ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #🙂Positive Thought वाचाल तर वाचाल शिंग्रोबा धनगर कोण होते? त्यांचं नाव मिसिंग लिंकला देण्याची मागणी का होतेय? वाचून अभिमान वाटेल एक असा माणूस ज्यानं खऱ्या अर्थानं मुंबई-पुण्याला जोडलं. एक असा माणूस ज्यानं बक्षीसात मरण मागितलं. एक असा माणूस ज्यानं इंग्रजी जुलमी राजवटीला शर्मेनं मान खाली घालायला भाग पाडलं... अर्थातच ते व्यक्ती होते शिंग्रोबा धनगर... मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवासाचा वेळ कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्पाला शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. मुंबई-पुणे मार्गाचे खरे शिल्पकार सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या आणि आडवाटांची खडान् खडा माहिती असणारा हा माणूस! आज 'मिसिंग लिंक' लोकांसाठी खुला झाला. जगातला सगळ्यात रुंद बोगदा म्हणून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीये. अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या बोगद्याकडे पाहिलं जातंय, पण हा मार्ग शोधण्याचं खरं श्रेय जातं ते शिंग्रोबा धनगर यांना! ते कसं? यासाठी आपल्याला इतिहासाची पानं जरा चाळावी लागतील. शिंग्रोबा कोण होते? त्यांनी मुंबई-पुणे मार्गाचा शोध कसा लावला? आणि बक्षीस म्हणून इंग्रजांनी त्यांची हत्या का केली? साल होतं १८५०. भारतमातेच्या अंगावर पारतंत्र्याच्या बेड्या होत्या. इंग्रज आपल्या देशाला अक्षरशः ओरबाडत होते. देशातलं धन, धान्य, मसाले आणि प्रत्येक मौल्यवान वस्तू लंडनला पाठवण्यासाठी त्यांना गरज होती ती वेगवान कनेक्टिव्हिटीची. याच गरजेपोटी १६ एप्रिल १८५३ रोजी देशात पहिली रेल्वे धावली- बोरीबंदर ते ठाणे.. कित्येक गोरे तज्ज्ञ आले अन् डोकं खाजवून परत गेले पण इंग्रजांचा खरं टार्गेट होतं ते थेट पुणे गाठणं. मात्र, मुंबई आणि पुण्याच्या मध्ये भिंतीसारखा उभा होता, आसमानाशी स्पर्धा करणारा राकट सह्याद्री. या सह्याद्रीच्या दुर्गम कडेकपाऱ्यांतून रेल्वेचा मार्ग काढायचा कसा? हे इंग्रजांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आणि कोडं होतं. अनेक समित्या नेमल्या गेल्या. कित्येक गोरे तज्ज्ञ आले, डोकं खाजवून परतले. पण सह्याद्रीनं कुणालाही वाट दिली नाही. इंग्रज अधिकारी जंग जंग पछाडत होते, पण डोंगरवाटा काही सापडत नव्हत्या. शिंग्रोबा धनगर आणि इंग्रजांची भेट त्या काळात बोरघाटाच्या कुशीत एक धनगर वस्ती होती आणि तिथे राहायचे शिंग्रोबा धनगर. शिंग्रोबा म्हणजे सह्याद्रीचा श्वास! मेंढरं चारणाऱ्या या माणसाला सह्याद्रीचा प्रत्येक खडक, प्रत्येक दरी आणि प्रत्येक आडवाट तोंडपाठ होती. इंग्रजांची ही रोजची पळापळ शिंग्रोबा लांबून बघत होते. शिंग्रोबांनी 'राजमार्ग' दाखवला 'रोज गोरी माणसं येतात, डोंगर मोजतात आणि हताश होऊन परत जातात,' हे शिंग्रोबांच्या कुतूहलाचा विषय ठरला. शेवटी राहवलं नाही आणि शिंग्रोबांनी विचारलं- "काय हरवलंय का तुमचं? काय शोधताय एवढं?" हताश झालेल्या इंग्रजांनी त्यांना आपली अडचण सांगितली "आम्हाला मुंबई-पुण्याला जोडणारा रेल्वेचा मार्ग हवाय..." हे सांगताना त्या गोऱ्या अधिकाऱ्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की या डोंगराच्या राजाकडे त्याचं उत्तर दडलंय. शिंग्रोबा हसले आणि म्हणाले- "चला माझ्या मागं, मी तुम्हाला मार्ग दाखवतो." शिंग्रोबांच्या बुद्धिमत्तेनं इंग्रज अक्षरशः थक्क झाले काही वेळातच शिंग्रोबांनी इंग्रजांना तो मार्ग दाखवला, जो आज जगासाठी अभियांत्रिकीचा चमत्कार आहे! एका धनगराच्या अनुभवापुढे सातासमुद्रापारची विद्या थकली होती. शिंग्रोबांच्या अफाट बुद्धिमत्तेनं इंग्रज अक्षरशः थक्क झाले. सह्याद्रीचं जे कोडं भल्याभल्या इंजिनिअर्सना सुटलं नव्हतं, ते एका सामान्य धनगरानं एका क्षणात सोडवलं. स्वाभिमान आणि बलिदानाची गोष्ट कमालीचे खूश झालेले गोरे अधिकारी शिंग्रोबांना म्हणाले- "माग काय मागायचं तुला? पैसा, जमीन की जहागिरी?" ती वेळ अशी होती की शिंग्रोबांनी सोन्याची वीट जरी मागितली असती, तरी इंग्रजांनी त्यांच्या पायाशी ठेवली असती. पण शिंग्रोबांचा पिंड हा स्वार्थाचा नव्हता, स्वाभिमानाचा होता. आपल्या मातीला ओरबाडणारे, आपल्याच भावंडांवर अत्याचार करणारे हे परकीय इंग्रज शिंग्रोबांनाही बोचत होते. शिंग्रोबा शांतपणे म्हणाले "साहेब, द्यायचंच असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या!" हे शब्द म्हणजे साक्षात ठिणगी होती. एका मेंढपाळाने सातासमुद्रापारच्या सत्तेला जाब विचारणं, हे इंग्रजांच्या अहंकाराला लागलेलं शिसं होतं. त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. ज्या माणसाने त्यांना मार्ग दाखवला, ज्याच्यामुळे त्यांचा रेल्वेचा रस्ता सोपा झाला, त्या शिंग्रोबांवर कृतघ्न इंग्रजांनी गोळ्या झाडल्या. सह्याद्रीच्या कुशीत शिंग्रोबांचं रक्त सांडलं, पण त्या बलिदानाने हा घाट अमर झाला. शिंग्रोबांचे स्मारक मिसिंग लिंकला नाव देण्याची मागणी शिंग्रोबांनी जिथे प्राणाची आहुती दिली, तिथेच आज त्यांचं एक छोटंसं श्रद्धेचं देऊळ उभं आहे. आजही जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरच्या बोरघाटात प्रवासी या वाटाड्या हुतात्म्यापुढे नतमस्तक होऊन त्याचं दर्शन घेतात. आज मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरचा 'मिसिंग लिंक' लोकांसाठी खुला झालाय. त्याला शिंग्रोबांचं नाव द्यावं*, अशी मागणी जोर धरतेय. सरकार काय निर्णय घेईल तो घेईल, पण शिंग्रोबांमुळे आज मुंबई उर्वरित महाराष्ट्राशी जोडली गेली, हे त्रिकालबाधित सत्य आहे.