#😠नसरापूर आरोपीने शेव खाण्याचं आमिष दाखवलं अन्...😡 पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये एका चार वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मात्र, या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवरून आता मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ‘आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे की नाही?’, असा सवाल अमित ठाकरेंनी केला आहे. तसेच पोलिसांना फक्त २४ तासांचा फ्री हॅण्ड देण्याची मागणी देखील अमित ठाकरे यांनी केली आहे. अमित ठाकरे यांनी काय म्हटलं? “आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे की नाही? नसरापूरमध्ये त्या चिमुरडीसोबत जे घडलं, ते ऐकून मन सुन्न झालंय आणि डोकं रागाने भणभणतय. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ३-४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली जाते? ही कोणती विकृती आपण आपल्या समाजात आणि राज्यात पोसतोय? महाराष्ट्रात आज माता-भगिनी सोडाच, पण लहान बाळंही सुरक्षित राहिलेली नाहीत, ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे”, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. “गेल्या काही महिन्यांतील घटनांची मालिका पाहिली तर अंगावर काटा येतो. नसरापूर, बदलापूर, ठाणे, पुणे, चाकण, महाळुंगे…अशा किती जागांची आणि किती निष्पापांची नावं आपण घ्यायची? प्रत्येक वेळी नवी घटना घडते, आपण दोन दिवस संताप व्यक्त करतो आणि तिसऱ्या दिवशी सगळं विसरून जातो. म्हणूनच पोर्शे अपघातात निबंध लिहून सुटका होते आणि नेस्कोमध्ये ओव्हरडोसमुळे जीव जाऊनही कोणतीच ठोस कारवाई होत नाही. ही व्यवस्थेची लाचारी नाही तर काय आहे?”, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. “माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं प्रशासन नक्की कोणासाठी काम करतंय? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, कारण त्यांना माहितीये की कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचा वरदहस्त त्यांच्या पाठीशी आहे. ‘शक्ती कायद्याच्या’ गप्पा खूप झाल्या, पण तो कायदा प्रत्यक्षात राबवण्याचं धाडस हे सरकार का दाखवत नाहीये? केवळ कागदावर कायदे करून किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर करून बहिणी सुरक्षित होत नसतात, त्यांच्या सुरक्षिततेसाठी गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा दरारा निर्माण करावा लागतो”, असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. ‘पोलिसांना फक्त २४ तासांचा ‘फ्री हॅण्ड’ द्या’ : अमित ठाकरे “आज परिस्थिती इतकी भीषण आहे की, उद्या आपली मुलं घराबाहेर सुरक्षित असतील याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. सत्तेत बसलेले लोक १० दिवसांनी जुन्या घटना विसरून नवीन जाहिरातींमध्ये दंग होतात, पण पीडितांचे काय? माझं सरकारला पुन्हा सांगणं आहे. पोलिसांना फक्त २४ तासांचा ‘फ्री हॅण्ड’ द्या! आमचे पोलीस सक्षम आहेत, पण त्यांचे हात राजकीय हितसंबंधांनी बांधलेले आहेत. लोकशाहीत आम्ही प्रत्येक गोष्ट सहन करतोय, पण हे सर्व सहन करण्याच्या पलीकडचं आहे. मी इथे एक ‘नेता’ म्हणून नाही, तर एक सामान्य ‘माणूस’ आणि एक बाप म्हणून जाब विचारतोय…आपल्या महाराष्ट्राला आपण कोणत्या थरावर नेऊन ठेवणार आहोत?”, असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. नसरापूरचं प्रकरण नेमकं काय आहे? भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी चार वर्षांच्या मुलीवर एका ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली ठेवला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद उमटले. नसरापूर भागातील ग्रामस्थांनी पुण्यातील नवले पुलावर आंदोलनही केलं. या घटनेचा निषेध नोंदवत नसरापूर ग्रामस्थांनी नसरापूर बंद ठेवलं होतं. तसंच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. पीडितेच्या वडिलांनी काय म्हटलं? “माझी मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की त्यांनी प्रत्यक्ष यावं आणि आम्हाला लेखी द्यावं की नराधमाला आम्ही फाशीची शिक्षा देऊ. तसं नसेल तर त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्यावं. आम्ही त्याचा काय तो सोक्षमोक्ष लावू या आमच्या दोनच मागण्या आहेत. २०१९ मध्ये या आरोपीने त्याच्या पुतणीवर बलात्कार केला होता. सहा महिने तो तुरुंगात होता आणि त्यानंतर तो सुटला. आता त्याने माझ्या मुलीवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. २०१९ मध्ये तो आरोपी का सुटला? हा आरोपी या वेळेसही सुटणार नाही याची खात्री सरकार देऊ शकतं का? जर मुख्यमंत्री मिसिंग लिंकच्या उद्घाटनाला येऊ शकतात तर त्यांनी इथेही आलं पाहिजे ही माझी मागणी आहे”, असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलं आहे.
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
11 likes
10 shares

More like this