुम्ही त्याबद्दलची काही काळजी करू नका. जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही एकत्रित रित्या पुन्हा एकदा माझ्याकडे द्या. आपण या कामांना गती कशी देता येईल ? ते या ठिकाणी पाहूया. मी येताना आता हेलिकॉप्टरने आलो, पलीकडे ऊस दिसत होता. नंतर ऊस संपला आणि सगळीकडे द्राक्ष दिसायला लागली. कुठेही नजर टाकली तर द्राक्षच. मला खात्री आहे की, हा जो निकाल कापसेवाडी व या भागातील तुम्ही लोकांनी केला आणि उत्तम द्राक्ष पिकवून एक प्रकारचा आदर्श सगळ्यांसमोर ठेवला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो. आता आपली ही पिकांबद्दल व शेतीबद्दल जी दोस्ती झालेली आहे ती आता सुटायची नाय..! #pawarspeaks #sharadpawar #शरद पवार #ncp