#🌼रथसप्तमी🙏 #🙏नर्मदा जयंती🌼
रथ सप्तमी (सूर्यजयंती) आणि नर्मदा जयंती
====================
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी
म्हणजे रथसप्तमी आणि नर्मदा जयंती.
अखिल ब्रह्मांडला नित्य प्रकाशित करणारे श्रीविष्णुस्वरूप भगवान सूर्यदेव आणि शिवपुत्री शांकरीचे रूप पृथ्वीवर अमरकंटक येते उगम पावून नर्मदमैयाचे साकार रूप घेऊन, परिक्रमा वासियांना अनुभूती देणारी.. दोन्हीही अमर तत्वाचे वरदान घेऊन सकल जीवांचे पोषण करणारे देवता स्वरूप.
चतुर्भुजा नर्मदा माई कमलवासिनी आहे आणि आपल्या मगर वाहनावर बसून आपल्या कृपादानाचे तेज अंतःकरणाची शुद्धी, सात्विक भक्तिभाव, विषय मोहाचा त्याग, अभय आशिर्वचन, निःस्वार्थ आणि नम्र सेवा, पितृ ऋणाचे विधी मांगल्य आणि मुक्ती अर्थात मोक्ष या स्वरुपात प्रदान करत असते.
आपल्या एकाक्ष अरुण सारथी सोबत वेगवान अशा सप्तअश्वाच्या एक चक्री रथावर बसून या जगत संसारातील गतिशील जीवांचे अमूल्य असे कर्मबंधन आपल्या "उत्तरायण" पर्वात सुजल करणारे भगवान सूर्यदेव. कश्यप ऋषी आणि माता आदिती यांचे पुत्र.
माता अदितीच्या गर्भातून प्रकट म्हणून "आदित्य", कश्यप ऋषी पिता असल्याने "काश्यप" आहे. याशिवाय मार्तंड, रवि, भास्कर, अर्यमा,दिवाकर, प्रभाकर, दिनमणी, दिनकर, सविता.. आणि असंख्य नाम विशेषणा सोबत बुद्धी, शरीरबल, तेज यासाठी त्रिकाली सात्विक विधीने होणारी संध्या उपासना.. सर्व काही भगवान सूर्य नारायण यांच्या आत्यंतिक प्रभावकृपेने होत असते.
ऋग्वेदामध्ये सूर्यदेवांच्या स्तुती मध्ये भगवान सूर्यदेवांच्या कार्य कारणामुळे या ब्रह्मांडावर असाधारण कृपा कशी आहे याची महती "जगतआत्मा" , "जगत चक्षु", ब्रह्मा,विष्णू आणि महेश यांचे नेत्ररूप (चंद्र आणि अग्नी सोबत) या स्वरुपात आढळते.
दिवस आणि रात्र या दोन्ही अवस्थाचे एकमेव कारण पृथ्वीभ्रमण असले तरी त्याचे सर्व योजन सूर्यदेवांच्या प्रभावामुळे आहे म्हणून सर्व अंतरीक्ष, ग्रह, तारे आणि नक्षत्र देवता भगवान सूर्य नारायणाच्या दैदिप्यमान सेवाभावा सोबतच सेवाव्रतापुढे नम्र होत असतात. म्हणून पंचदेवांमध्ये भगवान सूर्यदेवांचे महत्व आहे.
या सृष्टीचक्राचे नियोजन आणि ऋतु विहाराचे संयोजन सूर्यदेव एका कृपा ध्येयाने साकारत असतात. म्हणून ते तप्त वाटत असले तरी त्यांच्या अंतरीचा जिव्हाळा अगदी आकाशा सारखा ..न मोजता येण्याजोगा.
भगवान सूर्यनारायण दानशूर आहेत. गुरू स्वरूपात ज्ञान देण्यासाठी त्यांच्या एवढा ध्येयसक्त, अहंकार शून्य, सातत्याने समभाव जोपासणारा कृपाळू गुरुदाता कोणी नाही कारण त्यांच्या पुढे अंधकारांचा मागमूस सुद्धा राहत नाही.
मारुतीरायाने त्यांच्याकडून ज्ञान स्वीकारताना आपल्या अतुलनीय पराक्रमाचे, एकाग्रतेचे, चाणाक्ष बुद्धीचे आणि सेवा भावाचे तेज पुढील काळात सूर्यवंशी भगवान श्रीराम यांच्या चरणीं अर्पण केले.
महर्षी विश्वामित्र यांनी ब्रह्म ज्ञान आसक्तीने खडतर उपासना सुरू करताना या सृष्टीचे सगुण साकार भगवान म्हणून सूर्यनारायण यांना उपास्य दैवत केले. त्या प्रभावाने गायत्री मंत्र साकार झाला आणि त्या मंत्राचे शेवटचे चरण "धियो यो नः प्रचोदयात्" भगवान सूर्यनारायणानी कृपावचन म्हणून महर्षीना दिले.
सूर्य महात्म्य अतिशय विस्तृत्व आहे ज्याच्या मुळे सकल जीवांच्या व्यक्तिमत्वात प्रभाव पडत असतो.
आपल्या जन्माचे अधिष्ठान कृतकृत्य वाटण्यात आहे आणि आजच्या या तिथीस भगवान सूर्य नारायण यांच्या गुरूस्वरूपा पुढे "ॐ भूर्भुवः स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् " या गायत्री मंत्राने आणि भगवती नर्मदा माता यांच्या सृष्टी सेवेपुढे
"नर्मदे हर" या उद्घोषणाने कृतज्ञ
व्हायलाच हवं.
ll ॐ ह्रीं श्रीं नर्मदायै नमः ll
ll ॐ घृणि सूर्याय नमः ll
ll आई भगवती नर्मदा माता चरणी कोटी कोटी दंडवत ll
ll भगवान सूर्यदेवांच्या चरणी कोटी कोटी दंडवत ll
गुरुदत्त आठल्ये
ll श्रीपाद राजम शरणम् प्रपद्ये ll
ll दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll