लातूर : देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षा गैरप्रकार प्रकरणात लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ क्लासेसचे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे लातूरच्या बहुचर्चित ‘लातूर पॅटर्न’वर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नीट परीक्षा गैरप्रकार आणि पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू असून, तपासादरम्यान समोर आलेल्या काही धागेदोरांवरून ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र तपास यंत्रणेकडून अधिकृतपणे सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. लातूर हे राज्यातील वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठीचे मोठे शिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. हजारो विद्यार्थी दरवर्षी येथे कोचिंगसाठी दाखल होतात. अशा परिस्थितीत नामांकित कोचिंग संस्थेच्या संचालकावर झालेल्या कारवाईमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणानंतर शहरातील खासगी कोचिंग संस्थांबाबत विविध चर्चा रंगू लागल्या असून, सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत, तर काही जण तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान, या घडामोडींमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर परिणाम होऊ नये, अशी भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. ‘लातूर पॅटर्न’ने अनेक यशस्वी विद्यार्थी घडवले असले तरी अशा घटनांमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पुढे कोणत्या दिशेने जातो आणि आणखी कोणती नावे समोर येतात, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

