एक like तर बनतोच ना .. 👍

★•°⚞°સचिન°⚟°•★
4.6K views
8 days ago
🌻🌹भगवंताचा आनंद हा निरुपाधिक असतो. 🌻🌹 प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे. तो काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख क्वचितच मिळते. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहीजे. जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते? वास्तविक आपण कशाकरीता काय करतो हेच विसरतो. म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख ! दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो, त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद, तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो. दृष्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे, ती अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आपण जगामध्ये व्याप वाढवितो, तो आनंदासाठीच वाढवितो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने, ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. खरा आनंद दृष्य वस्तूंमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तूरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरूपाधिक असतो. स्वानंद स्मरणाव्यतिरीक्त जे स्फुरण तोच विषय समजावा. खरी आनंदी वृत्ती हीच दसरा-दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद, तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय. आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच होय. जो निस्वार्थबुद्धीने प्रेम करतो, त्याला आनंद खास मिळतो. घेणारा 'मी' जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हॄदयात स्वयंभू आहे. वृत्ति वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्थ बसावे, रामाला आठवावे, त्याच्या पायावर मस्तकठेवून त्याला म्हणावे,"रामा, माझे मन शुद्ध कर. देहबुद्धी देवू नको. तुझे चरण, तुझे हास्य, मला सदा पाहू दे. तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव". रामाला प्रेमाने आळवून, राम परमानंदरूप आहे असे जाणून, त्याच्याशी अनन्य होऊन राहावे. मी कुणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे, या गोड भावनेत आनंदाने असावे. ‼️मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा.‼️ #एक like तर बनतोच ना .. 👍
★•°⚞°સचिન°⚟°•★
1K views
19 days ago
🌻🌹साधन - चतुष्टय. 🌹🌻 कोणतीही इमारत बांधीत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे. प्रथम, नित्यानित्य वस्तुविवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या वाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर, या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरे साधन होय. आपले मनबाह्य विषयांकडे धाव घेते; तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे, गुरूच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा, हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे; हे तिसरे साधन होय. शेवटी, भगवंताच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधनसामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नव्हे. जनावरेदेखील आपापला प्रपंच करतातच. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही. खरोखर, भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठविलेले आहे. त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल, त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते, पण हे आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते, म्हणून सुखदुःख बाधते. म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. प्रपंचाची तर्हा अशी असते की, आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले, की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते. म्हणून, एका डोळ्यात सुखाचे अश्रू, तर दुसर्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते, तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे ? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे, आणि बरावाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे. जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणार्याचे राम कल्याण करतो, एवढे माझे सांगणे शेवटर्यंत विसरू नका. ‼️अती प्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बाधणार नाहीत.‼️ #एक like तर बनतोच ना .. 👍
★•°⚞°સचिન°⚟°•★
3.2K views
22 days ago
🌻🌹आधी श्रद्धा, मग कृती, नंतर अनुभव. 🌻🌹 गुरुआज्ञे प्रमाणे वागणार्याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते. तसे, गुरूचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणार्याला कसली नड असणार ? लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते, परिसापाशी सोने व्हायला रुप्याचे लोखंड व्हावे लागते; तसे, गुरूचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते, ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच होय. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवीत असतानामधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही, तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी. आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास ठेवतो, याचे कारण असे की, आपल्याला जगायची इच्छा आहे. तसे, भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. आधी श्रद्धा, मग कृती, आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव, असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जर भगवंतावर ठेवलीत, तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल. आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो, त्याप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ रहावे. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रेद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालावयाचे नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणार्याची जर खरी श्रद्धा असेल; तर त्या श्रद्धेनेच त्याच्याअंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली, तो लवकर सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही, तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनू या. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे, पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे. आपण परमात्म्याजवळ मागावे की, "तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुजजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे, आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे." ‼️श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही.‼️ #एक like तर बनतोच ना .. 👍
★•°⚞°સचिન°⚟°•★
1.3K views
1 months ago
🌻🌹गुरू सांगेल तेच साधन. 🌻🌹 परमार्थ म्हणजे काय, हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचे जर काही मर्म असेल तर, आसक्ति सोडून प्रपंच करणे हे होय. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले,म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे. गुरु कुणाला करावे ? जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद कुठेही एकच असते. गुरूला कोठे आडनाव असते का ? गोंदवलेकर गोंदवल्यास राहात असतील, दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहात असेल. म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्वकाळी अबाधित असेच असते. तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरू समजा, आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा; त्याच्या देहाकडे पाहू नका. तो लुळापांगळा आहे की काय, हे पाहू नका. तो देहाने कसाही असला, तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा. त्याची लाज, जिथून गुरुपद निर्माण झाले, त्याला असते. गुरुआज्ञा हाच परमार्थ; तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात, तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात, तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरूकडे जा. गुरू सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतःकरता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल, तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे, हा तर मोठा घात आहे. एकाने कोळश्याचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले; दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे. तसे, प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून, मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला, म्हणजे परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे, की तो सहज रीतीने करता येतो. पण गंमत अशी, की तो सोपा आहे म्हणून कुणीच करीत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे, हे पक्के लक्षात ठेवावे. साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून, मनाने मात्र ईश्वरोपासना करावी. ‼️हृदयी ठेवा राम । मुखी सदा त्याचे नाम ।हातात असावे प्रपंचाचेकाम । हेच खरे परमार्थाचे मर्म ॥‼️ #एक like तर बनतोच ना .. 👍