Adv. Jitesh Potdar
747 views
11 days ago
*आयुष्याची चौकट — की मनाचा कैदखाना?* (गोलमाल.. भाग -2) प्रत्येक माणूस स्वतःभोवती एक चौकट आखतो. कधी ती सामाजिक संस्कारांची असते, कधी परिस्थितीची, तर कधी स्वतःच्या सोयीची. पण खरी गंमत अशी की ही चौकट आपण जगण्यासाठी बनवतो की स्वतःलाच कैद करण्यासाठी — याचा विचार आपण क्वचितच करतो. आपण म्हणतो, “माझं आयुष्य, माझे नियम.” पण हे नियम खरंच आपल्या मनाचे असतात का, की इतरांना सांभाळण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी आखलेले असतात? एखाद्याला आपल्या चौकटीत स्थान देताना आपण कधी विचार करतो का — की त्या व्यक्तीला या मर्यादा मान्य आहेत का? कारण चौकट ही एकतर्फी असली की नातं हळूहळू तडजोड बनतं. आणि तडजोड जेव्हा सवय होते, तेव्हा मन हळूहळू गुदमरायला लागतं. काही लोक आपल्या आयुष्यात येतात — तुमची विस्कळीत चौकट सावरण्यासाठी. ते तुमच्या तुटलेल्या रेषा जोडतात, तुमच्या जगण्याला आकार देतात… पण त्या प्रक्रियेत ते स्वतःची चौकट विसरतात. आणि एक दिवस — लोक सांगतात, “आता माझी चौकट पूर्ण झाली आहे.” आणि तुम्हाला परके करून टाकतात. मग प्रश्न उभा राहतो — चौकट पूर्ण झाली की नातं संपतं का? आपण नात्यांना “अपडेट्स” देतो, पण मन कधी अपडेट करत नाही. आपण उपस्थिती दाखवतो, पण सहभाग हरवतो. आणि मग नातं राहातं फक्त नावापुरतं — ना वास्तवात, ना आभासी जगात. इथेच काही कोत्या मनाची, भित्री माणसं दिसतात. निर्णय घ्यायची हिंमत नसते की नेहमी गुंत्यात अडकवून रहायची सवय असते. स्पष्ट बोलण्याचं धाडस नसतं, पण गोंधळ निर्माण करण्याची सवय मात्र पक्की असते. ही माणसं नातं तोडत नाहीत — पण टिकवतही नाहीत. ती तुमच्याशी राहतात, पण तुमच्यासाठी नसतात. ती बोलतात, पण मनापासून नाही. ती जवळ असतात, पण आधार बनत नाहीत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे — त्यांना तुमच्या भावनांची जाणीव असते… पण त्या जाणीवेची जबाबदारी घ्यायची त्यांची तयारी नसते. म्हणूनच ती कधी दुर्लक्ष करतात, कधी तुलना करतात, कधी तुमचं अस्तित्वच कमी लेखतात. कारण त्यांना स्पष्ट नात्यांपेक्षा, अस्पष्टता जास्त सोयीची वाटते. पण वेळ कोणासाठी थांबत नाही. एक दिवस येतो — जेव्हा याच माणसांना सगळं कळतं. आपण काय गमावलं, कोणाला दुखावलं, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. कारण ज्या व्यक्तीने मनापासून साथ दिली होती, पण तोपर्यंत ती व्यक्ती थकलेली असते… आणि तेव्हा — हीच कोत्या मनाची, भित्री माणसं मग ना त्यांना समजून घेणारं कोणी, ना सावरणारं कोणी. कारण नात्यांची किंमत ती तुटल्यानंतर कळली — तर ती किंमत भरूनही परत मिळत नाही. पण यांनतरही तुम्ही मात्र — मोकळ्या मनाने दिलेली साथ, पुढे केलेला मदतीचा हात, मनापासून व्यक्त केलेली भावना… हे सगळं घेऊन उभे राहता. तरी पण समोरच्याला ते दिसतच नाही. तेव्हा मनात एक विचित्र घालमेल सुरू होते — “हे नातं हवं आहे की नाही?” “मी चुकीचा आहे की तो?” आणि इथेच माणूस तुटायला लागतो. कारण *काही वेळा निर्णय घेणं कठीण नसतं —तो स्वीकारणं कठीण असतं.* आपण घेतलेले निर्णय आपल्यालाच पटत नसतील,तर ते दुसऱ्याला पटवण्याचा हट्ट का? आणि जर आपण ठाम असू — तर समोरच्याला पटवण्याची गरज तरी काय? पण नाही… आपण स्वतःला सिद्ध करण्यात इतके गुंततो, की नातं वाचवताना स्वतःलाच हरवून बसतो. आणि मग एक टोक येतं — जिथून सगळं उध्वस्त होणार असतं. मनातलं प्रेम तळमळ बनतं, आणि तळमळ हळूहळू वेदना बनते. त्यांना सगळं कळतं, पण ते कधीच मनापासून व्यक्त होत नाहीत. कारण त्यांच्यासाठी नातं म्हणजे एक पर्याय असतो — आणि तुमच्यासाठी… तेच संपूर्ण आयुष्य. शेवटी एकच प्रश्न उरतो — चौकट जपायची की मन? कारण चौकट तुम्हाला सुरक्षित ठेवते, पण मनच तुम्हाला जिवंत ठेवतं. आणि जिथे जिवंतपणाच हरवतो — तिथे कोणतीही चौकट उपयोगाची राहत नाही. क्रमश: © ॲड. जितेश पोतदार #☀️गुड मॉर्निंग☀️