#🔴सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री➡️ हॅट्स ऑफ सुनेत्राजी पवार!
अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार घराबाहेर पडल्या. पाचव्या दिवशी शपथ घेऊन राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. अस्थि जमा केल्या त्याच रात्री त्या बारामतीहून मुंबईला आल्या. रात्रीचा प्रवास केला त्यांनी. अशा काळात रात्रीचं बाहेर जाऊ दिलं जात नाही. पती गेलेल्या स्त्रीने तर रडत, शोक करतच बसायचं असतं. काही बाया तर घराबाहेर खिडकीत, गॅलरीतसुद्धा येत नाहीत. पण सुनेत्रा पवारांनी पतीच्या निधनाच्या दु:खातही मोठा निर्णय घेतला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. त्यासाठी त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन!
त्या अजितदादांच्या पत्नी, पवारांच्या सुन होत्या, राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या कुटूंबातून येतात म्हणून त्या हा निर्णय घेऊ शकल्या. असतीलही ही कारणं पण लक्षात घ्या की हा धाडसी निर्णय घेऊन त्यांनी अजितदादा शेवटपर्यंत सांगत राहिले त्या शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सुनेत्रा पवार चालवणार हे दाखवून दिलं. सुनेत्रा पवारांचं अजितदादांनंतरचं पहिलंच आणि धाडसी पाऊल म्हटलं पाहिजे.
राजकारणासाठी वेळ प्रसंगी टोकाचे, आव्हानात्मक निर्णय घ्यावे लागतात आणि ते घेण्याची आपल्यात क्षमता आहे, हे यातून सुनेत्रा पवारांनी दाखवून दिलंय. त्यामुळेच सुनेत्रा पवारांचं कौतुक करावंसं वाटतंय.
'त्या बाहेरुन आल्याहेत' (महिलेला जसं कायम हिणवलं जातं दुसऱ्या कुटूंबातून आलेली) याची आठवण त्यांना कितीही करुन देण्याचा प्रयत्न झाला तरी त्या शपथ घेतानाही जेव्हा
'मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की...' असं म्हणतात तेव्हा पवार कुटुंबियांची वारसा चालवण्याची जबाबदारी आपली आहे की नाही या संभ्रमात न पडता पवार कुटूंबियांचा वारसा समर्थपणे पेलण्याची ताकद आपल्यात आहे हे संयतपणे समाजासमोर ठेवतात. (पवार कुटूंब ईश्वरसाक्ष अशी शपथ घेत नाहीत. तर गांभीर्यपूर्वक असं म्हणतात)
मराठा समाजाचं वर्चस्व असणाऱ्या, ग्रामिण भागात, त्यातही प. महाराष्ट्रात फुललेला- बहरलेला राष्ट्रवादी हा पक्ष. ग्रामिण भागाचं राजकारण करणारा पक्ष. नाही म्हटलं तरी डोक्यावर पदर घेऊन घराबाहेर पडणाऱ्या महिला लोकप्रतिनिधीचं कौतुक असतंच अशा भागांमध्ये. ग्रामिण भागात ज्या बाईच्या नवऱ्याचं निधन होतं त्या बाईने घराबाहेर पडणं हे म्हणजे तिचं कुलक्षणी असल्याचं लक्षण मानलं जातं. तिला सव्वा महिन्यानंतर नातेवाईक 'घराबाहेर काढतात' (म्हणजे कोणा नातेवाईकाकडे नेलं जातं. दु:खातून बाहेर काढण्यासाठी. तसं करणं ही एक प्रथा बनलीय.) सुनेत्रा पवारांनी मोठ्या हिंमतीने घराबाहेर पडण्याचा निर्णय घेत या सर्व समाजबुडव्या विचारांचं समर्थन करणार नाही हे दाखवून दिलं. खरंतर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षांना, नेत्यांना त्यांनी दिलेली ही चपराक आहे. पण असा सेक्युलर (पुढारमतवादी) विचार घेऊन पुढे त्यांनी राजकारणात वावरावं ही त्यांच्याकडून अपेक्षा. लक्षात घ्या ग्रामिण राजकारणात कितीही ध्येयधोरणी स्त्री असली तरिही तिने समाजाच्या चौकटीचं उल्लंघन करणं हे रुचत नाही समाजाला. विशेषत: मराठ्यांच्या चिरेबंदी वाड्यातल्या बायकांचे नियम त्यांच्यासाठी असलेल्या प्रथा, पद्धती यांच्याबद्दल आजही गर्वाने बोललं जातं त्या प. महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवारांचं हे विद्रोही पाऊलच म्हणावं लागेल.
पतीच्या राजकीय स्वप्नपूर्तीसाठी त्यांची धडपड यातून दिसते. त्यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवण्याचा निर्णय काही नेत्यांनी का घेतला असेना पण हे महत्त्वाचं अधिकाराचं पद घेण्याची त्यांनी दाखवलेली तयारी हा कौतुकाचाच मुद्दा आहे. पण हे असे निर्णय कोणत्याही आश्वसनांना किंवा, दबावाला बळी पडून त्यांनी घेऊ नयेत असंच वाटतं.
सुनेत्रा पवार काय करणार? त्यांना काय कळणार? सध्याच्या राजकारणातले डाव - प्रति डाव खेळण्याची त्यांची बौद्धिक क्षमता आहे का? हे असे प्रश्न साहजिकच पडत राहतीलच अनेकांना. पण लक्षात ठेवा की त्यांनी या राजकारणात पवार कुटूंबाची परवानगी, कुटूंबाशी चर्चा न करताच स्वत:चा निर्णय घेतलाय. तर त्या कुटूंबाचं भावनिक राजकारण फारसं सोसत बसणार नाहीत हे यातून दिसतं. पण हाच कणखरपणा त्यांनी पक्षातल्या नेत़्यांबाबत, त्यांच्या पक्षातील पदाधिकारी, आमदार आणि मंत्र्याबाबतही ठेवला पाहिजे.
सुनेत्रा पवारांना अजितदादांकडचं एक वित्त आणि नियोजन हे खातं सोडून औकाफ, अल्पसंख्यांक, क्रिडा आणि युवक कल्याण ही खाती देण्यात आलीत. पण दादांसारखी समान वागणूक त्यांच्या मित्र पक्षातील दोन नेत्यांनी देणं अपेक्षित आहे. माझं तर म्हणणं आहे की स्पर्धा करायचीच असले, राजकीय संघर्ष कोणाला जर सुनेत्रा पवारांशी करायचाच असेल तर आधी मुख्यनंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी सुनेत्रा पवारांना त्यांच्या बरोबरीने येण्यासाठी मदत करावी, ताकद द्यावी, सक्षम करावं आणि मग संघर्षासाठी सज्ज व्हावं किंवा कुरघोड्या कराव्यात. सुनेत्राजींना कमजोर समजून किंवा कमजोर ठरनून सत्तेत अजितदादांसारखा मान देणार नसतील तर या नेत्यांनी सुरू केलेली 'लाडकी बहिण' योजना ही केवळ मतदारांना खुष करण्यासाठी आहे. त्यामागे महिलांचं सक्षमीकरण ही निव्वळ फसवेगिरी आहे असंच म्हणावं लागेल. खरंतर फडणवीस आणि शिंदे हे सुनेत्रा पवारांना प्रत्यक्ष कशी वागणूक देतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.
तसंच महिला आहे म्हणून सुनेत्राजींना पुढे करुन निर्णय घेण्याचे 'स्वप्न मनोरे' जर कोणी बांधत असेल तर त्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. सुनेत्राजींनही भावनिक न होता तटस्थपणे सर्व राजकारण हाताळावं असं वाटतं.
दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्यावरही जबाबदारी वाढतेय महिला आहेत म्हणून ही संधी मिळाली हे डोक्यात न ठेवता त्यांनी झपाट्याने काम केलं पाहिजे. विशेषत: भाजपशी, भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांशी स्वत: चर्चा, वाटाघाटी केल्या पाहिजेत. वेळ येईल तेव्हा न कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्णय घेतले पाहिजेत. जसे अजितदादा घेत राहिले. हो, महत्त्वाचं म्हणजे विलीनीकरण होणारच नसेल तर पक्षाचे निर्णय स्वत:च घेतले पाहिजेत. निर्णय चुकले तरी चालतील पण कोणावर अवलंबून राहून, कोणाची मदत घेऊन उगीच इतरांच्या निर्णयाची जबाबदारी वाहण्यापेक्षा स्वत:च्या निर्णयातून धोका असेल तरी तो पत्करण्याची तयारी ठेवली पाहिजे.
ग्रामिण भागातील राजकारण हे महिलेने डोक्यावर पदर घेऊन करावं या विचाराचंच असतं. त्यातही सुनेत्रा पवारांनी चौकटीबाहेर पडत घेतलेल्या निर्णयाचं भारीच कौतुक वाटतंय म्हणून हा पोस्ट प्रपंच. महाराष्ट्रात एक महिला नेता मोठ्या पदावर दिसणार, एक महिला नेतृत्त्व महाराष्ट्राला मिळालं याचा अभिमान आहे. म्हणूनच अपेक्षांच्या ओझ्याखाली आणि कतृत्त्वाच्या, निर्णयाच्या दबावाखाली त्यांनी येऊ नये आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर शंका उपस्थित करणाऱ्या सर्वांना खोटं ठरवावं ही ईच्छा आहे.
(यातले जवळ जवळ सर्व मुद्दे मी मुंबई Tak च्या लाईव्हमध्ये मांडलेत. )
#sunetrapawar #AjitPawar #ajitdada