ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #🎑जीवन प्रवास #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 🔗 *कनेक्शन* ➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖ हमसून हमसून रडत होती गिरीजा, स्वतःला दोष देत होती, सौरभ तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता पण तिला काही स्वस्थ बसवत नव्हते, " सौरभ, माझा असा संयम सुटायला नको होता, आपल्याला माहित्ये ना स्वभाव त्यांचा, मी आज इतकी स्पॉंट्यानियसली कशी रिऍक्ट झाले कळलंच नाही रे, भरल्या ताटावरून उठून गेले रे बाबा..मला खूपच कसंतरी वाटतंय, ते ओरडले त्याहीपेक्षा ते उपाशी उठून गेले हे फारच विचित्र वाटतंय..पिलू पण ना एवढा त्रास देत होती त्यामुळे बाबांना उशीर झाला अन माझा ताबाच सुटला आज, मी नको होतं बोलायला." "असू देत गं, मला का एक्सप्लेनेशन देतेस, मला काय माहिती नाहीत ते कसे आहेत, त्यांच्या अशा फटकळ स्वभावामुळे तर माझं अन त्यांचं फारसं संभाषण होत नाही, आई कशी सहन करत आलीये त्यांना देवच जाणे इतकी वर्षे.. सोड, नको विचार करूस.." " असं नाही सौरभ, थांब मी आलेच." गिरीजा घाईत बाबांच्या रूम मध्ये जायला निघाली, दारातच तिला त्यांचे आणि आईचे बोलणे ऐकू आले, " अहो, किती चिडता तुम्ही, त्याला काही मर्यादा, निघाला असेल पोरीच्या तोंडून एखादा शब्द, मला हे असं सध्या काही करता येत नाहीये, सगळं तिच्यावरच पडलंय, त्यात परी त्रास देते. जरा मुरड घालावी हो स्वभावाला वयोमानानुसार. " " हो, आता तुम्ही मला नका शिकवू, चाललोय मी, जिथे मला किंमत नाही तिथे राहायचंच कशाला??" हातात एक बॅग घेऊन सुरेशराव तावातावात कुठेतरी निघून गेले, तशी गिरीजा आईच्या रूममध्ये गेली, " आई खरंच सॉरी, मी कधीच बोलत नाही पण आज माहिती नाही कशी बाबांना बोलली ते, माझं तसं काहीच इंटेन्शन नव्हतं आई, सर्दी झाल्यामुळे पिलू त्रास देत होती त्यामुळे जरा उशीर झाला आणि चिडचिड झाली माझी पण, मला खुप वाईट वाटतंय आई, मी सौरभला पाठवते त्यांच्यामागे.." तिचं बोलणं मधेच थांबवत सविताबाई बोलू लागल्या, " गिरीजा, गिरीजा शांत हो, मी काय आज ओळखते का तुला? तुझी किती धावपळ होतेय बघतेय ना मी, माझंही दुखणं आताच उद्भवावं?? आणि त्यांचा अजीबतही विचार करू नकोस, विचित्र माणूस आहे एकदम, काही तर ताळतंत्र असावं मी म्हणते, नेहमीचं आहे हे त्यांचं, कधीही बोलण्याआधी विचार करत नाहीत, समोरच्याला काय वाटेल हे काही ध्यानीमनीच नसतं त्यांच्या. काय उपयोग सांग तुम्ही बाकीचं सगळं कितीही छान करून?? सुलू ताई म्हणतात ना तेच खरंय, त्यांच्या जिभेमध्ये अन मेंदूमध्ये काही कानेक्शनच नाहीये, म्हणून कोणीच थाऱ्यालाही उभं राहतं नाही त्यांच्या. जाऊदे, तू जेवून घे अन पड जाऊन. " " आई अहो पण ते गेलेत कुठे?? " " कुठे जाणारेत गं, येतील डोकं थंड झालं की, आणि कळवतील जारावेळात मला, नको विचार करूस. " सुरेशराव, सविताबाई अन सौरभ असं छान त्रिकोणी कुटुंब, सुरेशराव बँकेत उच्चपदस्थ अधिकारी, पैसा अडका कशाचीही कमी नव्हती, सगे सोयरेही अनेक होते पण तरीही त्यांना जवळचे म्हणावे असे एक दोन मित्र सोडले तर फार कोणी नव्हते, याला कारण त्यांचा विक्षिप्त स्वभाव. त्यांच्या अतिशय फटकळ व तिरसट बोलण्यामुळे फार कोणी त्यांच्या जवळ फिरकत नसे, आपल्या बोलण्यामुळे समोरचा दुखावला जाईल असा विचार ते कधीही करत नसत. यामुळेच कदाचित त्यांचा अन सौरभचा फारसा संवाद व्हायचा नाही कधी. सविताबाईंनी मात्र सगळ्यांना छान जोडून ठेवलं होतं. सुलोचना म्हणजे सौरभची आत्या, सुरेशरावांची सख्खी मोठी बहीण जवळच राहत असे, पण त्या दोघांचेही फार नाहीच पटले कधी, तिची अन साविताबाईंची मात्र छान गट्टी होती, सौरभचाही आत्यावर जीव होता, ती अनेकदा म्हणतही असे सविताबाईंना, " काही म्हण वहिनी पण ना दादाच्या मेंदूचं आणि जिभेचं कनेक्शनच तुटलेलं आहे, अगं काही तर विचार करावा बोलताना, किती लागेल असं बोलतो तो नेहमी, चिडतो काय छोट्या छोट्या कारणांवरून, आता ठीक आहे गं, तुम्ही दोघांनी समजून घेतलंत आयुष्यभर पण उद्या सौरभच्या बायकोने हे सगळं का सहन करावं? म्हातारपणी कोणीही विचारणार नाही बघ त्याला अशाने. " सौरभ मात्र याबाबतीत आईवर गेला होता, अत्यंत समंजस आणि शांत होता तो. त्याला अगदी साजेशी अशी गिरीजा सहचारिणी म्हणून मिळाली अन सविताबाईंचा जीव भांड्यात पडला, सौरभने बाबांच्या स्वभावाबद्दल तिला व्यवस्थित पूर्वकल्पना दिली होतीच. दोघेही आयटी प्रोफेशनल होते, दिवसभराचा अधिक वेळ ऑफिसमध्ये जात असायचा, त्यामुळे फारसा संबंध आलाच नाही कधी. पण त्यांच्या स्वभावाशी ती पुरेपूर परिचित होती, काही झालंच तरी कधीही जरा म्हणून बोलली नाही की चिडचिड केली नाही. लग्नाला अडीच वर्षे झाली अन परी झाली, सुरुवातीचे सगळे दिवस कोडकौतुकात कसे गेले कळलंच नाही, परी दिड वर्षाची झाली असेल अन गिरीजा पुन्हा जॉबचा विचार करू लागली, आईंचाही तिला तसा पाठिंबा होताच. ती जॉबच्या शोधात होती अन अचानक सविताबाईंना अर्थरायटिसचा त्रास सुरू झाला, एवढा की सुरुवातीला त्यांच्याकडून काही काम होईना. कितीही सुबत्ता असली तरी स्वयंपाकाला बाई लावायची नाही असा सुरेशरावांचा दंडक होता, गिरीजा सगळं सांभाळत समतोल राखण्याचा प्रयत्न करीत होती. जरा घाई गडबड व्हायची पण जमायचं सगळं. त्यादिवशी असंच झालं, मागच्या कुठल्यातरी इंटरव्ह्यूमध्ये एका चांगल्या पोस्टसाठी गिरीजची निवड झाली होती पण अर्थात आईची तब्येत बघता तिला तो जॉब स्वीकारणे तूर्तास जमणार नव्हते, फार खंत वाटत होती तिला त्याची. परीची सकाळपासूनच जरा किरकिर चालू होती. तिला सांभाळत, मनातलं द्वंद्व सहन करत गिरीजाने वेळेत सगळं आटोपलंही होतंच पण बाबांना जेवायला वाढयायला जरा उशीर झाला, ती पाणी द्यायला विसरली त्यावरून सुरेशराव चिडले, असह्य होऊन गिरीजा फक्त एवढंच म्हणाली, " बाबा प्लिज तुम्हीही थोडंस ऍडजस्ट करा ना," झालं, भरलेल्या ताटावरून उठले सुरेशराव, वाट्टेल तशी बडबड केली, कधी नव्हे ते घरातील कोणीतरी त्यांना असं बोललं होतं, गिरीजालाही खूप गिल्टी वाटलं होतं खरंतर, आपण असे का बोललो हे कळलं नव्हतं तिला. घरातून निघून गेल्याच्या दुसऱ्या दिवशी सुरेशरावांनी सविताबाईंना फोन केला होता. शहराबाहेरच्या कुठल्यातरी चांगल्याशा वृद्धाश्रमात त्यांनी स्वतःची ऍडमिशन करून घेतली होती, घरातील कोणीही भेटायला येऊ नये असेही सांगितले होते. हे ऐकून गिरीजाला फारच वाईट वाटले, हे सगळे आपल्यामुळे झाले आहे असे वाटले. सौरभ आणि आई मात्र बऱ्यापैकी कुल होते, तू फारसा विचार करू नकोस, येतील परत लवकरच असे म्हणाले. पण गिरीजाला काही केल्या चैन पडेना. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरीजा आईंना एक काम आहे जरावेळात येते असे सांगून बाहेर गेली, ती थेट त्या वृद्धाश्रमात पोचली. सगळ्या सोयीसुविधांनी परिपूर्ण असा वृद्धाश्रम होता तो, चौकशी करून गिरीजा सुरेशराव जिकडे होते तिथपर्यंत पोचली, तिने त्यांची थेट पाय धरून माफी मागितली, त्यांना घरी चला म्हणून विनंती केली पण ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते, नाईलाजाने तिला तिथून परतावे लागले. वाटेत ती सुलुआत्यांकडे गेली, घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. आत्या म्हणाल्या, " असू देत, यात तुझे काहीही चुकले नाही, त्यालाही जरा तिकडे एकट्याला राहून बघू देत म्हणजे घरातल्या माणसांची किंमत कळेल. कसं असतं बघ ना गिरीजा, पैसा अडका पुरवला, मोठे पद मिरवले म्हणजे तुम्ही माणूस म्हणूनही मोठे असता असे नसते गं, बोलताना तारतम्य बाळगायलाच हवे. मी नेहमी म्हणते की त्याच्या मेंदूचे अन जिभेचे कनेक्शन तुटलेले आहे ते काय खोटे थोडीच?? नको काळजी करूस. सगळं नीट होईल." या सगळ्या घटनेला साधारण पंधरा वीस दिवस झाले असावेत, एके दिवशी गिरीजाला वृद्धाश्रमातून फोन आला, तुम्हाला बोलावलंय असा कोणीतरी निरोप दिला. गिरीजा घाबरलीच खरंतर, सौरभ घरी नव्हता, ती परीला आईकडे ठेऊन घाईने गेली. काही विपरीत तर घडले नाहीये ना या विचाराने धडधडायला लागले तिला. ती तिकडे पोचली तर व्हरांड्यात सगळे ज्येष्ठ लोक घोळक्याने बसले होते, जरा पुढे गेली तर दिसले की सुरेशराव कोणाला तरी टाळ्या देत बुद्धिबळ खेळत आहेत. ती आलेली बघताच त्यांनी हसत तिची ओळख सगळ्यांना करून दिली आणि तिच्यासोबत आत निघून गेले. जाताना त्यांनी तिला संपूर्ण वृद्धाश्रम दाखवला, कोण इथे कसा आलाय, का आलाय अशा अनेकांच्या अनेक काहाण्या ऐकवल्या, तिला खरंतर काही कळेनासं झालं पण बाबा खूप बदलले आहेत, किती मोकळ्या गप्पा मरतायेत हे मात्र नक्की जाणवलं, आतल्या अंगणातल्या खुर्च्यांवर बसत त्यांनी बोलायला सुरुवात केली, " गिरीजा खरंतर मीही तुला फोन करू शकलो असतो सकाळी पण का कोण जाणे हिम्मतच झाली नाही, मी त्यादिवशी खूपच विचित्र वागलोय, खरंतर मी एवढी सगळी वर्षे विचित्रच वागत आलोय. मी असं का करायचो हे मला कधीच नाही कळले, किती तिरकस अन खवचट बोलायचो सगळ्यांशी, अनेकदा कारण नसताना सुद्धा. आणि त्याचमुळे मी पैसा अडका तर जमवू शकलो पण फारसे माणसं नाही जोडू शकलो कधीच. जी काही नाती अन प्रेमाची माणसं आपल्या आजूबाजूला आहेत ती केवळ तुझ्या आईमुळेच आहेत. पण तिच्या सोबत राहत असताना याची जाणीव कधी झाली नाही ना कधी मी तिला याचे श्रेय दिले. तुला प्रश्न पडला असेल आजचा हा मी कसा हो ना, इथे आल्यानंतर दोन दिवस मी तेवढ्याच रागात होतो, तू परत न्यायला आलीस तेंव्हाही तुझ्याशी किती वाईट वागलो, आणि मग हळूहळू इथल्या प्रत्येकाचे निरीक्षण करत गेलो, इथे राहणारी प्रत्येक व्यक्ती ही सुखवस्तू घरातील आहे पण स्वतःच्या इच्छेने इथे येऊन राहणारा कदाचित मी पहिलाच असेल. मी कित्येकांना रात्रंदिवस रडताना बघितलंय, घरच्यांशी बोलणं होत नाहीये म्हणून तळमळतांना बघितलंय. फक्त फाईव्ह स्टार सुविधा असलेल्या वृद्धाश्रमाचे पैसे भरून काही मुलं मुली सुना त्यांच्या जवाबदऱ्या पूर्ण करू पाहतायत, मनात विचार आला की इतकी वर्षे आपणही असंच तर केलंय. पण इथे आलो अन मला खरा मी गवसू लागलो आहे, मित्रमंडळाबरोबर हसण्यात केवढं सुख असतं ते मला कळू लागलं आहे, टाळ्या देत खेळ खेळण्यात, गाणी म्हणण्यात काय मज्जा असते ते मला कळू लागलंय..अन याचं खरं श्रेय तुला आहे. " " मग बाबा हे सगळं तुम्हाला घरी राहूनही करता येईलच ना! " भारलेल्या आवाजात गिरीजा म्हणाली. " अगं बाळा मी इथे राहतोय म्हणजे घरी येऊ शकत नाही असे थोडीच आहे, अन इथे सगळे कसे मजेत आहेत बघितलंस ना, सुलू ताई नेहमी म्हणते की माझ्या मेंदूतलं अन जिभेतलं कनेक्शन तुटलंय, ते आता आता कुठे जोडता येतंय मला. ते प्रत्येकाला जोडता यायला हवं खरंतर. अन खरं सांगू का, म्हाताऱ्या माणसाने वयोमानानुसार जरा लवचिक व्हावे, त्यात काही कमीपणा नसतो हेही मला कळले आहे आता. तेंव्हा तू ही आता शांत मनाने घरी जा, परी वाट पाहत असेल. आणि हो, आठवड्यातून एक दिवस तिला इथे सोडत जा बरं का..आम्हालाही खेळायला पिटुकलं खेळणं हवंच ना..." गिरीजा जड पावलांनी पण अगदीच हलक्या मनाने घराच्या वाटेकडे निघाली होती... प्राजक्ता राजदेरकर 🌱 ➖➖➖➖➖