#केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग
- पालखी मार्ग निरिक्षण
लाखो वारकऱ्यांची 'वारी' सुखकर व आल्हाददायक व्हावी, या उद्देशाने पुनर्विकास करण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-९६५) कामाचे आज निरिक्षण केले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) हा आळंदी ते पंढरपूर आणि पुढे मोहोळ ते वाखरी असा सुमारे २३४ किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे, जो पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. ७,६२५ कोटी रुपयांच्या तरतुदीसह विकसित करण्यात येत असलेल्या या मार्गाचे बांधकाम मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडूस ते धर्मपूरी, धर्मपूरी ते लोणंद, लोणंद ते दिवे घाट आणि दिवे घाट ते हडपसर अशा ६ पॅकेज मध्ये करण्यात येत आहे. यापैकी ४ पॅकेजचे काम पूर्ण झाले असून धर्मपूरी ते लोणंद काम अंतिम टप्प्यात आहे, तर दिवे घाट ते हडपसर या पॅकेजचे ६५% काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग सासवड, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि पंढरपूर यांसारख्या भागांना बायपास करत जलद आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करतो.
उड्डाणपूल, रेल्वे ओव्हरब्रिज, अंडरपास आणि आधुनिक पुलांच्या माध्यमातून हा मार्ग अधिक सक्षम करण्यात आला आहे. पालखी मार्गावर रस्ते बांधकामादरम्यान येणारी झाडे ट्रान्सप्लांट करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा देशी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सासवड, नीरा, लोणंद, फलटण,नातेपुते, माळशिरस, पंढरपूर याठिकाणी बाह्यवळण रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत.
ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या हेतूने माळशिरस येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी निर्माण केलेली ऐतिहासिक विहीर, वेळापूर येथील पुरातन लेणी व वाखरी जवळील बाजीराव विहीर या ऐतिहासिक स्थळांचे जतन करून प्रगती व संस्कृतीची सांगड घालण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम करताना सोलापूर व सातारा जिल्ह्यांत बुलढाणा पॅटर्नच्या धर्तीवर जवळपास ४३ तलावांचे खोलीकरण करून तेथील मुरुम, माती महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आली आहे. यामुळे अतिरिक्त जलसंचय झाला असून तेथील पाणी पातळीत वाढ झाली आहे...🚏🚘🚖