एपस्टीन: कोवळ्या मुलींवरचे बलात्कार कसे सहन करायचे?
अमेरिकन सत्तेच्या काळ्याकुट्ट प्रकाशात काळोखाचेच साम्राज्य उभे राहते, तेव्हा काळोखानेच डोळे दिपतात. एवढेच नव्हे, तर आत्म्यालाही भोवळ येते.
आपण एका अशा भयंकर जीवघेण्या अनैतिक युगात अडकलो आहोत जिथे विज्ञानाने प्रगतीची शिखरे तर पादाक्रांत केली असली, तरी नैतिकता संपलेली आहे.
अलीकडे आपण मंगळावर वस्त्या वसवण्याच्या गप्पा मारतो आहोत. काय करायची आहे असली प्रगती? माणूस म्हणून तुम्ही वागू शकत नसाल आणि जर राक्षसी जनावर होत असाल, तर ही प्रगती कोणासाठी सुखदायी ठरणार आहे? आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर जग मुठीत धरण्याचे स्वप्न पाहतो आहोत; पण माणसाचे माणूसपणच संपले आहे....
या झगमगत्या जगाच्या पडद्यामागे जेव्हा नीच जेफ्री एपस्टीनसारखी भयावह प्रकरणे उघड होतात, तेव्हा लक्षात येते की, आपण सुसंस्कृतपणाचा केवळ मुखवटाच चढवलेला आहे, तो आता टराटरा फाटला आहे.
आपल्यातले पशुत्व जराही मेलेले नाही, तर ते अधिक क्रूर आणि अधिक राक्षसी आणि आपल्या दुर्दैवाने ते अधिक संघटित झाले आहे.
एखादा माणूस जेव्हा स्वतःला जगाचा उद्धारकर्ता मानू लागतो, जेव्हा लोक त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहतात, तेव्हा त्याच्या चारित्र्यावर पडलेला संशयाचा एक साधा डागही संपूर्ण समाजाचा विश्वास डळमळीत करतो.
एलन मस्क किंवा तत्सम व्यक्तींकडे आपण जेव्हा उद्याच्या जगाचे निर्माते म्हणून पाहतो, तेव्हा त्यांच्या नावाचा संबंध अशा अघोरी प्रकरणांशी जोडला जाणे हे मनाला क्लेशदायक वाटते.
हा केवळ एकाच व्यक्तीचा पराभव नाही, तर मानवी मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाचा हा अपेक्षाभंग आहे.
त्या लिटल सेंट जेम्स नावाच्या बेटावर जे काही घडले, ते वाचतानाही रडू आवरत नाहीत. उलट्या था़ंबत नाहीत. हे लिहीताना अंग आणि हात थरथर कापत आहेत.
समुद्राच्या लाटांच्या आवाजात तिथल्या निष्पाप बालकांच्या किंकाळ्या दाबून टाकल्या गेल्यात. ज्या वयात आईच्या घट्ट मिठीतून एक क्षणभरसुद्धा ते मूल बाजूला व्हायला तयार होत नाहीत, ज्या हातामध्ये खेळणी असायला हवीत, ज्या मुलीचे फारतर आई आणि बाहुली हेच विश्व होते अशा हजारो मुलींवर ज्यांना आपण राजकीय नेते आणि उद्योगपती समजतो जगातल्या सर्व आर्थिक नाड्या ज्यांच्या हातामधे आहेत, जे अतिशय प्रभावशाली लोक आहेत त्यांनी या छोट्या छोट्या कोवळ्या जीवांवर बलात्कार केलेले आहेत.
ज्या वयात डोळ्यांमध्ये केवळ परीराणी आणि चिऊ काऊची स्वप्ने असायला हवीत, त्या वयात त्या कोवळ्या जिवांना सत्तांध आणि वासनांध नराधमांच्या तावडीत मनसोक्त बलात्कार करण्यासाठी दिले गेले. हे केवळ लैंगिक शोषणाचेच प्रकरण नाही, तर हे मानवी तस्करीचे एक अक्राळविक्राळ जाळे आहे. या जाळ्यात केवळ गुन्हेगार नाहीत, तर जगातील सर्वात प्रभावशाली म्हणवणारे राजकारणी, उद्योगपती आणि विचारवंतही सामील आहेत.
जेव्हा सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर बसलेली माणसे अशा विकृत कर्मात गुंतलेली असतात, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था नावाच्या संकल्पना केवळ कागदावरच उरतात.
हे लोक स्वतःला कायद्याच्या वर सर्व सत्ताधीश समजतात कारण त्यांच्याकडे सत्तेचे आणि संपत्तीचे खरोखरीचे बळ आहे. पण ही संपत्ती कुणाच्या रक्तावर आणि कुणाच्या आसवांवर उभी राहिली आहे, याचा विचार समाज म्हणून आपण कधी करणार आहोत?
आज भारतातून दरवर्षी लक्षावधी महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत. त्यांची आकडेवारी केवळ सरकारी कागदावर दिसत राहते; पण त्यामागील मानवी, कौटुंबिक शोकांतिका, वेदना आपण विसरतो. ज्या मुली गायब होतात, त्या कुठे जातात? त्या या असल्या एपस्टीन विकृतीसारख्या जागतिक स्तरावर चालणाऱ्या अमानवीय व्यापाराचा भाग तर बनत नाहीत ना?
आपण गेल्या चार वर्षांपासून सातत्याने या विषयावर लिहीत आलो आहोत. पण या प्रश्नांचा आवाज पोहचत नाही. मग अशा प्रश्नांकडे लक्ष कोण देणार?
आपल्या देशात मुलीला देवीचे रूप मानले जाते, ही आपली भारतीय संस्कृती आहे. पण इथेही जर लक्षावधी मुली सुरक्षित नसतील, तर आपल्या प्रगतीला काय अर्थ उरतो?
जगाच्या व्यासपीठावर काही राजकारणी निव्वळ सत्तांध झाले आहेत, त्यांना केवळ खुर्ची टिकवण्याची काळजी आहे. समाजही कुठेतरी भलताच निद्रिस्त झाला आहे.
जग अशा लोकांना आपले नेते मानत आहे, जे नैतिकतेच्या निकषावर पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. जे लोक लहान मुलांच्या जीवावर उठले आहेत, ज्यांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडली आहे, त्यांना हे जग समाज म्हणून पाठीशी कसे काय घालू शकते?
या जगाच्या स्थितीकडे पाहताना आपल्याला आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे गरजेचे झाले आहे. अध्यात्म आपल्याला शिकवते की, प्रत्येक जीवात ईश्वराचा अंश असतो; पण जेव्हा माणसाला या तत्त्वाचा विसर पडतो, तेव्हाच अशा राक्षसी प्रवृत्ती जन्माला येतात.
सध्याच्या स्थितीचे वर्णन कसे करावे समजत नाही. तरीही करतो.
नराकारं परं पापं
सत्तामदविमोहितम् ।
अज्ञानतमसाच्छन्नं
विस्मृतं मानवीकुलम् ।।
क्रन्दन्ति शिशवस्तत्र
पीडिताः स्वार्थसिद्धये ।
जागृहि त्वं समाजेऽस्मिन्
धर्मरक्षणतत्परः ।।
-गीताव्रत
सत्तेच्या नशेने मद्यधुंद झालेले हे नराधम प्रत्यक्ष पापाचे स्वरूप आहेत. यांनी नरक निर्माण केले आहेत. अज्ञानाच्या आणि भोगाच्या लालसी अंधारात बुडून त्यांना त्यांच्या मानवी कुळाचा विसर पडलेला आहे.
स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी जिथे पाच- सहा -सात वर्षाच्या छोट्या छोट्या हजारो मुलींवर सामूहिक बलात्कार केलेले आहेत. त्यांचे जीव घेतलेले आहेत. इथे सगळे शब्द संपतात आणि थांबतात.
तेव्हा आधी हे अमेरिकन समाजा, तूच आता जागृत हो आणि मानवधर्माच्या रक्षणासाठी तत्परतेने उभा राहा.
अर्थात हे आव्हान आता प्रत्येक देशाला आहे.
कोणताही धर्म म्हणजे पूजापाठ नव्हे, तर माणुसकी आणि नैतिकतेचे रक्षण होय. जर आपण सर्व भारतीयांनी आजच त्या राजकारण्यांना आणि प्रभावशाली लोकांना जाब विचारला नाही, तर आपणही त्यांच्या पापाचे वाटेकरी झालो आहोत हे समजून घ्यावे लागेल.
अमेरिकेन नागरिकांनी ज्या क्रूर, नीच हातांना सत्ता दिली गेली, ते हात जर हजारो मुलींच्या रक्ताने माखलेले असतील, तर ती सत्ता उखडून टाकणे हेच तुमचे पहिले कर्तव्य ठरेल.
एपस्टीनच्या त्या बेटाचा इतिहास हा विकृत गुन्हेगारीचा इतिहास आहे, हा इतिहास आपल्या, तुमच्या माझ्या इतिहासातला सर्वात मोठ्या नैतिक अध:पतनाचा साक्षीदार आहे.
एपस्टीन तिथे जाणारे लोक केवळ करमणुकीसाठी जात नव्हते, तर ते एका अशा व्यवस्थेचा भाग होते जिथे जाऊन लहान लहान बाळांवर, मुलींवर जाऊन बलात्कार करायचा आहे हे त्यांना अगोदर ठाऊक होते.
या अनेक देशातल्या विकृत पुढार्यांनी गरीब आणि असहाय्य मुलींना केवळ भोगवस्तू मानले होते. त्यांनी ज्या मुलींवर बलात्कार केले त्या वयाची तेवढी लहान मुलं त्यांच्या घरात निश्चितच कधीतरी असतील. या एपस्टीन फाईल्समध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांनी केवळ कायदेशीर गुन्हाच केलेला नाही, तर त्यांनी निसर्गाच्या सगळ्या नियमांचे उल्लंघन केले आहे.
अशा लोकांना समाजाने ताबडतोब वाळीत टाकले पाहिजे. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळवणे हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा दंड असेल. जोपर्यंत आपण अशा नराधमांचे उदात्तीकरण थांबवत नाही, तोपर्यंत ही व्यवस्था बदलणार नाही. आपण केवळ बातम्या पाहून हळहळलो आणि दुसऱ्या दिवशी सर्व काही विसरून गेलो, तर हे चक्र असेच सुरू राहील.
या एपस्टीन प्रकरणाचा आपल्याला वस्तुनिष्ठपणे विचार करावाच लागेल. हे केवळ परदेशातील प्रकरण आहे असे मानून दुर्लक्ष करणे ही आपली सर्वात मोठी चूक ठरेल.
आधी लक्षात घ्यायला हवंय की, हे जाळे संपूर्ण जगात पसरलेले आहे. आपल्या आजूबाजूलाही अशाच प्रवृत्ती काम करत आहेत. जेव्हा आपण एखादा प्रभावशाली माणूस पाहतो, तेव्हा त्याच्या संपत्तीकडे, वरवरच्या रूपाकडे पाहून भारावून न जाता, आधी त्याच्या चारित्र्याचा आणि कर्माचा विचार आपण खोलवर केला पाहिजे.
ज्यांचे पाय गलिच्छ बरबटलेले आहेत आणि ज्यांचे मन किळसवाण्या काळोखाने भरलेले आहे, त्यांना अजूनही आपण आपले आदर्श का मानतोय? हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.
यावर चर्चा झालीच पाहिजे . हे सगळे व्हिडिओ आणि ईमेल्स प्रसिद्ध करण्यामागे न्यायालयाची हीच भूमिका आहे. न्यायालयाला वाटते की, समाजाच्या विवेकाला टोचणी लावणे गरजेचे आहे.जोपर्यंत सामान्य माणूस संघटित होऊन या सत्तेच्या माजाला उत्तर देत नाही, तोपर्यंत आपल्या मुली आणि मुले सुरक्षित राहणार नाहीत. याची खात्री न्यायालयाला सुद्धा आहे.
हे लेखन भावनेच्या भरात केलेले नसून, आपण कोणत्या परिस्थितीत अडकलो आहोत याची जाणीव आता होते आहे. एपस्टीन एका क्रूर विकृत अमानवी वास्तवाचे दर्शन आहे.
जेव्हा आपण माणुसकीच्या प्रश्नासंदर्भात विचार करतो, तेव्हा लक्षात येतेय की, कदाचित आपण आणि आपलाही देश किती मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर आहे.
हे एपस्टीनची हजारो सामूहिक बलात्कारांची प्रकरणे म्हणजे हिमनगाचे केवळ एक टोक आहे. त्याखाली दडलेले सत्य अजूनही खूप काही बाहेर येणे बाकी आहे; पण न्यायालयाकडून जितके बाहेर आले आहे, तितकेच आपल्याला अस्वस्थ करण्यासाठी पुरेसे आहे.
आता वेळ आली आहे की, या प्रकरणात गुंतलेल्या सगळ्या सत्तांध लोकांना समाजाबाहेर हाकलून दिले पाहिजे. त्यांना मिळणारी प्रतिष्ठा आणि सन्मान काढून घेतला पाहिजे. कदाचित परदेशातल्या प्रत्येक नागरिकाची हीच प्रतिक्रिया असेल.
ज्यांच्या मनात दया नाही, ज्यांच्या कर्मात शुचिता नाही, ते समाजाचे नेतृत्व कसे करू शकतात? हा प्रश्न आता जागतिक स्तरावर नेला पाहिजे.
हा लढा केवळ एका व्यक्तीचा नाही, तर हा लढा सत्याचा असत्याशी आणि प्रकाशाचा अंधाराशी आहे. आपण सत्याच्या बाजूने उभे राहू या आणि या अघोरी प्रथेचा अंत करण्यासाठी कंबर कसू या!
आता थोडी हिंमत उसनी तरी आणावीच लागेल. नक्की घेऊ या!
- ©® लेखक~ #🎭Whatsapp status