माझं काय चुकलं? #✍🏽 माझ्या लेखणीतून
मी सौ वैशाली सुरेश खाडे. वय वर्षे तेहतीस. लग्न झालंय. फक्त आठच दिवस झालेत. फक्त आठ. आता हे आठ दिवस मानसिक स्तरावर द्वंदाचे असले तरी त्यात भविष्याच्या सुखाची साखर पेरणी झालीय. त्यामुळे निश्चित आहे. बऱ्याच लोकांची नाराजी पत्करावी लागली.शिव्याशाप मिळाले. तळतळाट मिळला.फिकीर नाही.मी खंबीर आहे.
मी एक साधी सामान्य मुलगी. दिसायला अप्सरा वगैरे अशी काही नाही. सामान्य सावळ रूप.चेहऱ्याची ठेवूण बऱ्यापैकी.पण आकर्षक व्यक्तिमत्व असं नाहीच की कुणीही जाताना वळून बघावं असं.
मी निर्लज्ज नाही पण नाईलाजानं करावं लागतं.
माझे आई बाबा दहा वर्षापासून माझं लग्न ठरवतात. तिनशे स्थळं काटेकोरपणे पाहिली गेली.शेवटी नकारघंटा. तिहीआमच्याकडूनच.
माझे आई-बाबा एवढे चाणाक्ष की ज्या गोष्टी दुर्बिणीतून दिसत नाहीत त्या त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसतात. मी बघताना नवरा एक माणूस म्हणून बघते. पण माझ्या आई-वडिलांना तो शत्रू समान वाटतो. कां ते समजत नाही. खूप म्हणजे खूपच अपेक्षा माझ्या होणार्या नवऱ्या विषयी!
एखादं स्थळ यावं. नवरा मुलगा गोरा गोमटा, देखणा असावा! माझ्या मनात भरावा!अपेक्षा वाढाव्यात! स्वप्नात रमावं! आणि मग माझ्या आई-बाबांनी स्वप्न कुस्करून टाकावं असं घडत असतं. माझ्या सुकुमार मनावर एवढे परिणाम झालेत की कधी माझं लग्न होईल असं मला वाटत नाही.
माझे आई-बाबा परिस्थितीशी कुठलीही तडजोड करायला तयार नाहीत. त्यांच्या काय अपेक्षा आहेत माहीत नाहीत.कितीतरी चांगली स्थळ नाकारली. काही अगदी क्षूल्लक बाबीसाठी. त्यांच्या मनात आहे ते समजत नाही. माझं लग्न करायचं की नाही समजत नाही.मी मात्र अधांतरी.
मला एक साधा भोळा मुलगा नवरा म्हणून पाहिजे होता.पोटापुरता कमावणारा.सामान्य दिसणारा पण स्वभाव मात्र राजा सारखा असावा! आणि अपेक्षा नाहीत. मला खात्री आहे जर तो कधी कमी पडला तर मी खंबीर होऊन त्याला साथ देईन.त्याच्याबरोबर काम करेन. त्याला आधार देईन आणि त्याच्याबरोबर न कचरता आयुष्य काढीन.
आई बाबांच्या नजरेत मुलाचे दोष खूप असतात. एकापेक्षा एक.ऐकण्यासारखे आहेत. आता ऐका त्यांचा अभिप्राय. आमच्या माता पित्याकडूनच,
"थोडा बावळट वाटतो."
"चालताना थोडा लंगडल्यासारखा वाटतो"
"केस फार विरळआहेत."
"त्याची नोकरी परमंनंट नाही."
"थोड्या खालच्या जातीतला वाटतो."
"त्याच्या बहिणीने पळून जाऊन परजातीय पुरुषाशी लग्न केले."
"लग्नाच्या दोन बहिणी आहेत.."
"त्याचे किराणा मालाचे दुकान आहे म्हणे पण काय उपयोग?त्या दुकानात हा माशा मारत बसलेला असतो."
"वारंवार खोकतोय.रोगट वाटतोय."
"उंचीला जरा कमी आहे."
"कुंडली जुळत नाही."
एवढं सगळं झाल्यानंतर माझ्या नातेवाईकाच्याकडून मी काय अपेक्षा कराव्यात ते लक्षात येतेय. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नवरा रितिक रोशन सारखा देखना असावा! अंबानी सारखा श्रीमंत असावा! भिमासारखा तगडा असावा! आणि युधिष्ठरा सारखा स्वभाव असावा!
असा मुलगा मिळेल का मला? माझ्या अपेक्षा नाहीत तेवढ्या. आता ह्या नातेवाइकांची अपेक्षा बघितल्यानंतर मी काय करायला पाहिजे? मला थोडं स्वार्थी व्हायला पाहिजे.मला वेगळा विचार करायला पाहिजे.मला माझं घर हवंय. मला माझा संसार हवाय. मला माझा साधा भोळा नवरा हवाय. मी ठरवलं. धाडस करायचं. द्वंद करायचं.नाईलाज असतो.
आणि खरच मी एका मुलाच्या प्रेमात पडले. कळत नकळत. माझ्या ऑफिसात होता तो. त्याच्यात मी माझ्या तीन वर्षाचं अंतर होतं. एकदम हिरो नसला तरी बरा होता.स्वभावानं राजा होता.
मी ठरवलं त्याच्याशीच लग्न करेन.कुंडली कशाला पाहिजे?
मी घरांमध्ये बॉम्बस्फोट केला. अपेक्षेप्रमाणे झालं आईनं डोकं बडवलं.बाबानी पाय आपटले. सुसंवाद मिटला. फक्त फटाके आणि बॉम्बगोळे.
"आपल्याला पसंत नाही."
"का बरं?"
"हलक्या जातीचा आहे."
"देशाला स्वातंत्र्य मिळून बहातर वर्षे झाली तरी अजून जातीमध्ये अडकलाय ?शेवटी एक चांगला माणूस आहे ना तो?"
"माणसं शेण घालतील आमच्या तोंडात."
"कोण माणसं? कुठली माणसं ? शेण तर तुम्ही आताच खातात.."
खूप मोठा हल्ला कल्लोळ. विस्कटाविस्कटी. फेकाफेकी. वातावरण चांगलेच तापले.
म्हणे माणसं. हीच माणसं आजारी आहे असं समजलं की चौकशी सुद्धा करत नाहीत.कधी रस्त्यात भेटले की विचारतात ,"बर आहे कां.काळजी घ्या. मदत लागली तर कधीही हाक मारा?"
घर शांत व्हायला खूप दिवस लागले.
परत एक स्थळ आले आणि मी खंबीर झाले.त्यांच्याकडून होत असेल तर काय हरकत नाही पण त्यांना पसंत पडला पाहिजे. कुणाला काही त्रास न होता होईल तेवढे करायचे ठरवले
खूप चांगला मुलगा होता आवडला मला.
दुसर्या दिवशी त्यांचा नकार.
"मुलगी फारशी चांगली नाही.मुलग्याला शोभत नाही"
नंतर दुसरं स्थळ.
खर्चाच्या अपेक्षा जास्त होत्या.
पुढचे स्थळ.
"मुलगी अंगाने किरकोळ आहे."
परत आलेले स्थळ
"जातीत बसत नाही.आमची जात उच्च आहे."
असंच वर्ष गेलं.कित्येक चांगले स्थळ आईबापांनी नाकारले. मी विचार केला.आता थांबायचं नाही. संग्राम करायचा.द्वंद करायचं.आपले हित साधायचे.कुणाला कांहीं त्रास न देता आपणच बघायचं.
सुरज...म्हणजे माझा होणारा नवरा खंबीर झाला.
तो...त्याच्या घरची काही मंडळी आणि ऑफिसातले काही सहकारी सर्व मिळून धार्मिक स्थळी गेलो. लग्न उरकून टाकलं.
मी सुटले. समाधानी झाले. घरची आठवण झाली पण एवढा पहाडासारखा नवरा असताना मला काहीही काळजी नव्हती.
आई बाबांना सांगणं कर्तव्य होते.सुरज बरोबर घरी गेले. मनाला वाटत होतं तसंच झालं.
बाबा चिडले. कुऱ्हाड हातात घेतली.मारणार होते की माहीत नाही पण कुणीतरी ती काढून घेतली.आई पुढे झाली आणि माझ्या गालावर चपराकी मारायला सुरुवात केली. माझं काही चालत नव्हत.
सूरज म्हणाला,
"एस्क्युज मी, मी नवरा आहे तिचा. माझ्या बायकोला असं कोणी मारलेलं मला सहन होणार नाही.तेव्हा आपला आशीर्वाद मिळत नसेल तर काही हरकत नाही पण हा आचरटपणा मला आवडणार नाही आम्ही परत जातो."
मी सुरज बरोबर त्याच्या घरी आले..
आता सुखात आहे मी. सुरज किती काळजी घेतोय.माझी विशेषतः माझ्या मनाला झालेल्या जखमेची खूप काळजी घेतोय. पहिले नाते तुटले.मी कोसळले.मग खंबीर झाले.मला अजिबात वाईट वाटत नाही.कारण मनासारखा नवरा माझ्यासोबत आहे. त्याच्याशी मला संसार करायचा आहे.
आता सांगा माझं काही चुकलं का?

