संघर्ष, जिद्द आणि कर्तृत्वाचा तेजस्वी दीप-:लक्ष्मण शिंदे #जनता प्रभाव वृत्तपत्र/न्यूज #जनता प्रभाव #जनता प्रभाव ब्रेकींग न्युज #जनता प्रभाव न्यूज #जनता प्रभाव जाहिरात
समाजात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांचे जीवन केवळ त्यांच्यापुरते मर्यादित राहत नाही, तर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. स्वर्गीय "लक्ष्मण साधू शिंदे" हे असेच एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. संघर्ष, जिद्द, प्रामाणिकपणा आणि साधेपणा यांचा सुंदर संगम असलेले त्यांचे जीवन हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी प्रवासाचे उत्तम उदाहरण आहे.
अत्यंत साध्या परिस्थितीत त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच आयुष्यातील कठीण परिस्थिती त्यांना अनुभवावी लागली. उसाच्या शेतात काम करणाऱ्या त्या मुलाच्या मनात मात्र मोठी स्वप्ने होती.आर्थिक परिस्थिती मर्यादित असली तरी शिक्षणाच्या जोरावर आयुष्यात मोठे काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्या मनात कायम होती.
शिक्षणासाठी ते पुण्यात आले. मात्र त्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कधी फी भरण्यासाठी पैसे नसत,तर कधी राहण्याची सोय नसे. काही वेळा बसस्थानकावर झोपण्याची वेळही त्यांच्यावर आली.परंतु या अडचणींनी त्यांची जिद्द कमी केली नाही.उलट प्रत्येक संकटाने त्यांना अधिक मजबूत बनवले.
आपली अफाट बुद्धिमत्त आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी पुण्यातील नामांकित "COEP अभियांत्रिकी महाविद्यालयातून BE" ही पदवी संपादन केली आणि पुढे 'MTech' सारखी उच्च पदवीही मिळवली. या प्रवासात त्यांनी अनेक अडथळे पार केले; पण प्रत्येक अडथळ्याला त्यांनी संधीमध्ये रूपांतरित केले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी केवळ नोकरीत समाधान न मानता स्वतःचा उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांची दूरदृष्टी, मेहनत आणि चिकाटी यांच्या बळावर "रत्नदीप कास्टिंग्स " हा उद्योग उभा राहिला. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या; पण त्यांनी कधी हार मानली नाही.
आज 'रत्नदीप कास्टिंग्स'ही कंपनी उद्योगविश्वात आपली ठाम ओळख निर्माण करून उभी आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठीही या उद्योगाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. परदेशातही या कंपनीने आपले स्थान निर्माण केले आहे. एका साध्या कुटुंबातून आलेल्या व्यक्तीने आपल्या जिद्दीच्या जोरावर उभारलेला हा उद्योग अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतो.
मात्र लक्ष्मण शिंदे यांचे मोठेपण केवळ त्यांच्या उद्योगामुळे नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांचा साधेपणा आणि माणुसकी. यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही त्यांच्या स्वभावात कधीही गर्व किंवा अहंकार दिसला नाही.ते नेहमी मदतीसाठी तत्पर असणारे, प्रेमळ आणि कुटुंबवत्सल व्यक्ती होते. त्यांच्या उद्योगातून अनेक गोरगरिबांना रोजगार मिळाला आणि अनेक कुटुंबांना आधार मिळाला.एखाद्या माणसाचे खरे मोठेपण त्याने इतरांच्या आयुष्यात निर्माण केलेल्या सकारात्मक बदलातून दिसते, आणि हेच गुण लक्ष्मण शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्टपणे दिसून येतात.
दुर्दैवाने त्यांच्या अकाली निधनाने शिंदे कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला.अशा प्रसंगी अनेक कुटुंबे खचून जातात परंतु शिंदे कुटुंबाने धैर्य आणि संयमाने परिस्थितीचा सामना केला.त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे आई, भाऊ-बहिणी यांच्यासोबतच पत्नी-रत्नप्रभा शिंदे,मुलगा-अमेय शिंदे आणि मुलगी*अदिती शिंदे असा परिवार आहे.
धर्मपत्नी रत्नप्रभा मॅडम यांच्या संयमी आणि ठाम मार्गदर्शनाखाली मुलगी अदिती आणि मुलगा अमेय यांनी अत्यंत मोठ्या हिमतीने उद्योगाची जबाबदारी स्वीकारली. अदिती ही MBA शिक्षण घेतलेली असून तिच्या शांत,ठाम आणि प्रभावी निर्णयक्षमतेमुळे उद्योगाच्या व्यवस्थापनात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. उत्कृष्ट संवादकौशल्य आणि दूरदृष्टी यामुळे ती उद्योगाच्या पुढील वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
सुपुत्र-अमेय शिंदे जो नुकताच BE पूर्ण करून उद्योगात उतरला आहे,त्यानेही अत्यंत समर्पणाने कामाला सुरुवात केली आहे.पित्याकडून मिळालेली कामात झोकून देण्याची वृत्ती आणि उद्योगाबद्दलची बांधिलकी यामुळे तोही या वारशाला समर्थपणे पुढे नेत आहे.
एका बाजूला पित्याच्या जाण्याचे अथांग दुःख आणि दुसऱ्या बाजूला उद्योग विस्कळीत होऊ न देण्याचे मोठे आव्हान — ही दोन्ही आव्हाने या तरुण पिढीने परिपक्वतेने पेलली आहेत.आज उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उद्योजक अदिती आणि अमेय यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करताना दिसतात.
साहेबांची उणीव कधीच भरून निघू शकत नाही. मात्र त्यांच्या पुढच्या पिढीने ज्या धैर्याने आणि जबाबदारीने उद्योगाचा वारसा पुढे नेला आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.लक्ष्मण शिंदे यांचे संपूर्ण जीवन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देऊन जाते — परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते.आज स्व.लक्ष्मण शिंदे आपल्यात नसले तरी त्यांचे विचार,त्यांचे कर्तृत्व आणि त्यांनी उभा केलेला आदर्श कायम आपल्या मार्गदर्शक दीपस्तंभासारखा राहील.
जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आकाशात आहेत, तोपर्यंत "लक्ष्मण शिंदे"हे नाव उद्योगविश्वात तेजाने झळकत राहील. हीच त्यांना खरी आणि कृतज्ञ आदरांजली ठरेल.



