#JKK_Weekly_News_Bulletin
महाराष्ट्राचे विभाजन: व्यवहार्य की अव्यवहार्य..?
भाग २
महाराष्ट्राचे विभाजन अशा प्रकारे करता येईल...!!
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
आजच्या महाराष्ट्राचे चार किंवा पाच भागात विभाजन व्हावे म्हणजे राज्यांचा कारभार अधिक सुरळीतपणे चालू शकेल असे काही अभ्यासक ठामपणे सांगतात. माझ्याही अल्पमतीनुसार आणि थोड्याफार अभ्यासानुसार मी महाराष्ट्रात पाच राज्य असावी असा निष्कर्ष काढला आहे. मात्र यावर काही भाष्य करण्यापूर्वी राज्यांचे गठन कोणत्या निकषांवर केले जावे आणि आज त्या निकषांवर महाराष्ट्राचे गठन झाले आहे का याबाबत आपण थोडा आढावा घेऊ या.
मागच्या लेखात मी नमूद केले होते की १९५२ मध्ये पंडित नेहरूंनी देशाची भाषावार प्रांत रचना करावी या दृष्टीने न्यायमूर्ती फजलअली कमिशन नेमले होते. न्यायमूर्ती फजल अलींनी १९५४ मध्ये आपला अहवाल देखील शासनाला सादर केला. मात्र या अहवालातील अनेक सूचनांचा विचारच न करता काही राज्यांचे गठन केले गेले.
ते करताना कुठेतरी राजकीय सोयीच बघितल्या गेल्या असेही अभ्यासकांचे मत आहे. त्याच सोयीतून १९५६ मध्ये बॉम्बे स्टेटचे गठन झाले होते. वस्तुतः महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन भिन्न राज्यं होती. तिथल्या भाषा, संस्कृती, भौगोलिक रचना, हवामान, सगळेच काही भिन्न होते. मात्र तरीही राजकीय सोयीसाठी नेहरूंनी महाराष्ट्र आणि गुजरातची मोट एकत्रितपणे बांधली. त्यामुळे संघर्ष निर्माण झाला. मग त्यातही मुंबई कोणाची यावरून वाद झाले आणि १०५ हुतात्म्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. असाच प्रकार त्यावेळी हरियाणाच्या बाबतीतही झाला होता. नंतर काही वर्षांनी पंजाब आणि हरियाणा हे दोन वेगळे राज्य केले गेले होते. मूळच्या मध्यप्रदेश पासून बरेच अंतर दूर असलेला छत्तीसगड देखील त्यावेळी मध्य प्रदेश ला जोडून दिला होता. त्यामुळे छत्तीसगडच्या जनसामान्यांना आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी जर राज्याच्या राजधानी जायचे असेल तर दुसऱ्या राज्यातून म्हणजेच महाराष्ट्रातून नागपूरमार्गे जावे लागत होते. असे द्राविडी प्राणायाम त्यावेळी खूप केले गेले होते.
आजचा भारत हा वेगवेगळे प्रदेश एकत्र करून तयार झालेला देश आहे. इथे काश्मीर ते कन्याकुमारी असा हजारो किलोमीटरच्या परिसरात भिन्न भिन्न भाषांचे लोक वास्तव्य करतात. ज्याप्रमाणे भाषा भिन्न आहेत, त्याप्रमाणे तिथली संस्कृती देखील भिन्न आहे प्रत्येक भागात हवामान देखील वेगळे आहे. त्यामुळे तिथे निर्माण होणारे पीक, त्यानुसार तिथल्या जनसामान्यांची खाद्य संस्कृती ही देखील वेगवेगळी राहिलेली आहे. म्हणूनच पंजाब मधला माणूस छोले भटूरे खातो तर दक्षिणेतला माणूस मसाला डोसा आणि रवा डोसा योग्य समजतो. महाराष्ट्रातली पुरणपोळी जशी प्रसिद्ध आहे, तशीच राजस्थान मधली दाल बाटी देखील प्रसिद्ध आहे. या भिन्न प्रांतामधली संस्कृती वेगळी आहे. भाषा ही वेगळी आहे. महाराष्ट्रात महिला लग्नानंतर गळ्यात मंगळसूत्र घालतात, तर हिंदी भाषिकांमध्ये त्या भांगात सिंदूर भरतात. उत्तर प्रदेश, पंजाब आणि काश्मीरचा माणूस चुडीदार पायजामे वापरतो, तर दक्षिणेतील माणूस लुंगी घालून फिरतो. अशी भिन्न प्रांतात भिन्न भाषा, भिन्न संस्कृती, भिन्न खानपान आपल्याला आढळते. त्यामुळेच १९५२ मध्ये भाषावार प्रांत रचना करण्याचा विचार समोर ठेवला गेला होता. इंग्रजांनी दक्षिणेतील त्यावेळेस मद्रास म्हणजेच आजचे तामिळनाडू कर्नाटक केरळ आंध्र असे सर्व प्रदेश एकत्र करून एकच मद्रास स्टेट केले होते. नेहरूंनी देखील तेच चालू ठेवले होते. इथे मद्रास प्रांतात तामिळी भाषा तर आंध्र प्रदेशात तेलगू बाह्य आणि कर्नाटकात कानडी भाषा तर केरळात मल्याळम भाषा असा प्रकार होता. त्यामुळेच तेलगू भाषिकांनी स्वतंत्र राज्य मागितले आणि दीर्घकाळ संघर्ष करून वेगळा आंध्रप्रदेश मागून घेतला होता. नंतर त्यांच्यातही संघर्ष होऊन आता आंध्र आणि तेलंगगणा हे दोन वेगवेगळे प्रांत झालेले आहेत. तोच प्रकार पंजाबचाही झाला आहे. आधी पंजाब हेच एक मोठे राज्य होते. मग हरियाणातील जाट मंडळींनी आम्हाला वेगळे राज्य हवे अशी मागणी करत संघर्ष केला आणि त्यामुळे हरियाणा आणि पंजाब वेगवेगळ्या झालेले आहेत. त्याच पद्धतीने बिहार मधून झारखंड उत्तर प्रदेशातून उत्तराखंड आणि मध्यप्रदेश मधून छत्तीसगड वेगळे केले गेले आहेतच. इकडे ईशान्य भारतात आसाम पासून वेगळे होत मणिपूर मेघालय अशी छोटी छोटी राज्य झालेली आहेतच.
हे सर्व मुद्दे लक्षात घेत भाषावार प्रांत रचना जरी झाली तरी आज समस्या कायम आहेतच. अभ्यासकांच्या मते प्रांतांचे गठन करताना तिथली बोलीभाषा, त्यानंतर तिथली भौगोलिक रचना, तिथली संस्कृती, तिथले हवामान, आणि त्या परिसराचा इतिहास, तसेच तिथली एकूण लोकसंख्या या सर्वांचा विचार केला जायला हवा. जाणकारांच्या मते आज प्रत्येक प्रांतात जर दोन ते तीन कोटी च्या दरम्यान लोकसंख्या राहिली तर प्रशासनाला नियोजन करणे सोयीचे जाते. मात्र आपल्याकडे प्रांतरचना करताना तो विचार झालेला नाही.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास आज महाराष्ट्राची लोकसंख्या १३ कोटी आहे. तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तामिळनाडू केरळ बंगाल या सर्वच राज्यांची परिस्थिती अशीच आहे. त्यामुळेच आज अनेक ठिकाणी संघर्ष होताना दिसतो आहे. भाषा तज्ज्ञांच्या मते दर दहा कोसावर बोलीभाषा बदलते. त्यामुळेच आपल्या महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाले तर महाराष्ट्राच्या विभिन्न भागात वेगवेगळी मराठी भाषा बोलली जाते. त्यात वऱ्हाडच्या काही भागात वऱ्हाडी भाषा बोलली जाते. नागपूरकडे थोडी वेगळीच मराठी भाषा बोलली जाते. इकडे मराठवाड्याची मराठी वेगळी आहे. खानदेशातली अहिराणी मराठी आहे. कोकणात कोकणी भाषा बोलली जाते, तर मुंबईमध्ये मु
बंबईय्या मराठी बोलली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील मराठी भाषा एकदमच वेगळी आहे. यातही कोणती मराठी बरोबर यावर वाद आहेतच. मराठी भाषा निश्चितीसाठी जी तज्ञ मंडळी बसली, त्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई ठाणे परिसरातील तज्ञांचाच समावेश होता. त्यामुळे तिथलीच भाषा प्रमाण म्हणून घेतली गेली आहे. त्याच वेळी उर्वरित भागातील मराठी भाषांमध्ये देखील तितकेच साहित्य निर्माण झालेले आहे. अगदी महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकाला गोंदिया गडचिरोली या परिसरात पोवारी समाज मोठ्या प्रमाणात आहे. पोवारी आणि चंद्रपूर गडचिरोलीतील आदिवासी यांच्याही भाषा वेगवेगळ्या आहेत. त्यातही आज मोठ्या प्रमाणात चांगले साहित्य निर्माण झाले आहे.
ज्याप्रमाणे महाराष्ट्रातही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषा आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक भागाची खाद्य संस्कृती देखील वेगळी आहे. आज कोकणात तांदुळाचे पीक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे तिथे भात आणि तांदुळाचे पदार्थच प्राथमिक प्रमाणे प्राथम्य क्रमाने ताटात दिसतात. त्याचवेळी वऱ्हाडातली खाद्य संस्कृती अगदी वेगळी आहे. तिथे ज्वारीचे पीक मुबलक होते. त्यामुळे भाकरी हा त्यांचा महत्त्वाचा आहार राहिला आहे. मराठवाड्यात सुद्धा त्यांचा एक वेगळा बाज असल्याचे दिसून येते. वेगवेगळ्या फळभाज्यांची फळांची नावे देखील प्रत्येक भागात वेगवेगळी आहे वऱ्हाडात ते फळ कोहळा म्हणून विकला जाते तेच मराठवाड्यात गंगाफळ म्हणून विकले जाते मुंबई पुण्याकडे मात्र त्याला तांबडा भोपळा म्हटले जाते असा फरक अनेक बाबतीत आपल्याला आढळून येतो.
आज महाराष्ट्रातल्या विविध भागात जशी खाद्य संस्कृती वेगळी आहे, हवामान वेगळे आहे तशाच प्रत्येक ठिकाणच्या रितीभाती देखील वेगवेगळ्या असल्याचे आढळून येते. आज वऱ्हाडात भाद्रपद महिन्यात जो भुलाबाईचा खेळ खेळला जातो, तोच मुंबई पुण्याकडे भोंडला म्हणून खेळला जातो, तर पश्चिम महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याच्या काही भागात त्याला हादगा असे म्हटले जाते. नारळी पौर्णिमेला कोकणात समुद्रात नारळ टाकून समुद्राची पूजा केली जाते. वऱ्हाडात मात्र तो दिवस राखी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. अशा विभिन्न मुद्द्यांवर तिथे तुम्हाला फरक आढळू शकतो.
महाराष्ट्रातल्या विभिन्न बाबत भागात हवामान देखील वेगवेगळे आहे. विदर्भ हा साधारण पावसाचा प्रदेश आहे. तर मराठवाड्यात पाऊस फार कमी पडतो. त्यामुळे मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो काही वर्षांपूर्वी पाण्याच्या दुष्काळामुळे इथे जी समस्या निर्माण झाली होती तिच्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाला टँकरने बाहेरून पाणी बोलवावे लागले होते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पाऊस मुसळधारच कोसळतो. त्याचप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्यात जितके रणरणते ऊन आहे, तसे काही खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नाही. त्यामुळेच उर्वरित महाराष्ट्रातील माणूस नागपुरात किंवा विदर्भातच रणरणत्या उन्हाळ्यात यायला घाबरतोच. काही वर्षांपूर्वी मी माझ्या मुंबईतील पत्रकार मित्रांना उन्हाळ्यात नागपूरला या असे आमंत्रण दिले, तेव्हा त्यांनी "आम्हाला भाजून खायचंआहे का?" असा प्रश्न मला विचारला होता. यावरून ही भिन्नता लक्षात येते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हवामानात फरक हा आढळतोच.
भौगोलिक दृष्ट्या बघितले तर विदर्भाचा प्रवेश प्रदेश हा वैनगंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो, मराठवाड्याचा प्रदेश हा गोदावरी नदीचे खोरे म्हणून ओळखला जातो, त्याचवेळी खानदेश चा भाग हा तापी नदीचे खोरे म्हणून ओळखतात, तर पश्चिम महाराष्ट्र हा कृष्णा नदीचे खोरे म्हणून ओळखला जातो. मुंबई आणि कोकण हा समुद्रालगत सहभाग आहे. त्यामुळे इथले हवामान पुन्हा अजूनच वेगळे आहे. इथे विदर्भ किंवा मराठवाड्यासारखा उन्हाळा नसतो मात्र इथल्या उन्हाळ्यात सामान्य माणूस घामाने त्रस्त झालेला असतो. हा महाराष्ट्राचा समुद्रकिनारी असलेला भाग म्हणून ओळखला जातो. या पाचही भागांचे जीवनमान हवामान जीवनशैली आणि भाषा संस्कृती आणि इतिहास यात प्रत्येक ठिकाणी थोडाफार तरी फरक आहेच. मात्र सत्ताधाऱ्यांच्या दुराग्रही धोरणामुळे हे सर्व भाग एकत्र बांधले गेलेले आहेत.
महाराष्ट्राची राजधानी आज मुंबई आहे. मात्र महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला राजधानी जवळ करणे सहज शक्य होत नाही. विदर्भातला गडचिरोली आणि गोंदिया भाग घेतला, किंवा मग कोकणातला रत्नागिरी सावंतवाडी घेतला, अगदी कोल्हापूरहून जरी यायचे म्हटले, तरी किमान एक रात्रीचा प्रवास करावा लागतो. म्हणजे इथल्या कुठल्याही व्यक्तीला काही कामाने राजधानीत यायचे तर त्यांना दोन-तीन दिवसाच्या मुक्कामानेच यावे लागते. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. तशीच देशाची आर्थिक राजधानी देखील आहे. त्यामुळे इथे सर्वच काही अतिशय महाग आहे. परिणामी सामान्य माणूस तिथे मुक्काम करायची वेळ आली तर गडबडतो. वस्तुतः राज्याचे गठन करताना जाणकारांच्या मते राज्याचे मुख्यालय हे त्या परिसरातील प्रांतातील प्रत्येक व्यक्तीला सहजगत्या पोहोचता येईल असे असावे. मात्र आज गोंदिया किंवा गडचिरोली इथल्या व्यक्तीला तिथे पोहोचायलाच दीड दिवसाचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे मग कामे होत नाहीत. कारण सर्वच कामे मंत्रालयात केंद्रित झालेली असतात. म्हणूनच मग जन असंतोष वाढीला लागतो.
ज्याप्रमाणे सामान्य माणूस मुंबईला येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे राज्याच्या मुख्यालयात म्हणजेच मुंबईत मंत्रालयात आणि इतर शासकीय खात्यांमध्ये काम करणारे अधिकारी सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात पोहोचू शकत नाहीत. परिणामी त्यांना तिथल्या समस्या काय हे कधीच कळत नाही. मंत्रालयातील अधिकारी प्रत्येक बाब निश्चित करताना मुंबई आणि परिसरातील निकष लावतात आणि ठरवतात. त्यामुळे इतर भागांवर अन्याय होत असतो. आज महाराष्ट्रात नेमके तेच होते.
त्यामुळेच आज महाराष्ट्राच्या सीमेवर असणारी बरीच खेडी बाजूच्या राज्यात जुळलेली दिसून येतात. इतकेच काय, तर त्या राज्यांनी काही खेड्यांवर आपलाच हक्क प्रस्थापित केला आहे. आज गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील अनेक खेडी महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये समाविष्ट झालेली दाखवली जातात. तिथले नागरिक महाराष्ट्र आणि तेलंगणा असे दोन्हीकडे मतदान करताना दिसून येतात. नाशिक जिल्ह्यातील सापउतारा हे पर्यटन स्थळ मुळात महाराष्ट्राचे होते. मात्र गुजरातने ते आपल्याकडे ओढले आणि पर्यटन स्थळ म्हणून त्याचा विकास केला आहे. आज महाराष्ट्राच्या भोवती असलेली छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक अशा सर्वच राज्यांच्या सीमारेषेवर असलेल्या खेड्यांमध्ये ही समस्या आहे. मध्यंतरी पश्चिम महाराष्ट्रातील महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरील काही खेड्यातील नागरिकांनी आम्हाला कर्नाटकला जोडा, कारण महाराष्ट्र सरकार काहीच सोयी सवलती देत नाही ,अशी मागणी केली होती. आज महाराष्ट्राच्या प्रशासनाला देखील इतका मोठा भार सांभाळणे कठीण झाले आहे.
त्याचमुळे आजच्या महाराष्ट्राचे जर विभाजन केले गेले तर प्रत्येक राज्य स्वयंपूर्ण होऊ शकेल आणि मराठीची पाच राज्य झाली तर केंद्रातही मराठीचा प्रभाव वाढू शकेल.
हे सर्व मुद्दे लक्षात घेत आजच्या महाराष्ट्राचे मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, आणि विदर्भ असे पाच प्रांतांमध्ये विभाजन केले जाऊ शकते. असे केले तर विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, आणि बुलढाणा या अकरा जिल्ह्यांचा समावेश केला जाऊ शकेल. मराठवाड्यात नांदेड, लातूर, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश केला जाऊ शकेल. खानदेशात नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार, हे जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली, तर कोकण प्रांतात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश केला जाऊ शकेल. यात सर्वच भागांची लोकसंख्या अंदाजे दोन ते तीन कोटीच्याच दरम्यान राहू शकेल, आणि प्रशासकीय अंतर देखील कमी होऊ शकेल. इथे कोकणची राजधानी मुंबई, पश्चिम महाराष्ट्राची पुणे, खानदेशची नाशिक, मराठवाड्याची छत्रपती संभाजीनगर, आणि विदर्भाची राजधानी नागपूर असे नियोजन केले जाऊ शकेल. यावर जर विचार करायचा झाला तर हा विषय अधिक सविस्तरपणे अभ्यासता येईल.