एक like तर बनतोच ना .. 👍

12K Posts • 29M views
🌺🌻परमार्थात अभिमान आड येतो. 🌺🌻 शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहेत; इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहे. परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. या दोन्ही गोष्टींत जाणत्याची संगत लागते. परलोक साधून देणार्याला सद्गुरु म्हणतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो, त्यालाच सद्गुरुकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. आपण भगवंताला शरण जात नाही, कारण आपला अभिमान या शरण जाण्याच्या आड येतो. गंमत अशी की, व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून, ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो. इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा, अशी आपली कल्पना असते. पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही, मग 'परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही' हे म्हणणे लबाडीचे आहे. 'प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही, मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला ?' असे काहीजण विचारतात. प्रपंच सचोटीचा असला, तरी त्यात अभिमान असेल तर तो परमार्थ होणार नाही. 'राम कर्ता' म्हटल्याशिवाय, म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय, परमार्थ नाही साधणार. 'मी देही' म्हणू लागलो यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचे मूळ आहे. 'माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू ?'असे वाटते. जो या वासनेचा खून करतो, तोच परमार्थाला लायक होतो. अंती जी मती, ती जन्माला कारण होते. हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले, पण प्रचीतीने हे सर्व जाणावे. बायकोपोरांचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही, म्हणून बुवा झाला; मठ केला. लोक येऊ लागले, त्यांना जेवायला घालण्याकरिता भिक्षा आणू लागला. पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला ! छप्पर गळू लागले ते नीट करण्याची काळजी करू लागला. मग घरादारांनी काय केले ? असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचात राहिलेले काय वाईट ! थोडक्यात म्हणजे,परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील, त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही. जगातले आपले समाधान अगर असमाधान, ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. परमार्थात महत्त्व, बाहेरचे ऐश्वर्य किती आहे याला नसून, वृत्ती स्थिर होण्याला आहे, आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे. ‼️परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे.‼️ #एक like तर बनतोच ना .. 👍
12 likes
23 shares
🌷🌼🌺प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधावा. 🌷🌼🌺 कोर्टातली शपथ ज्याप्रमाणे लोक खरी मानीत नाहीत, त्याप्रमाणे प्रपंचात काही लोक लबाडीने वागतात. आणि त्याला 'हा व्यवहार आहे' असे म्हणतात; हा काही नेटका प्रपंच नव्हे. प्रपंचात जर समाधान झाले नाही, तर तो नेटका नाही झाला. प्रपंचाची दिशा ज्याची चुकली, त्याने नाही परमार्थ साधला. ज्याला प्रपंच करता येत नाही, त्याला बुवापणाही नाही करता येणार ! कर्ज फार झाले म्हणून प्रपंच मोडला, यात कोणता स्वार्थत्याग आहे ? प्रपंचाचा त्याग केला म्हणजे काय केले, तर जंगलात जाऊन बसला. थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळा करून शेकोटी केली. जागा साफ केली, तुळशी लावल्या, झोपडी बांधली. पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली, तर मग घरदारानेच काय केले होते ? प्रपंचाचे बंधन सुटावे लागते, जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येते ? हा प्रपंच, हा संसार, जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे, तर तो कोणाला तरी सुटेल काय ? जो आसक्तिच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असे समजावे. तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांनासुद्धा संसार, प्रपंच होता; पण त्यामध्ये त्यांची आसक्ति नव्हती, म्हणून त्यांना तो बाधला नाही. पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू, हे म्हणणे बरोबर नाही. या गडबडीतच, प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा. सावधानता कशाची ठेवायची ? तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केले, ते करण्याची सावधगिरी ठेवायची. प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा. विषयात गुंग झालो, भगवंताचा विसर पडू लागला, ही संधी साधावी आणि त्या वेळी भगवंताचे स्मरण ठेवावे. आपण विषयाला जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावे. चित्त शुद्ध करून विचार करावा, आणि मी विषयाला किती शरण गेलो हे पाहावे. विषयापासून वेगळे व्हावे, म्हणजे हे पाहता येते. व्यसनी माणसाने, व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा. मारुतिरायाच्या दर्शनाला मी पूर्वी जात होतो, आता विषयात त्याची आठवणही होत नाही, याला काय करावे ? नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जात ? मग जे पोटाकरता करता ते भगवंताकरता का नाही करीत ? भगवंताला शरण जाणे सर्वांत सोपे आहे; त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरूरी नाही लागत. माझ्या मनांत येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल. भगवंताला शरण जाणे म्हणजे 'मी त्याचा झालो' असे म्हणणेच होय. 'मी रामाचा झालो, जे जे होते ते रामइच्छेने होते' असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही. ‼️प्रपंचाला 'माझी' गरज आहे, आणि 'मला' भगवंताची गरज आहे.‼️ #एक like तर बनतोच ना .. 👍
9 likes
22 shares