ShareChat
click to see wallet page
search
महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा येथील जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कुटुंबाचे वारस श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, ज्यांचे विचार तुम्ही ऐकले ते शेजारच्या कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार, श्री. प्रविण गायकवाड, ज्यांचे आताच विचार आपण ऐकले, ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या बरोबर काम करण्याचा निर्धार केला ते नारायण आबा पाटील, उत्तमराव जानकर, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख अभिजीत पाटील, अभयसिंह जगताप, सुभाष गुळवे, संतोष वारे, सौ. सविताराजे भोसले, सुधाकर रावल, संघटनेचे अध्यक्ष आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे, वैभवराजे जगताप, उत्तम कांबळे, शिवराज जगताप, देवानंद बागल, आप्पासाहेब, अतुल पाटील असे अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख मी याठिकाणी करतोय. जर काही राहिले तर त्याबद्दल क्षमा व्यक्त करतो. उपस्थित बंधु भगिनींनो, आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सगळेजण मोठ्या संख्येने याठिकाणी जमला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी या सगळ्यांच्या वतीने माढा लोकसभा निवडणूक लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि धैर्यशील मोहिते पाटील या तरूणाला ही संधी आपण सगळ्यांनी द्यायचा निर्णय घेतला. मला आनंद आहे की, या कामाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करमाळ्याचे अध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी पाठिंबा दिला, संभाजी ब्रिगेडच्या वतीने सचिन जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य अण्णासाहेब सुपनवर यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. या सगळ्यांचा मी अंतःकरणापासून आभारी आहे. एका तरूण माणसाला भारताच्या लोकसभेमध्ये पाठवण्याचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला, त्यामुळे तुम्हा लोकांचा पाठिंबा मिळतोय. हा तालुका महाराष्ट्रातला एकेकाळचा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. एक काळ असा होता की, माझा इथे अधिक संबंध होता. १९७२ साली मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आणि पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जाण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मला आठवतंय की, करमाळ्यात आल्यानंतर इथले ज्येष्ठ नेते, सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते नामदेवराव जगताप आणि माळशिरस तालुक्याचे नेतृत्व करणारे दुसरे ज्येष्ठ नेते शंकरराव मोहिते पाटील या सगळ्यांशी आम्हा लोकांचा सुसंवाद असायचा. मी अनेकदा याठिकाणी त्या काळात आलो आहे. इथे कृषी बाजार समिती आहे, त्यामध्ये एक लहानसं गेस्ट हाऊस होतं, नामदेवराव तिथे असायचे. त्या गेस्ट हाऊसमध्ये मी अनेकदा गेलो. जिल्ह्याच्या प्रश्नासंबंधी चर्चा केली. आणि दुष्काळाच्या संकटातून लोकांना बाहेर कसं काढायचं, याचा विचार आम्ही लोकांनी या तालुक्यामध्ये केला होता. तो दुष्काळ एवढा मोठा होता की, ५ लाख लोकांना रोजगार हमीचं काम देण्याचा संकल्प होता. पण या जिल्ह्यातील नेत्यांच्या मदतीने नामदेवरावजी जगताप, शंकरराव मोहिते पाटील, विठ्ठलराव शिंदे, औदुंबर आण्णा पाटील, अनेकांची नावं घेता येतील, या लोकांच्या सहकार्याने या दुष्काळाला तोंड द्यायचं काम आम्ही लोकांनी याठिकाणी केलं होतं. मला आठवतंय की, जनावराला चारा नव्हता. जनावराचा चारा म्हणजे फक्त ऊसाचं वाढं, ऊसाचं वाढं जनावरांना घालून त्यांच्या तोंडामध्ये त्रास व्हायला लागला होता. जनावरं हा चारा खात नव्हते. शेवटी आम्ही लोकांनी गुजरातमधून अमूल नावाची कृषी संस्था आहे, त्या संस्थेच्या प्रमुख लोकांना आम्ही निमंत्रण दिलं. इथली स्थिती दाखवली आणि त्यांच्याकडून गुजरातमधून इथं आम्ही चारा आणला. जनावरांच्या कॅम्पमध्ये या चाऱ्याची व्यवस्था केली. आणि त्याचवेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. मी त्याची आठवण यासाठी करून देतो, गुजरातची दुधाची संस्था महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या जनावरांना चारा देण्यासाठी आम्हाला मदत त्यांनी केली. आम्ही त्यांचे आभारी होतो. आणि महाराष्ट्रात तुम्ही का मदत केली म्हणून त्या अमूल संस्थेचे जे अध्यक्ष होते, त्यांच्यावर मोदींच्या राजवटीमध्ये खटला भरला गेला. काय गुन्हा केला त्यांनी…? इथल्या दुष्काळग्रस्त लोकांच्या जनावरांना चारा द्यायचं काम त्यांनी केलं. आणि ते करणाऱ्यांवर खटला भरणारे त्यावेळचे मुख्यमंत्री हे आजचे प्रधानमंत्री आहेत. शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील, त्या आम्ही करू देणार नाही हेच त्यांनी दाखवली. जिरायत भागामध्ये अनेक पिकं आहेत. कांदा एक अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. तुम्ही आजच्या वर्तमानपत्रातली माहिती वाचा, ज्या कांद्याला दोन पैसे बाहेर मिळत होते, परदेशात कांदा निर्यात करत होते, त्याला बंदी घातली आणि दोन पैसे कांदा उत्पादकांना जे मिळत होते, ते थांबवण्याचे पाप मोदीच्या सरकारने या ठिकाणी केले. लोकांनी अनेकांनी याबद्दलच्या तक्रारी केल्या टीका टिप्पणी केली, काही ठिकाणी मोर्चे काढले आणि काल त्यांनी नवीन निकाल घेतला. काय निकाल घेतला? कांदा निर्यात करायला परवानगी आहे, पण जो लाल कांदा आहे, त्याला नाही. फक्त पांढऱ्या कांद्याला घेतली आहे. तुम्ही सगळेजण शेतीच्या धंद्यातले लोक आहात, शंभरातले किती टक्के लोक पांढऱ्या कांद्याचे पीक घेतात? १० टक्के लोकसुद्धा पांढऱ्या कांद्याचे पीक घेत नाहीत. आपल्या सगळ्या भागांमध्ये तांबडा कांदा हा पिकवला जातो, त्या तांबड्या कांद्याची निर्यात आधी थांबवली आणि फक्त जो कांदा गुजरातमध्ये पिकतो, त्याची निर्यात करण्याबद्दलची संमती दिली. आज शेतीमालाच्या किंमती हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. एकच गोष्ट सांगतो की, उत्पादन खर्चाचा विचार करून जी काही किंमत शेतकऱ्याला द्यायला हवी. ती देण्याचा निकाल त्या ठिकाणी घेतला पाहिजे. पण तो घेतला जात नाही. त्याचा परिणाम आज कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं दुखणं झालंय. माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं. शेती खात्याचं काम हातामध्ये घेतलं आणि वर्तमानपत्रात बातमी आली की, यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मनमोहन सिंह प्रधानमंत्री होते. ती बातमी वाचली. मी अस्वस्थ झालो. मनमोहन सिंहांना सांगितलं की, बळीराजा या देशातला आत्महत्या करायला लागला, तर कुठंतरी आपलं चुकतंय, कुठंतरी धोरणात बदल केला पाहिजे. त्यांना विनंती केली की, ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घरी आपण जाऊया. प्रधानमंत्री येतो म्हणाले. दिल्लीवरून आम्ही स्पेशल विमानाने नागपूरला आलो आणि तिथून यवतमाळला गेलो. आणि ज्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या घरी गेलो. माऊली होती, दोन लहान मुलं होती, एक लग्न ठरलेली मुलगी होती. त्या माऊलीला विचारलं. तुझ्या मालकाने आत्महत्या का केली ? तिने सांगितलं, बँकेचं कर्ज होतं. जो नियमित व्याज देतो, कर्ज फेडतो त्याचा व्याजाचा दर त्यावेळी १२ टक्क्यावरून ६ टक्क्यांवर आणला. आणि शेतकऱ्याला मदत करण्याचा निकाल हा त्याठिकाणी घेतला होता. पण आजच्या प्रधानमंत्र्यांना त्यासंबंधीची आस्था नाही. ते टिका टिपण्णी करतात, अनेक चुकीच्या गोष्टी करतात. आज मोदींचं राज्य आहे, एखाद्या हुकूमशाहाचं राज्य असावं असाच ते राज्यकारभार करतात. दोनच उदाहरणं तुम्हाला देतो. झारखंड नावाचं राज्य आहे. आदिवासींचं राज्य आहे. आदिवासी मुख्यमंत्री आहेत आणि आदिवासींचे प्रश्न त्यांनी मांडले. आणि भारत सरकार ते सोडवत नाही म्हटल्यावर त्यांनी मोदींवर टिका केली. आज त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांचे नाव. देशातलं एक चांगलं राज्य चालवणारा एक मुख्यंमत्री. आज जेलमध्ये आहेत. कशासाठी तर मोदींच्यावर टिका केली म्हणून… लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट तुम्हाला पटली नाही तर ती योग्य नाही हे सांगण्याचा तुमचा अधिकार आहे. त्यासाठी टिका टिपण्णी करण्याचाही तुमचा अधिकार आहे. पण टिका टिपण्णी केली म्हणून मुख्यमंत्र्यांनाही तुरुंगात टाकण्याचा निकाल हा जर त्याठिकाणी घेतला जात असेल, तर माझ्या मते या प्रकारची हुकूमशाही वेळीच आवरली नाही, तर या देशामध्ये तुम्हाला मला बोलता यायचं नाही, स्वातंत्र्यावर गदा येईल, तुमचा अधिकार नष्ट होईल आणि ते टाळायचं असेल तर आज मोदी साहेबांचा पराभव केला पाहिजे. आज मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या वतीने धैर्यशील मोहितेंची उमेदवारी आम्ही सर्व लोकांनी दिली. त्यांना विजयी करणं याचा अर्थ मोदींचा पराभव करणं आहे. आणि मोदींचा पराभव करणं ही राष्ट्रीय गरज आहे. त्या गरजेच्या पूर्ततेसाठी आपण एकत्र राहून निकाल घेतला पाहिजे. या जिल्ह्यात कारखाने वाढले, पाण्याचे काही प्रश्न असून त्यावर चर्चा करायची गरज आहे. माझ्याकडे एक निवेदन आलं, ते निवेदन रेटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समिती, तालुका करमाळा यांच्या वतीने आलेलं आहे. ३०-४० गावांचा हा प्रश्न आहे, त्या गावांना पाणी मिळत नाही. रेटेवाडीतील लोकांवर अजूनही हे दुष्काळाचं संकट आहे आणि त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आचारसंहिता सुरु झाल्याने आज निकाल घेतला जाणार नाही. आणि म्हणून रेटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समिती याचे जे कुणी सहकारी असतील, त्यांनी या सभेनंतर मला भेटावं, मला माहिती द्यावी आणि निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर तुम्ही मुंबईला या आणि आपण एकत्र बसू आणि या प्रश्नाची सोडवणूक कशी होईल याची आपण काळजी घेऊ. हा विश्वास मी याठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो. मला याचा आनंद आहे की, नारायण पाटलांनी आपल्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. मी बघतोय की, ते अनेक वर्षांपासून काम करत आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही त्यांना निवडून दिलं होतं. आपण संधी दिली म्हणून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपली रजा घेतो, जय हिंद, जय महाराष्ट्र ! #sharadpawar #pawarspeaks #शरद पवार
sharadpawar - माढा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरदचंद्र प उद्धव बाळासाहेब ठाकरे , शेतकरी कामगार पक्ष, आम आघाडीचे अधिकृत उमेदवार महात  माढा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरदचंद्र प उद्धव बाळासाहेब ठाकरे , शेतकरी कामगार पक्ष, आम आघाडीचे अधिकृत उमेदवार महात - ShareChat