हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सापडेना झालाय. तर या स्पर्धेत, सॉरी परीक्षेत.. काही विद्यार्थ्यांना.. चक्क १००% गुण मिळाले आहेत. हे सगळं पाहून मला असा प्रश्न पडतो, की आजच्या पिढीतील ही मुलं एवढी बुद्धिमान कशी काय झाली आहेत.? की.. पेपर तपासणाऱ्यांनी जाऊ द्या हो म्हणत.. मार्क देताना खिरापत वाटल्या सारखी त्यांना मदत केली आहे.? कारण.. शंभर टक्के मार्क म्हणजे, पेपर लिहिताना एकही चूक नाही, असा त्याचा अर्थ होतो, आणि.. असं खरोखरच होऊ शकतं का.? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
कारण.. आमच्या काळात मराठीच्या पेपरमध्ये काना, मात्रा चुकला तरी अर्धा मार्क गायब व्हायचा. वेलांटी विसरली, अनुस्वार राहिला, पूर्णविराम चुकला, की शिक्षक लाल पेनाने अशी काही फटकारणी मारायचे, की जणू काही आम्ही देशद्रोहच केला असावा, शिवाय मार्क कापणी वेगळीच.. मग आजच्याला पेपर तपासताना हे नियम असतील की नाही.?
गणितात उत्तर बरोबर आलं, तरी.. मधली पायरी चुकली म्हणून मार्क कापले जायचे. इंग्रजीमध्ये स्पेलिंग चुकलं, की संपलंच समजा. विज्ञानाच्या पेपरमध्ये आकृतीत जरा इकडे तिकडे झालं, की.. मार्क होत्याचे नव्हते होऊन जायचे.
आणि आता काय.. पोरांना ९८, ९९, १०० टक्के मिळत आहेत. एवढे गुण पाहिले की वाटतं, महाराष्ट्रात सगळीकडेच.. ज्ञानेश्वर, आइनस्टाईन आणि विश्वेश्वरय्या सारख्या अभियंत्यांचा वारसा घेऊन मुलं जन्माला आले आहेत की काय.?
पूर्वी निकालाच्या दिवशी वातावरण वेगळंच असायचं. एखाद्याला ३५% पडले, तरी हौसेणे त्याच्या घरात पेढे वाटले जायचे. कारण त्याकाळी " पास " होणं हीच फार मोठी गोष्ट होती. गावात एखादा मुलगा फर्स्ट क्लासमध्ये पास झाला, की त्याचं नाव चहाच्या टपरीपासून किराणा दुकानापर्यंत चर्चेत असायचं. ७०% मिळवणारा म्हणजे अक्षरशः विद्वान समजला जायचा. त्याच्याकडे लोक आदराने पाहायचे. किमान महिनाभर तरी गावात त्याच्या नावाची चर्चा असायची.
आणि आता.. ९०% पडले, तरी पोरं आणि त्यांचे आईबाप दोघंही शोकसभेत बसल्यासारखे चेहरे करून बसतात. फक्त ९२ टक्के आले.. हे वाक्य आजकाल इतक्या दुःखी सुरात बोललं जातं, की ऐकणाऱ्याला वाटावं, की आता त्या मुलाचं करिअर संपलं की आयुष्य उध्वस्त झालं असेल.
पूर्वी वर्गात एखादाच मुलगा हुशार असायचा, बाकीचे त्याच्याकडून गृहपाठ उतरवायचे. आता प्रत्येक गल्लीमध्ये दहा टॉपर निघत आहेत. त्यामुळे " हुशार " या शब्दाची किंमतच उरलेली नाही. गुण एवढे वाढलेत, की गुणवत्ता कुठे हरवली तेच कळेनासं झालं आहे.
आणि गंमत म्हणजे, त्या काळात कमी मार्क पडूनही लोकं जगले, नोकऱ्या केल्या, संसार उभे केले, मुलांना शिकवलं. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर, त्या ३५ टक्केवाल्यांनीच आजचे ९९ टक्केवाले घडवले आहेत.
तरी सुद्धा.. या घोडे बाजारात आजही मला ही टॉपर मुलं डावीच वाटतात. कारण यांच्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान आहे..
खरं सांगायचं झालं तर, शिक्षणाचं रूपांतर आता ज्ञानापेक्षा आकड्यांच्या स्पर्धेत झालं आहे. मुलांच्या डोक्यावर टक्केवारीचा एवढा ताण टाकला गेला आहे, की त्यांचं बालपण, खेळ, छंद, मस्ती... सगळंच कुठेतरी हरवत चाललं आहे.
पूर्वी निकाल लागला, की आम्हा मित्रांची टोळी विहिरीवर, मैदानावर, सिनेमागृहात किंवा भेळ मिसळीच्या हॉटेलमध्ये जाऊन आनंद साजरा करायची. आणि आता निकाल लागला, की मुलं आणि पालकांसमोर पहिला प्रश्न असतो.. पुढील शिक्षणासाठीचा कटऑफ किती आहे.?
जग बदललं, शिक्षण बदललं, स्पर्धा वाढली हे मान्य आहे. पण एक गोष्ट मात्र खरी.. मार्क वाढले म्हणून बुद्धी वाढतेच असं नाही, आणि मार्क कमी पडले म्हणून आयुष्य संपतं असं देखील मुळीच नाही.
कारण शेवटी… गणिताच्या वहीतले आकडे आणि आयुष्याचं गणित, या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या असतात.
सुदैवाने की दुर्दैवाने म्हणावं तेच समजेना झालंय..पण, या आकड्यांच्या स्पर्धेत धावणाऱ्या आणि त्यात यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन.!!
©️
👍👍हरिश्चंद्र भागवत @. ❤️
✍️ #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍🏽 माझ्या लेखणीतून