नागलगाव–सुमठाण पाणंद रस्ता अखेर मोकळा न्यायालयाचा धडक निर्णय : अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजारांचा दंड उदगीर तालुक्यातील नागलगाव ते सुमठाण या गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पाणंद रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार हटविण्यात आले. या प्रकरणात अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना न्यायालयाने तब्बल २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, उदगीर तालुक्याच्या इतिहासात अशा प्रकारे दंडात्मक कारवाई होण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून नागलगाव सुमठाण मार्गावरील पाणंद रस्ता एका शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून बंद केल्याने परिसरातील शेतकरी,व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतात जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने अनेक वेळा वाद निर्माण झाले होते.याप्रकरणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर महसूल प्रशासनाने प्रकरण न्यायालयात दाखल केले होते.सदर प्रकरणाची न्यायालयाने गंभीर दखल घेत संबंधित अतिक्रमणधारक शेतकऱ्यांवर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावत तातडीने रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर महसूल प्रशासन, पंचायत विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आले.प्रशासनाच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील अडथळे हटवून अखेर पाणंद रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. यावेळी परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.या कारवाईमुळे नागलगाव व सुमठाण परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. भविष्यात पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून गेला असल्याची जोरदार चर्चा उदगीर तालुक्यात सुरू आहे.
Shuru अॅपवरून बातम्या शेअर करून पैसे कमवा