_खांदा देण्याची क्रिया जरी पवित्र मानली जात असली, तरी ज्याचा देह निश्चल झाला आहे त्याला त्या विधीचा कणभरही उपयोग उरत नाही. माणुसकीची खरी कसोटी ही आपण किती प्रेतांच्या मागे चाललो यावर नसून, किती जिवंत आत्म्यांच्या दु:खात आपण खंबीरपणे उभे राहिलो यावर ठरते. मृत्यूची वार्ता कानावर पडताच अस्वस्थ होणारी पावले, तोच माणूस जिवंत असताना संकटात तडफडत असतो तेव्हा मात्र का थबकतात, हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. खरं तर देह शांत झाल्यानंतर धावून जाण्याची घाई ही केवळ औपचारिक असते; कारण अग्निडाग अटळच असतो, तुम्ही असलात किंवा नसलात तरी. पण तरीही आजच्या दिखाव्याच्या बाजारात हीच धावपळ प्रतिष्ठेचं लेबल बनली आहे. क्षणभंगूर वैभवाच्या मिरवणुकीत *“मी मोठा की तू मोठा”* या स्पर्धेत माणूस माणसाला विसरतोय, नात्यांची ऊब गारठतेय. म्हणूनच सांगावंसं वाटतं की *मरणोत्तर सन्मानापेक्षा जिवंतपणीची साथ श्रेष्ठ आहे.* आयुष्यात किमान एका तरी अडचणीत सापडलेल्या जिवंत माणसासाठी नि:स्वार्थ, प्रामाणिक हात पुढे करा. गणितं मांडू नका, हिशेब धरू नका; तुझं - माझं झुगारून द्या आणि केवळ माणूस बना. कारण अशी माणुसकीच शेवटच्या श्वासापर्यंत अभिमानाने मिरवता येते._
🍁 *प्रकाशाच्या वाटा* 🍁 #🎭Whatsapp status