#JKK_Weekly_News_Bulletin
माझंही मत;
काँग्रेस पक्ष आता नवे प्रवक्ते नेमणार...?;
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!;
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
साधारणपणे प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रवक्त हा त्या पक्षाचा चेहरा असतो असे म्हटले तरी वावगे ठरू नये. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे अगदी विभाग स्तरावर प्रवक्ते हे असतातच. त्यातले अनेक प्रवक्ते हे आपल्याला सातत्याने वृत्तवाहिन्यांवर दिसत असतात.
काँग्रेस पक्षाचे अतुल लोंढे, अनंत गाडगीळ, सचिन सावंत, हनुमंत जगताप असे प्रवक्ते आपण नेहमी बघतो. मात्र पक्षाला ते सध्या पुरेसे वाटत नाहीत अशी माहिती कानावर आली आहे. त्यामुळेच पक्षाने आता पक्षाबाहेरचे पत्रकार आणि अभ्यासक प्रवक्ते म्हणून नेमायचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे, नव्हे अशी कुजबुज कानावर आली आहे. त्यासाठी पक्ष लवकरच समाजमाध्यमांवर जाहिरातही देणार असल्याची माहिती कानावर आली आहे.
काँग्रेस पक्ष हा देशातला सर्वात जुना पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या पक्षाला अतिशय समृद्ध अशी परंपरा आहे. या पक्षाचे अनेक नेते हे देशाला नेतृत्व देणारे असे नेते होते. ते अभ्यासू होते बहुश्रुत आणि हजरजबाबी देखील होते. त्यामुळे पक्षाची बरेच वर्ष एकहाती सत्ता राहिली.
मात्र गेल्या काही वर्षांपासून पक्ष घसरणीला लागलेला दिसतो आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तर महाराष्ट्रात पक्षाला जेमतेम १६ जागा मिळाल्या. तिथे वाचकांना आठवण करून द्यायची आहे की १९७२ मध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना याच काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत २२३ जागा मिळाल्या होत्या. म्हणजे पक्षाची किती दयनीय अवस्था झाली आहे बघा.
म्हणूनच पक्षाने असे बाहेरून प्रवक्ते उधार घ्यायचे असे ठरवले असल्याचे कानावर आले आहे. खरे खोटे हर्षवर्धन सपकाळच जाणोत. मात्र हे खरे असेल तर पक्षाचे काही खरे नाही असेच म्हणावे लागेल.
याबाबतीत पक्षातीलच काही ज्येष्ठांना विचारले तेव्हा खाजगीत त्यांनी सांगितले की आजकाल आमच्या प्रवक्त्यांना काही बोलायला कामच राहिले नाही. कारण जे काही बोलायचे ते रोजच आमचे प्रदेशाध्यक्षच बोलून मोकळे होतात. मग आम्ही पत्रके तरी का काढायची आणि माध्यमांसमोर बोलायला तरी का जायचे असा प्रश्न प्रवक्ते खाजगीत विचारतात.
प्रस्तुत हा कोणत्याही संघटनेचा किंवा संस्थेचा प्रवक्ता हा माध्यमांशी संवाद साधण्यासाठीच असतो. कारण इतर मान्यवरांना वारंवार माध्यमांसमोर यायचे नसते. म्हणून मग ते काम प्रवक्तेच करत असतात. मात्र इथे हर्षवर्धन सपकाळच प्रवक्ते झालेले आहेत. त्यामुळे बाकी प्रवक्त्यांना काही कामच उरले नाही.
तरीही हर्षवर्धन सपकाळ यांना वाटते की नवी प्रवक्त्यांची फौज उभी केली पाहिजे. त्यासाठी पक्षात वर्षानुवर्ष झिजलेली जुनी खोडे काही कामाची नाहीत. आता नवीनच रक्त आणले पाहिजे. म्हणूनच त्यांनी असे नवे पत्रकार आणि अभ्यासक प्रवक्ते म्हणून आणायचा निर्णय घेतला असावा असा निष्कर्ष काढायला हरकत नाही.
मात्र काहीही झाले तरी हे असे प्रवक्ते काही पक्षाशी एकरूप झालेले राहणार नाहीत. ते आज इथे तर उद्या तिथे असेच राहतील, आणि ते कितपत इमानदारीने तुमच्या पक्षाचे प्रतिमा संवर्धन करतील हा देखील संशोधनाचाच विषय असेल.
तरीही हर्षवर्धन सपकाळ असे नवे प्रवक्ते आणून त्यांना प्रशिक्षण देऊन माध्यमांसमोर सोडण्याच्या विचारात आहेत. त्यासाठी त्यांना शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात ना.. त्याने तरी पक्षाची प्रतिमा सुधारावी आणि २०२९ मध्ये पक्षाच्या जागा सोळा वरून किमान ३२ वर तरी जाव्या अशी आशा करायला काही हरकत नाही..
अर्थात हे माझे मत झाले...
तुमचे मतही तुम्ही मांडू शकता....


