Jagdish Kashikar
6.1K views
1 days ago
#JKK_Weekly_News_Bulletin *व्यंगचित्रकारांची दुनिया* उमेश काशिकर यांचे मनोगत !! जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७. दिनांक ३ मे हा 'वर्ल्ड प्रेस फ्रिडम डे' आहे तर अमेरिकेत ५ मे हा 'नॅशनल कार्टूनिस्ट डे' म्हणून साजरा केल्या जातो ! राजकीय व्यंगचित्रकारांचा संबंध मात्र 'वर्ल्ड प्रेस फ्रिडम डे' शी अधिक आहे. राजकीय व्यंगचित्रांचा दबदबा आज कमी झाला आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर मोठा काळ राजकीय व्यंगचित्रकारांनी गाजवला. एक काळ शंकर, अबू, रंगा यांनी गाजवला...तर पुढील काळ आर के लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे यांनी... त्यानंतर अजित नैनन, सुधीर तेलंग यांनी गाजवला. सुरेश सावंत, मोरपारिया, संदीप अध्वर्यू, राज ठाकरे, विकास सबनीस, सतीश आचार्य, आलोक, मंजुल यांचेही कार्य लक्षणीय आहे. माहिती व जनसंपर्क संचालनालयातील अधिकारी दिवंगत राजेंद्र सरग देखील व्यंगचित्रकार होते. ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान देखील उत्तम व्यंगचित्रकार म्हणून उदयाला येत आहेत. कठीणात कठीण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषय जनसामान्यांना समजून देण्याची मोठी ताकत व हातोटी कार्टूनिस्ट्सकडे असते. एखाद्या विषयाचे पूर्ण आकलन झाल्याशिवाय व्यंगचित्र काढता येत नाही. त्यामुळे हे काम नक्कीच सखोल अध्ययन व निरीक्षणाचे आहे. *राज्यपाल शंकरनारायणन यांचे व्यंगचित्रकलेविषयी विचार* राज्यपाल एस सी जमीर यांनी आपला कार्टूनिस्ट रंगा यांचेशी परिचय असल्याचे एकदा नमूद केले होते. त्यांचेनंतर राज्यपाल झालेले के. शंकरनारायणन हे व्यंगचित्रांचे चाहते होते. दिनांक १३ डिसेंबर २०१३ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल के शंकरनारायणन यांनी आर के लक्ष्मण यांच्या एका प्रदर्शनाचे नेहरू सेंटर येथे उदघाटन केले होते. त्यावेळी बोलताना शंकरनारायणन यांनी राजकीय व्यंगचित्रांबद्दल मार्मिक भाष्य केले होते : "मी अशा (केरळ) राज्यातून आलो आहे ज्याने देशाला अनेक ख्यातनाम व्यंगचित्रकार दिले आहेत. व्यंगचित्रकारांचे काम पाहतच मी लहानाचा मोठा झालो. एक गोष्ट मात्र खरी आहे की आर. के. लक्ष्मण यांनी आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर सलग साठ वर्षे, वाचकांवर जेवढा प्रभाव टिकवून ठेवला, तसा आणि तितका फार कमी व्यंगचित्रकारांना टिकवता आला. व्यंगचित्रकला ही पत्रकारितेची एक प्रभावी शाखा आहे. व्यंगचित्र हे एक दुर्मिळ सर्जन असते, ज्यामध्ये कला, व्यक्तिचित्रण आणि विषयावरचे प्रभावी भाष्य यांचा सुंदर मिलाफ असतो. समकालीन विषयांवरील राजकीय आणि सामाजिक भाष्याचे, उपरोधिक स्वरूपातील एक प्रकारचे ते दस्तऐवजीकरणच असते. भारताला व्यंगचित्रकलेचे जनक शंकर, अबू अब्राहम, रंगा आणि इतर अनेक नामवंत व्यंगचित्रकारांची परंपरा लाभली आहे. आजही मी सुधीर तेलंग, अजित नैनन, मोरपारिया आणि इतरांची व्यंगचित्रे आवर्जून पाहतो. एखाद्या देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्यमापन त्या देशातील वृत्तपत्रांना—आणि विशेषतः व्यंगचित्रकारांना—मिळणाऱ्या स्वातंत्र्यावरून करता येते. लक्ष्मण यांच्या एका प्रभावी राजकीय व्यंगचित्रात जे काही व्यक्त होते, ते हजार शब्दांच्या संपादकीय लेखातूनही व्यक्त होऊ शकत नाही. राजकीय व्यंगचित्रकलेचा भूतकाळ जरी वैभवशाली असला तरी वर्तमानात ही कला एका नाजूक टप्प्यातून जात आहे. अनेक वृत्तपत्रांनी व्यंगचित्रांचा आकार कमी करून त्यांना अगदी लहान जागेत बसवले आहे. काहींनी त्यांना मागील पानांवर ढकलले आहे, तर काहींनी व्यंगचित्रकारांनाच काढून टाकले आहे. लोकांना व्यंगचित्रे ही बातम्या किंवा शब्दप्रचुर लेखांपेक्षाही अधिक आवडतात, हे वृत्तपत्रांनी ओळखले पाहिजे." *"व्यंगचित्रांमध्ये उपशामक शक्ती' : पंतप्रधान नरेंद्र मोदी* दिनांक १८ डिसेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे दिवंगत आर के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचा समावेश असलेले 'टाइमलेस लक्ष्मण' या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान यांनी व्यंगचित्रे दुखावत नाहीत, तर उलट त्यांच्यात एक ‘उपशामक शक्ती’ (healing power) असते, असे उद्गार काढले होते. राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी राज्यातील एखाद्या विद्यापीठाने कार्टून्सच्या माध्यमातून सामाजिक राजकीय इतिहासाचे अध्ययन करण्याची सूचना केली होती व त्यासाठी आर के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचा संदर्भ घेण्याचे सुचवले होते. महाराष्ट्रात राज्यपाल पदावर असताना, विशेषतः तामिळनाडूच्या राज्यपाल पदाचा त्यांचेकडे अतिरिक्त कार्यभार असताना विद्यासागर राव यांच्यावर बरीच व्यंगचित्रे काढली गेली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेवर मात्र सर्वाधिक व्यंगचित्रे निघाली. ही व्यंगचित्रे त्या त्या काळातील राजकीय घटनांची आठवण करुन देतात.