ShareChat
click to see wallet page
search
*भयानक रस म्हणजे - अस्तित्वाच्या धोक्याची जाणीव करून देणाऱ्या भावनेचा सखोल अनुभव* भयानक रस म्हणजे केवळ भीती किंवा दहशत नव्हे—तो अज्ञाताचा सामना करताना मनात निर्माण होणाऱ्या असुरक्षिततेचा अनुभव आहे. नाट्यशास्त्र मध्ये वर्णिलेल्या नवरसांमध्ये भयानक रसाचा स्थायीभाव “भीती” (भय) आहे; पण ही भीती फक्त पळून जाण्याची नसते—ती आपल्याला सजग, सतर्क आणि अंतर्मुख करणारी असते. कधी कधी भीती ही चांगलं कामही करते भीतीमुळे पुढची येणारी संकटं टळू शकतात. लहान मुलांना एखादी भीती दाखवली तर ती त्या गोष्टी करत नाहीत म्हणजेच त्यापासून त्यांचे रक्षण होते असाच अर्थ पालक घेतात. त्याचबरोबर ही *भीती आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला भाग पाडणारी शक्ती देखील ठरते.* भयानक रसाचा उगम “अज्ञात” आणि “असुरक्षितता” यामध्ये आहे. जीविताला किंवा अस्तित्वाला धोका वाटणे, अंधार, एकटेपणा, अनिश्चितता, अचानक घडणाऱ्या घटना, आपल्या नियंत्रणाबाहेरील परिस्थिती ही भीती मनात दडलेली असते आणि योग्य परिस्थितीत ती तीव्र रूप धारण करते. पण हीच भीती अनेकदा आपल्याला सांगते—“थांब, विचार कर”, “परिस्थिती समजून घे”, आणि “आता पुढे जाणं योग्य आहे का?” म्हणजेच *भयानक रस आपल्याला अंध धाडसापासून वाचवतो आणि विवेकाने वागायला शिकवतो.* भयानक रस समजून घेताना आपण काली किंवा भैरव यांसारख्या उग्र रूपांचा विचार करतो. ही रूपे पाहताना मनात भीती निर्माण होते, पण त्यामागे एक गूढ तत्त्वज्ञान दडलेले आहे, भीतीद्वारे अहंकाराचा नाश, अज्ञाताच्या शक्तीची जाणीव,जीवनाच्या क्षणभंगुरतेची आठवण ही रूपे आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीत, तर “जागृत” करण्यासाठी आहेत. त्या आपल्याला सांगतात—अज्ञाताला घाबरू नका, समजून घ्या; भीती ही अंत नसून परिवर्तनाची सुरुवात आहे. भयानक रसाचे तत्त्वज्ञान फक्त नाट्य किंवा मानसशास्त्रापुरते मर्यादित नाही; ते इतिहासातही स्पष्टपणे दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे याचे अत्यंत प्रभावी उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी अनेक वेळा परिस्थिती प्रतिकूल असताना थेट संघर्ष टाळला. योग्य वेळी दोन पावलं मागे घेतली आणि योग्य क्षणी पुन्हा जोरदार प्रत्युत्तर दिलं. हेच तत्त्वज्ञान आपल्याला सांगतं, “डर के आगे जीत है” — पण “जान है तो जहान है” हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच अंध धाडस न करता, भीतीचा योग्य उपयोग करून रणनीती आखणे—हेच खरे शौर्य आहे. *भयानक रस इथे कमजोरी नसून, योग्य निर्णय घेण्याची सुरुवात ठरतो.* मानसशास्त्राच्या दृष्टीने “फाइट, फ्लाइट किंवा फ्रीज” प्रतिक्रिया निर्माण होणे हे आपल्याला धोक्यापासून वाचवते, परिस्थितीचा वेगाने आढावा घ्यायला भाग पाडते परंतु अति भीती आत्मविश्वास कमी करते, चिंता आणि तणाव वाढवते, जीवनात पुढे जाण्याला अडथळा ठरते खरा प्रश्न असा असतो—भीती आल्यावर आपण काय करतो? काही जण पळतात, काही अति धाडस करतात; पण शहाणे लोक थांबून विचार करतात आणि योग्य निर्णय घेतात. या भीतीचा चांगला परिणाम नात्यांमध्ये काळजी आणि जपणूक वाढते, चुकीपासून दूर राहण्याची प्रवृत्ती, जबाबदारीची भावना वाढते.. पण या भीतीचा विपरीत परिणाम म्हणजे नात्यामध्ये असुरक्षितता आणि संशय, अति अवलंबित्व, मालकी हक्क, संवादात दडपण आणि भीती. *भीती जर मर्यादेत असेल, तर ती नात्यांना सुरक्षित ठेवते; पण अति झाली तर नातं गुदमरते.* भीती ही शत्रू नाही—ती चेतावणी आणि मार्गदर्शक आहे. ती आपल्याला शिकवते.. कधी पुढे जायचं, कधी थांबायचं आणि कधी दोन पावलं मागे यायचं.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखेच *जीवनात योग्य वेळी माघार अन योग्य वेळी प्रहार* आणि *“जिवंत राहून जिंकण्याची” भूमिका हे तत्त्वज्ञान स्वीकारणं म्हणजेच खऱ्या अर्थाने परिपक्वता.* भयानक रस म्हणजे माणसाच्या अंतर्मनातील एक गूढ, सजग आणि मार्गदर्शक शक्ती. तो आपल्याला घाबरवतो, पण त्याच वेळी शिकवतो, अज्ञाताचा आदर करा, भीतीला समजून घ्या आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या “जिथे अज्ञात आहे, तिथे भीती असते; जिथे भीती आहे, तिथे विचार आहे; जिथे विचार आहे, तिथे योग्य निर्णय आहे; आणि जिथे योग्य निर्णय आहे, तिथेच खरी विजयाची सुरुवात आहे.” © ॲड. जितेश पोतदार #☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - अखक अखक - ShareChat