काल आणि परवा गॅस सिलिंडर साठी लागलेल्या रांगा,त्यामुळे होणारी जनतेची धावपळ,लोकांना गॅस सिलिंडर आता कधी मिळेल याची वाटणारी चिंता, गॅस एजन्सीज् मधील कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा,सिलिंडरचा काळा बाजार, उपाहार गृहे तात्पुरती बंद राहणार किंवा काही उपाहार गृहांत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची संख्या कमी होणार याची वेगवेगळ्या शहरांतील,वेगवेगळ्या उपाहारगृहांत जाऊन तेथील मालकांशी बोलून दिलेली रसभरीत माहिती...किती,किती वेगवेगळ्या अंगांनी टीव्ही चॅनल्स वाले गॅस तुडवडा हा विषय चावत आणि चालवत आहेत नाही?
त्यावरून मला माझ्या लहानपणीचे सुखद दिवस आठवले.लहानपणीचे दिवस म्हणजे आम्ही भावंडे दहा - पंधरा वर्षांची असतानाचे १९६० च्या दशकातील दिवस.त्या काळात देशाची बहुसंख्य जनता गहू,तांदूळ,साखर,रॉकेल या सारख्या जीवनावश्यक गोष्टींसाठी सरकारी रेशन व्यवस्थेवर अवलंबून असायची.त्यावेळच्या एका लोकप्रिय पंतप्रधानांनी देशातील अन्न टंचाईवर मात करण्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी जनतेने उपवास करावा असे आवाहन केले होते आणि फार मोठ्या प्रमाणावर लोक सोमवारी संध्याकाळी उपवास करत ही असत...रेशनवर अमेरिकेच्या मेहेरबानी ने तेव्हा पी एल ४८० या नावाच्या योजनेतून छान लाल गहू मिळत असे.त्याच्या पोळ्या प्रयत्नपूर्वक घशाखाली उतरवाव्या लागत. खरे खोटे माहित नाही,पण हा गहू म्हणे अमेरिकेतील शेतकरी तेथील पाळीव डुकरांना खायला घालण्यासाठी पिकवत असत आणि तोच भारताला ही पुरवला जात असे. पण तरीही जनता म्हणत असे की पूर्वी रेशनवर मिलो या नावाचे ज्वारी सारखे धान्य मिळत असे ते खाऊन दिवस काढण्यापेक्षा हा लाल बुंद का असेना गहू मिळतो आहे ते काय कमी आहे का? असे सहनशील होतो आम्ही.....कधीकधी घरात गृहपाठ करत बसलो असताना,किंवा जेवत असताना आमच्या वाडीतील कोणीतरी रेशन दुकानात तांदूळ,साखर, रॉकेल, असे काही आल्याची बातमी ओरडून सांगत असे मग घराघरांतून बायका,माझ्यासारख्या वयाची मुले हातातले काम किंवा जेवण अर्धवट टाकून,हातात पिशव्या, कॅन आणि रेशन कार्डे घेऊन आनंदाने रेशन दुकानाकडे धाव घेत असू आणि दुकानाबाहेर रांग लावत असू.मग कधी उन्हाचा तडाखा असो की पाऊस कोसळत असो आम्ही नेटाने तासंतास रांगेत उभे राहून रेशनवर जे मिळेल ते घेऊन येत असू.किती आनंदाचे दिवस असत तेव्हां.हो की नाही?
साधारण सत्तरच्या दशकात मुंबईत सिलिंडरमधून गॅस मिळू लागला.त्यावेळी सुद्धा गॅस वाल्याच्या गोडाऊन बाहेर रांगेत बराच वेळ उभे राहून प्रथम रिकामा सिलिंडर देणे आणि मग भरलेला सिलिंडर घरी आणणे हा उद्योग आम्ही भावंडांनी बरीच वर्षे केल्याचे आठवते.पण आम्ही कधी तक्रार नाही केली त्या बद्दल,कारण रांगेत तासनतास उभे राहिल्याशिवाय काही मिळणार नाही याची जनतेच्या अंगात तोपर्यंत चांगलीच मुरलेली संवय त्या काळात वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारांनी आम्हाला केव्हाच लावलेली होती.
किती छान,छान सोनेरी दिवस होते ना ते.रांग लावल्याशिवाय काहीही मिळणार नाही अशी शिस्त जनतेला लावणाऱ्या एकामागोमाग एक आलेल्या त्या वेळच्या काँग्रेस सरकारांचे किती आभार मानू नि किती नको असे होते; खास करून गेल्या अकरा वर्षांत एक दोन वेळाच अशी वेळ जनतेवर आल्यावर लगेच त्या साठी सरकारवर तुटून पडणाऱ्या राहुल गांधी,हर्षवर्धन सपकाळ आणि नाना पटोले सारख्या काँग्रेसी नेत्यांची या गॅस तुटवड्यामुळे सुरू झालेली कोल्हेकुई पाहून,ऐकून तर ते सोनेरी दिवस पुन्हा पुन्हा नजरेसमोर तरळू लागतात.
- *भालचंद्र श्री.पंडित.*
- #😭ईरान युद्ध के दिल दहला देने वाले दृश्य📽️🖼️ #🫨LPG के लिए मचा घमासान, देखें हालात🗞️