Sanjeev Vaswani
587 views • 1 days ago
परमहंस परीव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (१८५४-१९१४) , यांचा जन्म १८५४ साली महाराष्ट्रातील सावंतवाडीजवळील माणगाव गावी एका सत्प्रवृत्त ब्राह्मण कुटूंबात श्री गणेश टेंबे आणि सौ. रमाबाई यांच्या पोटी झाला. त्यांचे पाळण्यातील नाव ‘वासुदेव’ ठेवले. श्री गणेश टेंबे गाणगापुरात असताना, साक्षात श्री दत्तप्रभू त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले व त्यांना माणगावी परत जाऊन प्रपंच करावयास सांगितले. श्री दत्तप्रभूंनी त्यांच्या पोटी स्वतः अवतार घेण्याचे वचन दिले.
दूसरे दत्तावतार प. प. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची प्रत्यक्ष सेवा करणाऱ्या योगिनींमध्ये यक्षिणी देवी प्रमुख योगिनी होती. प. प. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तीला सांगितले की, “माझा पुढील अवतार माणगांवी होणार आहे. तेव्हा तू माझा पुढील अवतार होण्यापुर्वी तिथे जा आणि ते गाव वसव.” हीच यक्षिणी देवी परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मस्थळाची म्हणजेच माणगावची ग्रामदेवता आहे.
चि. वासुदेव ८ वर्षाचे असताना त्यांचे आजोबा श्री हरीभटजी यांनी त्यांची मुंज केली. चि. वासुदेव मुळातच तल्लख बुद्धीचे आणि अभ्यासू वृत्तीचे असल्यामुळे लवकरच वेदपारंगत झाले आणि पौरोहीत्याच्या कामातसुद्धा निष्णात झाले. ते घरच्या भिक्षुकीच्या (पौरोहीत्याच्या) व्यवसायात हातभार लावू लागले. आपल्या तपाच्या बळावर आत्मसात केलेल्या सिद्धींचा उपयोग ते नि:स्वार्थपणे लोकांचे कष्ट व दुःख निवारण्यासाठी करू लागले. आपल्या आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे २१व्या वर्षी त्यांनी गृहस्थाश्रमात पदार्पण केले. ते २३ वर्षांचे असताना त्यांच्या ५६-५७ वर्षांच्या अतिशय सरळ आणि धर्मनीष्ठ स्वभावाच्या पित्याचे देहावसान झाले. त्यांच्या आई रमाबाई व पत्नी सौ. अन्नपूर्णाबाई यांच्यात सतत खटके उडत असत. रोजच्या कलहामुळे त्यांची मुळची वैराग्यपूर्ण वृत्ती अधिकच ज्वाज्वल्य झाली. ते नरसोबा वाडीला गेले असताना त्यांना श्री गोविंद स्वामी व श्री मौनी स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार श्री वासुदेव शास्त्र्यांनी (श्री स्वामी महाराजांनी) १८८३ साली माणगावी श्री दत्तमंदिराची स्थापना केली. हे मंदीर लवकरच खूप प्रसिद्ध पावले. अनेक भक्त ह्या मंदीरात दर्शनाला येऊ लागले आणि श्री वासुदेव शास्त्र्यांना (श्री स्वामी महाराजांना) आदराने ‘बुवा’ म्हणून संबोधू लागले.
७ वर्षे माणगावी राहील्यावर श्री देवांच्या आज्ञेप्रमाणे आपल्या गर्भवती पत्नीसह त्यांनी माणगाव सोडले आणि नरसोबा वाडीला आले. तेथेच त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाईंनी मृत बालकाला जन्म दिला. १८९१ मध्ये श्रीदेवांनी त्यांना उत्तरेस जाण्याची आज्ञा दिली. पुढे गंगाखेडला त्यांच्या पतीव्रता पत्नी सौ. अन्नपूर्णाबाईंचा महामारीच्या आजाराने (cholera मुळे) मृत्यू झाला. सुतक संपल्यावर, बुवांनी १४ व्या दीवशी संन्यासदीक्षा घेतली. मग दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार उज्जैनीला जाऊन तेथील श्री नारायणानंद सरस्वती स्वामी महाराजांकडून शास्त्रोक्त पद्धतीने दंडधारण केला. श्री नारायणानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दंड देताना बुवांना ‘श्री वासुदेवानंद सरस्वती’ असे संन्यसाश्रमातील नविन नाव अर्पण केले.
श्री दत्तप्रभूंनी श्री स्वामी महाराजांच्या आयुष्याचे मर्म उलगडून त्यांना संपूर्ण भारतभर भ्रमण करून सर्वत्र सनातन वैदिक धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची आज्ञा दिली आणि धर्मापासुन परावृत्त झालेल्या लोकांना परत वर्णाश्रम धर्माच्या मार्गावर आणण्यास सांगितले. श्री दत्तगुरुंच्या आज्ञेनुसार श्री स्वामी महाराजांनी २३ वर्षे कठोर नियमांचे पालन करून संन्यासाश्रम आचरणात आणला. कृष्णवर्णीय आणि मध्यम बांधा असणाऱ्या श्री स्वामी महाराजांचे डोळे अतिशय भेदक होते, जणू काही त्यांची दृष्टी खोल एखाद्याच्या अंत:करणाचा ठाव घेत असे. त्यांची वाणी मृदू असली तरी त्यात एक विलक्षण स्पष्टवक्तेपणा असे. संन्यास नियमांना अनुसरून चार भगव्या लंगोट्या, दोन तशाच छाट्या, दंड, वेळवाचा किंवा लाकडाचा एक कमंडलू, एखादी धाबळी, उपनिषदांची पोथी, पंचायतनाचि संपुष्ट, दोन श्रीदत्तमूर्ती, पाणी काढण्याची एक दोरी आणि थोडे लिखाणाचे साहित्य अशा आणि एवढ्याच संन्यास धर्माला आवश्यक वस्तू ते जवळ बाळगीत असत. त्यांचे कपडे आणि भांडी ते स्वत:च धुत असत. त्यांचा सर्व संचार पायी व अनवाणीच होत असे. एकदा तर एका भक्ताने श्री स्वामी महाराजांच्या पायात शिरलेले २० काटे काढले. श्री स्वामी महाराजांनी पायात एवढे काटे बोचत असल्याची जाणीवसुद्धा आजूबाजूच्या लोकांना होऊ दिली नव्हती. घनदाट अरण्यात, ऊष्ण वाळवंटात किंवा उंच पर्वतांवर, टोकाच्या हवामानाच्या परिस्थतीतसुद्धा ते फक्त एका धाबळीवर रहात असत. (काय ही सहनशीलतेची पराकाष्ठा!)
त्यांचे बहुतांश चातुर्मास लहान खेड्यांत किंवा फार लोकवस्ती नसणाऱ्या भागांत झाले आहेत. श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. कितीही अलिप्त रहाण्याचा प्रयत्न केला तरी आयुष्यातिल बराचसा काळ त्यांना लोकांमध्येच व्यतित करावा लागला. श्री स्वामी महाराजांना भेटायला सर्वांना खुला प्रवेश असे. श्री स्वामी महाराजांचे सोवळे आणि नियम कड़क असले तरी ते सर्वांसाठी सारखेच असत, नियमांचे पालन करताना त्यात भेदभाव नसे. सर्व जातीधर्मातील लोकांना त्यांच्या कृपेचा लाभ होत असे. श्री स्वामी महाराज स्वतः खूप भावनाशील होते. ते सर्वांची दुःख आणि समस्या पूर्ण लक्ष देऊन ऐकायचे आणि त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी खात्रीचे उपायसुद्धा सुचवायचे. अनेकांना त्यांनी दुःखमुक्त केले होते.
१९१० साली, त्यांच्या नरसोबा वाडीमधील वास्तव्यात त्यांनी महामारीची भयंकर साथ टाळण्याण्यासाठी तेथील पुजाऱ्यांना पादुकांवर अभिषेक करण्याचे सुचवले. तेव्हा तेथील काही लोकांनी जिज्ञासेने विचारले, 'अभिषेकाने महामारी कशी जाईल? त्याचा काय संबंध?' ते ऐकून श्री स्वामी महाराजांनी खुलासा केला, 'मृत्युरूप परमेश्वराच्या महामारी इत्यादी शक्ती आहेत. तरी मृत्यूरूप परमेश्वरास अभिषेकाने शांत केले म्हणजे त्या शक्तीही शांत होतात.' हे ऐकून नंतर सर्व मंडळीनी महारुद्राभिषेक केला. त्यामुळे महामारी शांत झाली.
शारदा पीठाचे शंकराचार्य श्री राजराजेश्वर स्वामी यांना हरिद्वारला श्री स्वामी महाराजांबरोबर एकत्र (श्री स्वामी महाराजांचा तीसरा) चातुर्मास केल्यापासून त्यांचे फार कौतुक होते. श्री स्वामी महाराजांचा १७ वा चातुर्मास तंजावरला झाल्यानंतर कावेरी नदी जवळून जात असताना त्यांना शृंगेरी पीठाचे शंकराचार्य श्री नरसिंह भारती श्रीरंगम् येथे असल्याचे समजले, म्हणून ते त्यांना भेटावयास गेले. श्री स्वामी महाराजांना भेटून त्या धर्मगुरुंनासुद्धा खूप आनंद झाला. श्री स्वामी महाराजांनी शारदांबा (सरस्वती) आणि शंकराचार्य यांच्यावर स्तुतिपर स्तोत्रे रचली. ह्यावर आचर्यांनी श्री स्वामी महाराजांवर स्तुतिपर स्तोत्र रचले. श्री स्वामी महाराजांच्या भीक्षेची सोय करुन बाकीच्या शिष्यांना उद्देशून ते श्री स्वामी महाराजांबद्दल म्हणाले की, “तुम्ही आज येथे आलेल्या ह्या महान स्वामींना ओळखले नाही. साक्षात् दत्तप्रभूच ह्यांच्या माता-पित्यांच्या निस्सीम भक्तिमुळे आणि पुण्याईमुळे त्यांच्या पोटी श्री स्वामी महाराजांच्या रुपाने अवतरले आहेत. ह्यांच्या वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाच्या कार्याची तुलना आदि शंकराचार्यांच्या कार्याशीच करता येईल. वैदिक संस्कृतीमधील वर्णाश्रम धर्माचे कठोर पालन केल्यामुळे ते इतर अनेक लोकांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगतीला कारणीभूत होतील. आसेतुहिमालयपर्यंत (कन्याकुमारीपासून ते हिमालयपर्यंत) पायी प्रवास करून त्यांनी अनेक जिज्ञासु भक्तांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे कर्म, भक्ति आणि ज्ञान मार्गाचा उपदेश केला आहे. आपण ईश्वरला मनापासून हीच प्रार्थना करुया की ह्यांना दीर्घायुश्य लाभों जेणेकरून वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनाचे कार्य यशस्वी होवो.”
एकदा १९०५ साली पंढरपुरहुन वाडीला जात असताना कमलापुर गावी एक उंच आजानुबाहु सत्पुरुष श्री स्वामी महाराजांच्या स्वप्नात प्रकटले आणि त्यांना म्हणाले की, “आपण सर्व ठिकाणी प्रवास करता व काव्य करता… पण आमच्याकडे आपले लक्ष गेले नाही.” उठल्यावर श्री स्वामी महाराजांनी श्री दत्तप्रभूंकडे स्वप्नातल्या ह्या सत्पुरुषाबद्दल विचारणा केली. श्री दत्तप्रभु म्हणाले की, “ ते श्री अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते आणि त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही अक्कलकोटला जावे आणि त्यांच्यावर काव्य करावे. श्री दत्तप्रभूंच्या इच्छेप्रमाणे श्री स्वामी महाराजांनी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
श्री पुंडलिकराव नावाचे श्री साईबाबांचे भक्त श्री स्वामी महाराज आंध्र प्रदेशमधील राजमहेंद्री गावात असताना त्यांच्या दर्शनासाठी आले होते व त्यांनी तेथे कीर्तनसेवासुद्धा दिली होती. श्री स्वामी महाराजांनी श्री पुंडलिकरावांची चौकशी केली असता त्यांना असे कळले की ही मंडळी शिर्डीला त्यांच्या गुरुंच्या म्हणजेच श्री साईबाबांच्या दर्शनासाठी निघाली आहेत. तेव्हा श्री स्वामी महाराजांनी त्यांना एक नारळ दिला आणि म्हणाले की, “हा नारळ माझ्या बंधुंना (श्री साईबाबांना) द्या.” परत जाताना ही सर्व मंडळी कोपरगावला थांबली आणि श्री पुंडलीकराव सकाळी संध्या करण्यासाठी बाहेर पडले. त्यांच्या बरोबरच्या लोकांना भूक लागली, म्हणून त्यांनी पोहे केले. ते ज़रा जास्तच तिखट झाले. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी न मिळाल्यामुळे त्यांच्यापैकी एकाने सर्वांच्या सामनातील नारळ फोडून त्यातल्या पाण्याने आपली तहान भगवाली व तिखटपणा कमी करण्यासाठी खोबरे पोह्यांमध्ये घातले. सर्व नारळांमध्ये श्री पुंडलिरावांना श्री स्वामी महाराजांनी दिलेला नारळसुद्धा फोडून खाल्ला गेला होता. जेव्हा श्री पुंडलिकराव श्री साईबाबांना भेटायला गेले तेव्हा श्री साईबाबांनी चिडून त्यांच्याकडे पाठ फिरवली व म्हणाले, “बदमाश चोरांनो, माझ्या बंधूंनी मला दिलेला नारळ कुठे गेला… आधी मला तो आणून द्या.” श्री पुंडलीकरवांना काही माहीत नसल्याने त्यांनी त्यांच्या बरोबरच्या मंडळींकडे चौकशी केली, तेव्हा त्यांना सगळी हक़ीकत समजली. श्री साईबाबांचे आपल्या बंधुंवर (श्री स्वामी महाराजांवर) किती प्रेम आहे ह्याचा उलगडा झाल्यावर, त्या सर्वांनी चूक झाल्याचे मान्य केले व क्षमा मागितली. श्री साईबाबाांनी झालेल्या चुकीबद्दल त्यांची चांगलीच कानउघडणी केली आणि नंतर राग झटकुन टाकला.
१९०५ साली विदर्भातून प्रवास करताना श्री स्वामी महाराज शेगावला आले. ते येण्याच्या आदल्या दिवशी शेगावच्या श्री गजानन महाराजांनी आपल्या भक्तांना सांगून ठेवले होते की, “माझा कऱ्हाडा ब्राह्मण विद्वान बंधू मला भेटण्यासाठी येत आहे. तो अतिशय कर्मठ आहे. एवढी स्वच्छता ठेवा की वाटेत साधी चिंधीसुद्धा पडलेली दिसता कामा नये.” जेव्हा श्री स्वामी महाराज आले तेव्हा श्री गजानन महाराज बोटांनी टिचक्या वाजवत बसले होते. जेव्हा श्री स्वामी महाराज आले तेव्हा श्री गजानन महाराजांनी त्यांच्याकडे पाहिले व टिचक्या वाजवणे थांबवले. दृष्टादृष्ट होताच एकमेकांना पाहून दोघे गालातल्या गालात हसले. दोघांनाही खूप आनंद झाला. एकमेकांशी फारसे काही बोलणे झाले नाही. श्री स्वामी महाराज जायला निघाले तेव्हा श्री गजानन महाराज “फार बरे” एवढेच म्हणाले. ह्या दोघांमधील न बोलता झालेला आध्यात्मिक पातळीवरील संवाद इतर कोणाला कळला नाही.
श्री स्वामी महाराज एकदा नरसी गावी असताना मध्यान्ह स्नानासाठी नदीवर गेले होते. त्याच वेळी गावातील एक बाई तिथे पाणी भारायला गेली होती. तिला असे दिसले की श्री स्वामी महाराज झाडाखाली बसले आहेत आणि त्यांच्या मांडीवर एक साधारण ६ महिन्याचे बाळ डाव्या पायाचा अंगठा चोखत आहे. श्री स्वामी महाराज व ते बाळ एकमेकांकडे अतिशय प्रेमाने पहात आहेत. ती बाई ते मनोहर दृश्य पहात असताना एवढी भारावून गेली की पाणी भरायचेसुद्धा विसरली. तेवढ्यात श्री स्वामी महाराजांचे लक्ष तिच्याकडे गेले आणि त्यांच्या मांडीवरील ते मूल अदृश्य झाले. ते पाहून ती स्त्री बेशुद्ध झाली. श्री स्वामी महाराजांनी तिच्याजवळ जाऊन पाणी शिंपडून तिला शुद्धिवार आणले आणि म्हणाले, “तुम्ही खुप भाग्यवान आहात. म्हणूनच तुम्ही हे पवित्र दृश्य पाहु शकलात.”
श्री स्वामी महाराजांच्या चौथ्या चतुर्मासाचे वेळी ते बद्री नारायणाला जात असताना एका कड्यावर पोचले. पुढे खोल दरी होती. त्यामुळे त्यांना पुढे जाता येत नव्हते. तेव्हा त्यांना दोन माणसे कड्यावरुन खाली उतरत असलेली दिसली. ते दोघे श्री स्वामी महाराजांना म्हणाले की, “आपण परत मागे फिरा. हा रस्ता खूप धोक्याचा आहे.” श्री स्वामी महाराजांनी त्यांना उत्तर दिले की ते नर नारायणांचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत आणि प्राण गेला तरी दर्शन झाल्याशिवाय ते मागे फिरणार नाहीत. हे उत्तर ऐकल्यावर ते दोन पुरुष अदृश्य झाले आणि श्री स्वामी महाराजांना त्यांच्या जागी नर नारायण ऋषींचे दर्शन झाले.
भगवंताने अनेक भक्तांना दृष्टांत देऊन सांगितले की ते स्वत: परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या रुपात अवतरले आहेत. आळंदीकर नावाचे एक गृहस्थ दरोडेखोरांच्या एका टोळीकडे काही पूजाविधी करायला जात असत. त्याबदल्यात एकदा त्यांना दरोडेखोरांनी दक्षिणा म्हणून आपल्या लुटीतले काही दागिने दिले. त्यातील काही दागिने अंगावर घातल्यामुळे आळंदीकरांच्या पत्नीला एका पीशाच्चाने झपाटले. तिला ह्या पिशाच्चबाधेतुन मुक्त करण्यासाठी आळंदीकरांनी तब्बल १० वर्षे अनेक उपाय केले. पण ते सर्व अयशस्वी ठरले. शेवटचा पर्याय म्हणून ते दोघे गाणगापुरला गेले आणि तिथे देवांची सेवा करू लागले. काही दिवस गेल्यावर त्यांना श्री दत्तप्रभूंचा दृष्टांत झाला की, “ताबडतोब गाणगापुर सोडून गरुडेश्वरी जावे. तिथे मी स्वतः ‘श्री वासुदेवानंद सरस्वती’ नाम धारण करून रहात आहे.” ह्या दृष्टांताप्रमाणे ते पती पत्नी गरुडेश्वरी श्री स्वामी महाराजांजवळ आले. श्री स्वामी महाराजांच्या कृपेमुळे त्यांची पत्नी पिशाच्चबाधेतुन मुक्त झाली हे वेगळे सांगणे नकोच!
१९०७ साली तंजावरच्या मुक्कामात एका स्त्रीने तिचे मृत बाळ एका कपड्यात गुंडाळून श्री स्वामी महाराजांच्या राहत्या जागेजवळ त्यांच्या येण्याजाण्याच्या वाटेवर ठेवले. भेटायला आलेली सर्व मंडळी जायला निघाली तेव्हा कोणाचे तरी लक्ष ह्या बाळाकडे गेले. ते बाळ मृत्यू पावले आहे अशी बातमी त्यांनी श्री स्वामी महाराजांना सांगितली. त्या बाळाच्या आईची आपल्या बाळाला जगवण्याची सुप्त इच्छा श्री स्वामी महाराजांनी जाणली. दया येऊन ते त्या माणसाला म्हणाले, “छे छे! ते बाळ जिवंत आहे. त्याची आई त्याला दूध न पाजाता निष्काळजीपणे कुठेतरी गेली असेल. जरा हे भस्म त्या बाळाच्या अंगाला चोळा.” त्या बाळाच्या अंगाला भस्म चोळल्यावर ते रडु लागले. ते पाहुन त्याची आई पुढे आली. श्री स्वामी महाराजांच्या कृपादृष्टीने बाळ जिवंत होईल व पूर्वीच्या दोन अपत्यांसारखे मृत्युमुखी पडणार नाही ह्या धारणेने आपण हे बाळ श्री स्वामी महाराजांच्या जवळ ठेवल्याचे तिने कबुल केले.
दत्तसंप्रदायामधील कुरुगड्डी आणि पीठापुर यांसारखी काही महत्त्वाची स्थळे लोकांसमोर आणण्याचे आणि त्या स्थळांचे पुनरुत्थान करण्याचे फार महत्त्वाचे कार्य श्री स्वामी महाराजांच्या हातून घडले. पीठापूरमच्या स्थानिक लोकांनासुद्धा पहिले दत्तावतारी श्री श्रीपादश्रीवल्लभ महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल माहिती नव्हती. पण श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लोकांना श्री श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचे जन्मस्थळ दाखविले. याचप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थानसुद्धा (लाडाचे कारंजे) श्री स्वामी महाराजांनीच जगासमोर आणले. त्यांनी भारतात अनेक ठिकाणी दत्त मूर्तींची स्थापना केली. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा महामंत्रसुद्धा श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी जगाला दिला. त्यांनी फार मोठ्या प्रमाणात ह्या मंत्राचा प्रचार आणि प्रसार केला. नरसिंह सरस्वती (दीक्षित स्वामी महाराज), परमहंस परिव्राजकाचार्य श्री योगानंद सरस्वती (गांडा) स्वामी महाराज, नारेश्वरचे परमपुज्य श्री रंगावधूत स्वामी महाराज, पुण्याचे परमपुज्य योगीराज श्री गुळवणी महाराज, पुण्याचे परमपुज्य श्री दत्त महाराज कविश्वर, इंदुरचे श्री नानामहाराज तराणेकर, परमहंस परिव्राजकाचार्य श्री केशवानंद सरस्वती (तांबे) स्वामी महाराज , प. पू. आनंदयोगेश्वर निळकंठ (भाऊ) महाराज (मुंबई) आणि अशाच अनेक महान शिष्यांनी श्री स्वामी महाराजांच्या ह्या महामंत्राचा प्रचार केला. श्री स्वामी महाराजांनी आपल्यासाठी फार मोठी ग्रंथ संपदा निर्माण करुन ठेवली आहे. त्यांतील काही महत्त्वाच्या ग्रंथांची नावे पुढीलप्रमाणे आहेत - श्री द्विसहस्त्री गुरू चरित्र (१८८९), श्री दत्त पुराण (१८९२), श्री दत्तलीलामृताब्धीसार (१८९७), योगरहस्य आणि बोधरहस्यावर द्विसहस्त्री टीका - चुर्णिका (१८९८), श्री दत्त पुराणावर टीका (१८९९), माघ माहात्म्य (१९००), श्री दत्त माहात्म्य (१९०१), श्री दत्त काव्य त्रिशती (१९०१), श्री गुरु संहिता (समश्लोकी) (१९०२), लघु वासुदेव मानससार (१९०३), सप्तशती गुरु चरित्रसार (१९०४), श्री कृष्णालहिरी (१९०४), श्री दत्तचंपू (१९०५), कुमारशिक्षा (१९०७), समश्लोकी चूर्णिका (१९०७), श्री कृष्णालहिरींवरील टीका (१९०७), युवाशिक्षा आणि वृद्धशिक्षा (१९०८), स्त्रीशिक्षा (१९०८), पंच पाक्षिक, इत्यादी
चिखलद्याला ६-७ महीने राहून (२२ वा चातुर्मास) शूलपाणिश्वराच्या घनदाट जंगलातुन जात असताना श्री स्वामी महाराजांना (महाभारतातील चिरंजीव) अश्वत्थाम्याने वाट दाखवली आणि ते त्यांच्या अंतिम चतुर्मासाच्या मुक्कामाच्या ठिकाणी, गुजरातमधील गरुडेश्वरी १९१३ साली पोचले. फार वर्दळ नसलेले आणि श्री विष्णूच्या गरुडाच्या तपश्चर्येचे स्थान म्हणून ओळखले जाणारे ते देऊळ श्री स्वामी महाराज तेथे राहु लागल्यानंतर त्यांच्या भक्तांच्या गर्दीमुळे गजबजून गेले. एकदा नर्मदेच्या काठी शेकडो भक्तांबरोबर गोकुळाष्टमी साजरी करत असताना भजन रंगात आले होते. नेमके त्याच वेळी अचानक आभाळ भरून आले आणि नर्मदेच्या पैलतीरावर मोठे वादळ होऊन पाऊस पडू लागला. आता गोकुळाष्टमीच्या उत्सवाचा विरस होणार असे वाटत असताना श्री स्वामी महाराजांनी सर्वांना आश्वासन दिले की, “पावसाची काळजी न करता भजन सुरु ठेवा”. उत्सव संपत आला आणि सर्वजण आत आले. त्यावेळी आतापर्यंत शांत असलेले ढग जोराने बरसु लागले. तेव्हा श्री स्वामी महाराज सर्व भक्तांना उद्देशून म्हणाले की, “मघाशी ह्याच वादळाच्या कचाट्यातून आपण सूटलो होतो.”
श्री स्वामी महाराजांच्या कथनानुसार त्यांनी एकदा प्लेग, तीनदा महामारी (पटकी), दोनदा कुष्ठरोग, एकदा कोड, दोनदा सर्पदंश आणि आयुष्यभर संग्रहणीचा विकार सोसला होता. असे असूनसुद्धा ते कधीही औषध घेत नसत. देह प्रारब्धावर सोडून देत असत. १९१४ सालच्या उन्हाळ्यात त्यांच्या संग्रहणीच्या विकाराने जोर धरला आणि त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांच्या तत्वाप्रमाणे त्यांनी औषध न घेता फक्त त्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री दत्तप्रभुंच्या विश्वासवार आणि इच्छेवर देह सोडून दिला. ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या टळून आषाढ़ातील प्रतिपदा लागल्यावर (मंगळवार, आर्द्रा नक्षत्र, उत्तरायण) श्री स्वामी महाराज श्री दत्तासमोर सिद्धासनात बसले आणि मुखाने प्रणवोच्चार करून त्यांनी त्यांच्या नश्वर देहाचा त्याग केला. श्री स्वामी महाराज समाधिस्थ होऊन १०० वर्षांहून अधिक काळ लोटला. पण त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव जगातील लाखो भक्तांनी घेतला आहे. रोजच्या जीवनात त्यांचे अनुभव असणारे कितीतरी भक्त आहेत. श्री स्वामी महाराजांचे ‘स्मर्तृगामी समावतु।’ अर्थात ‘तुम्ही माझे स्मरण केलेत की मी लगेच (तुमच्या मदतीसाठी) तत्परतेने येईन’ हे वचन त्यांनी तंतोतंत पाळले आहे.
।। भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज श्रीसदगुरुराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ।।
🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻
#🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #टेंबे स्वामी #वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️
12 likes
7 shares