
*उल्हासनगरमध्ये लाखो लीटर पाणी वाया; लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष!** ### **समाजसेवक राधाकृष्ण साठे यांनी व्हिडिओ व्हायरल करून वेधले लक्ष; ठोस कारवाई होणार का? नागरिकांचा सवाल** उल्हासनगर : एकीकडे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, दुसरीकडे उल्हासनगर महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक १७ मध्ये लाखो लीटर स्वच्छ पाणी रस्त्यावर वाहून वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळेच हा पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पॅनल क्रमांक १७ मधील मुख्य जलवाहिनी किंवा जोडणीमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. दररोज लाखो लीटर पेक्षाही अधिक पाणी रस्त्यावरून वाहून गटारात जात असल्याचे विदारक चित्र येथे पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेले स्थानिक नगरसेवक, महापौर किंवा उपमहापौर यांचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. हा सगळा प्रकार स्थानिक समाजसेवक राधाकृष्ण साठे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कॅमेऱ्यात कैद केला. तसेच स्वतः रस्त्यावर वाहत असलेले पाणी त्यांनी स्वतःही पाणी पीत असतानाचा व्हिडिओ नागरिकांच्या लक्षात आणून दिला त्यांनी या पाणी गळतीचा एक सविस्तर व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. उल्हासनगर प्रभात गार्डन जवळ असलेल्या राहदारी च्या रस्त्यावर दिनांक 18 मे 2026 रोजी काढलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या संथ कारभाराचे वाभाडे काढत, हे गंभीर प्रकरण नागरिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. साठे यांनी केलेल्या या धाडसी प्रयत्नामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पाणी ही काळाची गरज असताना, केवळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रोज हजारो गॅलन पाणी वाया जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता या व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी ही पाणी गळती रोखण्यासाठी कोणती ठोस पावले उचलणार? याकडे संपूर्ण उल्हासनगरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

