
*पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि 'निर्भीड जागल्या' पुरस्काराने सन्मानित** *मुंबई:* मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार आणि 'आदर्श वार्ताहर' पाक्षिक व न्यूज पोर्टलचे संपादक पंकजकुमार पाटील यांच्या शिरपेचात मानाचे दोन नवे तुरे रोवले गेले आहेत. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या दोन वेगवेगळ्या दिमाखदार सोहळ्यांमध्ये त्यांना 'समाजभूषण' आणि 'निर्भीड जागल्या' हे दोन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. ३० एप्रिल २०२६ रोजी परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये 'आर्यारवी एंटरटेनमेंट' प्रस्तुत चौथ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील दिग्गजांना कलाभूषण, रंगकर्मी आणि समाजभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पत्रकार पंकजकुमार पाटील यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत 'समाजभूषण' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी मुख्य आयोजक अभिनेते-दिग्दर्शक महेश्वर तेटंबे, ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, गझल नवाझ भीमराव पांचाळे, ज्येष्ठ दिग्दर्शक के. राघवकुमार, ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर (आप्पा) तोडणकर, ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर, ॲड. सुनील शिर्के आणि अभिनेत्री सिद्धी कामत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई यांच्या वतीने 'कालप्रवाह' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दादर येथील मामा काणे हॉटेल सभागृहात संपन्न झाला. ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मधु शिरोडकर यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री उदय देशपांडे, 'दै. नवशक्ती'चे संपादक प्रकाश सावंत, माजी संपादक प्रकाश कुलकर्णी आणि संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांच्या हस्ते करण्यात आले. याच सोहळ्यात पंकजकुमार पाटील यांना पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते दिलीप दळवी पुरस्कृत **"निर्भीड जागल्या"** पुरस्कार प्रदान करण्यात आला. कांजूरमार्ग (मुंबई) येथील रहिवासी असलेले पंकजकुमार पाटील गेली २० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि राजकीय विषयांवर त्यांनी विविध वृत्तपत्रांतून परखड लेखन केले आहे. 'आदर्श वार्ताहर' या आपल्या पाक्षिकाच्या माध्यमातून ते सातत्याने जनसामान्यांचे प्रश्न मांडत आहेत. यापूर्वीही त्यांना अनेक संस्थांकडून उत्कृष्ट पत्रकारितेचे पुरस्कार मिळाले आहेत. २०२६ च्या सुरुवातीलाच 'पत्रकार दिनी' त्यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार मिळाला होता, त्यानंतर आता पुन्हा दोन पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

