#जय जय राम कृष्णा हरी
*साखरेची गोणी बैलाचिया पाठी।*
*तयासी शेवटीं करबाडें॥*
*मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें।*
*तयालागीं कांटे भक्षावया॥*
*वाउगा हा धंदा आशा वाढविती।*
*बांधोनियां देती यमा हातीं॥*
*ज्यासी असे लाभ तोचि जाणे गोडी।*
*येर तीं बापुडीं सिणलीं वांयां॥*
*तुका म्हणे शहाणा होई रे गव्हारा।*
*चौऱ्यासीचा फेरा फिरों नको॥*
*बैलाच्या पाठीवर साखरेची गोणी जरी दिली तरी त्याला कडबाच खावा लागतो. उंटाच्या पाठीवर मालाच्या पेट्या जरी दिल्या तरी त्याला त्याचा काहीच उपयोग होत नसून त्याला काटेरी झुडपेच खावे लागतात. त्याप्रमाणे मनुष्य हा संसार वाढविण्याकरता वेगवेगळे उद्योग धंदे आशेपोटी करतो पण तो ज्यांच्यासाठी उद्योग धंदे करतो तेच त्याला शेवटी यमाच्या हाती बांधून देतात. ज्याप्रमाणे साखरेची गोडी ओझे वाहणाऱ्या बैलाला न मिळता, ज्याला त्याचा लाभ होतो त्यालाच कळते. त्याप्रमाणे या संसारात धन मिळवण्याकरिता जे बिचारे लोक कष्ट करतात त्यांना त्याचा लाभ होत नाही दुसरे त्याचा भोग घेतात आणि त्या बिचार्याला केवळ धन कमवायचे आणि कष्ट रक्षण करण्याचा व्यर्थ त्रास होतो. तुकाराम महाराज म्हणतात अरे मुर्खा, गव्हारा भक्ती कर मूर्खपणाने चौर्यांशी लक्ष योनीचा फेरा फिरू नकोस*


