ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास वाचाल तर वाचाल *येथे कर्मावर नाही, नशिबावरच विश्वास ठेवावा लागेल* ---------------------------------- नियतीचा खेळ कसा असतो, हे "फाल्गुन बिनेनडिक" यांच्या आयुष्याने दाखवून दिलं आहे. '१०-फेब्रुवारी १९८५' रोजी नागपूरमध्ये जन्मलेल्या एका नवजात बाळाच्या नशिबी अवघ्या तीन दिवसांतच पोरकेपण आलं. रक्ताच्या नात्यांनी पाठ फिरवली आणि तो चिमुकला जीव नागपूरमधील एका अनाथाश्रमात दाखल झाला. आयुष्याची सुरुवातच अनिश्चिततेने झाली होती. सुमारे एक महिना त्या अनाथाश्रमात राहिल्यानंतर, नेदरलँड्समधील एका डच जोडप्याने त्या बाळाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. केवळ कायदेशीर जबाबदारी म्हणून नव्हे, तर मनापासून स्वीकारून त्यांनी त्या बाळाला सातासमुद्रापार नेदरलँड्सला नेलं. तिथे फाल्गुनला फक्त एक घर मिळालं नाही, तर प्रेम, सुरक्षितता आणि उज्वल भविष्याची संधी मिळाली. आज, तब्बल ४१-वर्षांनंतर, तोच अनाथाश्रमातील बाळ नेदरलँड्समधील Heemstede या शहराचा "महापौर" म्हणून जबाबदारी सांभाळतो. नाव आहे — Falgun Binnendijk. परदेशात यश, प्रतिष्ठा आणि ओळख मिळवूनही त्यांच्या मनात आपल्या जन्मभूमीची ओढ कायम होती. याच ओढीपोटी फाल्गुन पुन्हा भारतात, आपल्या जीवनकहाणीच्या सुरुवातीच्या ठिकाणी म्हणजेच नागपूर येथे आले. इथला सर्वात भावूक क्षण म्हणजे, ज्या नर्सने त्या तान्हुल्या जीवाला पहिल्यांदा कवेत घेतलं होतं आणि फाल्गुन महिन्यात जन्म झाला म्हणून त्याचं नाव ‘फाल्गुन’ ठेवलं होतं, त्या नर्सची ४१ वर्षांनंतर झालेली भेट. त्या भेटीत वाहणारे आनंदाश्रू, कृतज्ञतेची भावना आणि शांत समाधान… सगळं काही शब्दांच्या पलीकडचं होतं. फाल्गुन यांचा प्रवास इथे थांबत नाही. ते आजही आपल्या 'जन्मदात्री आई'चा शोध घेत आहेत. कोणताही राग नाही, कोणतीही तक्रार नाही. फक्त एकच भावना आहे, ती म्हणजे "कृतज्ञता". त्यांना आपल्या आईला एवढंच सांगायचं आहे की, “तुझा मुलगा सुरक्षित आहे, प्रेमात वाढला आहे, आयुष्यात यशस्वी झाला आहे आणि आनंदी आहे.” या नात्याची पवित्रता जपत त्यांनी आपल्या मुलीचं नावही आपल्या जन्मदात्रीच्या नावावरून ठेवलं आहे. नागपूरच्या एका अनाथाश्रमातील पाळण्यापासून ते नेदरलँड्समधील शहराच्या नेतृत्वापर्यंतचा हा प्रवास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, 'तुमची सुरुवात कशी आहे, यावर तुमचं भविष्य ठरत नाही. जर सोबत प्रेम देणारी माणसं असतील आणि मनात जिद्द असेल, तर नियतीवर मात करणं अशक्य नाही'. फाल्गुन बिनेनडिक यांची ही कहाणी प्रत्येकासाठी आशा, मानवता आणि विश्वासाचा जिवंत पुरावा आहे.🙏🏻 🚩🕉️🙏🙏🕉️🚩