🚩🌹🌹🚩
सार्थ तुकाराम महाराज गाथा
अभंग क्र.३५२२
काशासाठीं बैसों करूनियां हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा ॥१॥
काय आलें एका जिवाच्या उद्धारें । पावशी उच्चारें काय हो तें ॥ध्रु.॥
नेदी पट परी अन्नें तों न मरी । आपुलिये थोरीसाठीं राजा ॥२॥
तुका म्हणे आतां अव्हेरिलें तरी । मग कोण करी दुकान हा ॥३॥
अर्थ
देवा तुम्हाला मी केलेले काव्यरचना आवडतच नसेल तर व्यर्थ मी माझ्या काव्यरचनेचा का बाजार करत बसू कशाला व्यर्थ बोभाट व डांगोरा करत बसू. देवा एका जीवाचा उध्दार केल्याने तुझे काय जाणार आहे तुझ्या नावाचा उच्चार जरी आम्ही केला तरी तू आम्हाला मिळशीलच. कोणताही राजा असो आपली सत्ता तो प्रजेला तर देणार नाही परंतू आपला मोठेपणा राखण्यासाठी प्रजेला उपाशीही मरु देणार नाही तो त्यांना खाण्यासाठी अन्न तरी नक्की देईल. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही माझा अव्हेरच केला आहे तर मग काव्यरचनेचे दुकान कोण मांडीत बसेल ?”
संत तुकाराम महाराज
🚩🙏🚩
#🌻आध्यात्म 🙏