➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📙 *त्वचे बद्दल माहिती ?* 📙
शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? पंचेंद्रियातील सर्वात जागरूक इंद्रिय कोणते? सर्वात जास्त भोग कोणाच्या वाट्याला येतात? विविध रोग, वेदना, विविध रूपे कोणत्या अवयवाच्या वाट्याला येतात? या साऱ्याचे उत्तर एकच आहे, आपली त्वचा. अन्य प्रत्येक इंद्रियाचे आपण कोडकौतुक करतो. पण त्वचेची निगा राखणारा हजारात एखादाच. स्त्रियासुद्धा चेहरा, हात, पायांची निगा राखतील, पण संपूर्ण त्वचेची? म्हणूनच असे म्हणावे लागते की त्वचा हे पंचेंद्रियांनी उपेक्षित इंद्रिय आहे, पण अत्यंत उपयुक्त आहे. कसे, हे बघणेही आश्चर्यकारक ठरते.
दोन्ही डोळे शंभर टक्के निकामी झाले, नाकाने वास येईनासा झाला, ऐकू येणे बंद झाले, खाताना चव लागेनाशी झाली तरी चालू शकते. माणसाचे आयुष्य चालू राहते पण भाजल्यामुळे फक्त एक तृतीयांश त्वचा जरी नष्ट झाली तरी आयुष्याला धोका पोहोचतो.
शरीरावरची त्वचा चमत्कार म्हणावा इतक्या प्रकारे वेगवेगळी रूपे धारण करते. चेहऱ्यावरची अगदी पातळ, हातापायाच्या तळव्यांवर अजिबात केस नसलेली, डोक्यावर भरपूर केस उगवणारी त्वचा ही रुपे एका त्वचेचीच आहेत. स्पर्श व वेदना यांच्या बाबतीतही असाच फरक आढळतो. हातापायांची बोटांची टोके ही स्पर्श व वेदना यांबाबतीत सर्वात पुढारलेली आहेत. पाठ, नितंब येथे त्यामानाने दोन्हींची जाणीव कमी होते.
त्वचा अक्षरश: माहितीचा महापूर मेंदूकडे सतत पाठवत असते. हे काम झोपेतही चालू राहते. वाऱ्याची झुळूक, हवेतील तापमानातील बदल, ओले वा कोरडे यांची जाणीव, लहान मुंगीचाही स्पर्श, प्रेमळ स्पर्श, थप्पड, मऊ कापसाचा स्पर्श व धारदार वस्तूंचा स्पर्श, वाफेचा चटका व रसायनातील आम्ल वा अल्कली यांतील बदल जाणणे फक्त त्वचाच करत असते.
सामान्य भारतीयाची त्वचा एकूण १६ ते १७ चौरस फूट व वजनाने तीन किलोग्रॅम एवढी भरते. शास्त्रीयदृष्ट्या विचार केल्यास या विस्ताराचा व वजनाचा दुसरा अवयव शरीरात नाही. यावरून त्वचेचे महत्त्व लक्षात येते. संपूर्ण शरीराला आच्छादणारी त्वचा सलग असते. सलगपणाची जाणीव तिला भेगा पडतात किंवा ती फाटते तेव्हाच होते. त्वचा ही विलक्षण ताणक्षम (इलॅस्टिक) असते. जेमतेम चार इंचाच्या छेदातून मोठमोठी शस्त्रकर्मे डॉक्टर करू शकतात व पुन्हा टाके घालून ती जोडलीही जाऊ शकते. ही ताणशक्ती वयानुसार कमी होते व सुरकुत्या पडू लागतात. त्वचेखालची चरबी कमी होणे हेही एक कारण असते.
बाह्यत्वचेतील पेशींची झीज होऊन त्या सतत नष्ट होतात. त्यांची जागा नवीन पेशी घेतात. दर पंधरा दिवसांनी या पद्धतीत सर्व बाह्य त्वचा बदलते. अंगाचा मळ या स्वरूपात ती आपण पाहतो. त्वचेला रंग देणारे द्रव्य मेलॅनिन याच भागात असते. यामुळे अतिनील किरणांपासून आपले संरक्षण होते. बाह्यत्वचेत रक्तवाहिन्या नसतात, पण संवेदनातंतूंचे जाळे पसरलेले असते. मध्य त्वचेत केसांची मुळे, रक्तवाहिन्या व केशवाहिन्यांचे जाळे, वेदना व मज्जातंतूंचे जाळे असते. त्वचेचा ताण सहन करण्याची शक्ती याच भागावर ठरते. पापण्यांत हा भाग सर्वात पातळ, तर नितंबात सर्वांत जाड असतो.
अंतस्त्वचा म्हणजे सर्वात आतील थर हा स्नायू, चरबी, घामाच्या ग्रंथी, तेलाच्या ग्रंथी यांनी बनतो. याशिवाय मज्जातंतू व रक्तवाहिन्यांचे दाट जाळे येथे असतेच. शरीरावर येणारा घाम कमी जास्त करून मेंदू मार्फत शरीराचे तापमान कायम राखले जाते. गरम हवामानात जास्त घाम येऊन त्वचा थंड राखली जाते, तर थंडीत याउलट क्रिया घडते. त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी, त्वचेला तकाकी देण्यासाठी तेलकटपणाची गरज असते. हा तेलकटपणा घर्मग्रंथी किंवा सॅबीशियस ग्रंथींतून पाझरत राहतो. त्यामुळे बाह्य हवामानापासून त्वचेचे रक्षण होते. म्हणूनच अतिथंड हवामानात अंघोळ टाळून हा थर राखण्याचा प्रयत्न गिर्यारोहक करतात.
तीव्र भावनोद्रेक, शरीराला गंभीर इजा या दोन्हींचे परिणाम त्वचेवर तात्काळ दिसतात. संतापल्यास चेहरा लाल होणे व शरीर तापणे, भीतीने घाम फुटणे, हृदयविकारात प्रचंड घाम येणे, गंभीर आजारात अंग गार पडणे यांवरून त्वचा किती महत्त्वाची आहे, हे सहज लक्षात येते. मराठीत ज्यांना आपण पंचेंद्रिये म्हणतो, त्यांनाच आधुनिक वैद्यक ज्ञानेंद्रिये (सेन्स ऑर्गन्स) असे संबोधते. सर्वच अर्थांनी त्वचा त्यात महत्त्वाची ठरते. #🎓जनरल नॉलेज