एक फोन...
"आई, मी नंतर फोन करते गं... जरा कामात आहे." असं म्हणून मी घाईघाईत फोन ठेवला. आईनेही नेहमीप्रमाणे "ठीक आहे बाळा" एवढंच म्हटलं.असं होत कधी माहित असतं आईचा फोन आहे. पण थोड्यावेळाने करून नंतर बोलु. म्हणून फोन ठेवला जातो.
दिवसभर ऑफिसचं काम, घर, मुलं, स्वयंपाक, बाजार... या सगळ्या धावपळीत वेळ कसा गेला ते माझं मलाच कळलं नाही. एक काम संपलं की दुसरं समोर तयार असायचं. रात्री जेव्हा सगळं आवरून मी बेडवर पडले, तेव्हा अचानक मला आईची आठवण आली. अरेरे, आईला परत फोन करायचा राहिलाच की! मी घड्याळाकडे पाहिलं तर रात्रीचे अकरा वाजले होते. जाऊ दे, आता आई झोपली असेल, उद्या सकाळीच करते, असा विचार करून मी झोपून गेले. कारण आपण नेहमी आईला गृहीत धरतो. कधी कधी काही फोन कॉल पण सामान्य समजतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मोबाईल हातात घेतला, तर त्यावर आईचा एक छोटासा मेसेज होता. बाळा, कशी आहेस? वेळ मिळाला की फोन कर. तो मेसेज वाचून माझ्या मनात कुठेतरी काहीतरी हललं. आईला माझ्याकडून काही काम नव्हतं, काही मागायचंही नव्हतं. तिला फक्त तिच्या मुलीचा आवाज ऐकायचा होता. मला स्वतःचीच थोडी लाज वाटली. दुपारी वेळ काढत मी लगेच आईला फोन लावला.
"हॅलो आई!"
माझा आवाज ऐकताच तिकडून एकदम आनंदी आवाज आला. "अगं बाळा! कशी आहेस? मुलं कशी आहेत? जेवलीस का?" आई एका दमात सगळे प्रश्न विचारत होती. मध्ये आईला अपडेट द्यावे लागतात.
मी हसून म्हणाले, "आई, तू आधी श्वास घे!" त्यावर आम्ही दोघीही मनापासून हसलो.
त्यानंतर पुढची पंधरा मिनिटं आमच्या गप्पा झाल्या. काही विशेष विषय नव्हता. गप्पा अगदी साध्या होत्या, घरच्या गोष्टी, शेजारच्या काकू, खिडकीचे नवीन पडदे, मुलांच्या परीक्षा आणि थोड्या जुन्या आठवणी. फोन ठेवताना आई म्हणाली, "आज मनाला खूप बरं वाटलं गं. तुझा आवाज ऐकला की माझं समाधान होतं." त्याचाच नवीन विशेष काहीच नव्हतं. खूप साधा आणि सिम्पल कॉल होता तो. पण त्या कॉल मध्ये आईचा आनंद शब्द नाहीये सांगायला.
आईचं ते वाक्य माझ्या डोक्यात सतत रेंगाळत राहिलं. आपण किती सहज बोलून जातो ना, वेळ नाही! पण खरंच आपल्याकडे वेळ नसतो का? की आपण तो काढत नाही? सोशल मीडियावर रील्स पाहण्यात, व्हिडिओ स्क्रोल करण्यात आपले तासनतास कसे जातात, हे आपल्याला कळतही नाही. पण आपल्या हक्काच्या माणसांशी दोन मिनिटं बोलायला मात्र आपल्याला वेळ मिळत नाही.
काही दिवसांनंतर, आमच्या शेजारी राहणाऱ्या काकांचा मुलगा परदेशातून आला होता. काका सगळ्यांना अगदी कौतुकाने सांगत होते, काल माझ्या मुलाचा फोन आला होता, आम्ही तासभर बोललो! त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून मला एका गोष्टीची तीव्र जाणीव झाली. वृद्ध आई-वडिलांना आपल्या पैशांपेक्षा किंवा महागड्या भेटवस्तूंपेक्षा जास्त गरज असते, ती फक्त आपल्या मुलांच्या आवाजाची. त्यांना फक्त दोनच शब्द हवे असतात, आई, जेवलीस का? आणि बाबा, तब्येत कशी आहे?
एक दिवस संध्याकाळी माझा मुलगा माझ्या शेजारी आला आणि म्हणाला, "आई, आजी तुला रोज फोन का करते ग?"
मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, "कारण तिला माझी काळजी वाटते."
त्यावर त्याने विचारलं, "मग तू आजीला रोज फोन का करत नाहीस?"
मुलाच्या त्या साध्या, निष्पाप प्रश्नाने माझं मन हलवून सोडलं. खरंच, आपल्याला जिवापाड प्रेम करणारी ही माणसं आयुष्यात कायमची नसतात.
"पण आपण मात्र ती नेहमीच आपल्यासोबत राहणार आहेत, अशा थाटात जगत असतो.का? कारण कधीतरी शेवटचा कॉल येणार आहे.नंतर कधीच कॉल येणार नाही. हे आपल्याला कधीच कळत नाही."
त्या रात्री मी एक पक्का निर्णय घेतला. दिवसातून अगदी रोज नाही जमलं, तरी एक दिवसाआड मी आईला फोन करणारच. फोन करून काही मोठ्या गोष्टी नाही बोलायच्या, फक्त प्रेमाने विचारायचं, कशी आहेस आई? कदाचित, ती दिवसभर याच चार शब्दांची वाट पाहत असते.
आजकाल आपल्या सगळ्यांच्या हातात महागडे मोबाईल आहेत, पण मनापासून होणारे संवाद खूप कमी झालेत. मेसेज करणं सोपं असतं, पण आवाजातली ती माया, ती आपुलकी कधीच मेसेजमध्ये येत नाही.
म्हणूनच, आज जर तुम्हाला वेळ मिळाला, तर नक्की एक फोन करा. आईला करा, बाबांना करा, भाऊ-बहिणीला किंवा एखाद्या जुन्या मित्राला करा. कारण कधीकधी एक फोन म्हणजे फक्त टाईमपास नसतो, ती काळजी असते, ते प्रेम असतं, ती आठवण असते. तुमच्यासाठी तो कदाचित फक्त दोन मिनिटांचा एक साधा फोन असेल, पण समोरच्या व्यक्तीसाठी तो त्यांच्या संपूर्ण दिवसातला सर्वात आनंदाचा क्षण असू शकतो. जमलं तर आजच फोन करा.
सौ तृप्ती देव
भिलाई छत्तीसगड
@copyright
कथा आवडल्यास नक्की शेअर करा नावासोबत खोडखाड. करू नका.
#🎭Whatsapp status #एक छोटीशी लघुकथा #✍️लघुकथा