काल संध्याकाळी एका विलक्षण अनुभवाला सामोरं जावं लागलं. मला विमाननगरहून भांडारकर मध्ये भैरप्पांवरच्या कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून मी चारच्या सुमाराला उबर वरून गाडी बुक करायचा प्रयत्न करत होते, पण काल संप असल्यामुळे गाडी मिळत नव्हती. लांब जायचं असेल तर मी सहसा प्रदूषणाचा त्रास होतो म्हणून रिक्षा घेत नाही, पण काल गाडीच मिळेना म्हणून शेवटी उबर ऑटो केली. ऑटो चालवणारा मुलगा अगदी तरुण आणि किरकोळ शरीराचा होता. घरापासून निघून आम्ही येरवड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोचलो, जेमतेम एक किलोमीटर अंतर पार केलं असेल. दुपारी चारची वेळ असल्यामुळे फार रहदारी नव्हती.
अचानक चालकाने एक गचका घेत ऑटो रस्त्याच्या बाजूला नेली आणि धाडकन डोकं स्टीयरिंगवर टेकलं, कसाबसा मला म्हणाला की त्याला बरं वाटत नाही. तेवढ्यात त्याचे हात आकसून येऊ लागले. काही क्षण मी तशीच थांबले, नेमकं काय घडत आहे हे मला समजेना, पण त्याला बरं वाटत नाहीये हे स्पष्ट दिसत होतं. क्षणभर वाटलं, कदाचित अपस्माराचा झटका असेल. पण त्याचं अंग थरथरत नव्हतं ना त्याच्या तोंडातून फेस येत होता, पण हात मात्र आखडले होते.
मी रिक्षातून उतरून जवळच्या पाण्याच्या बाटलीतून त्याच्या तोंडावर थोडं पाणी शिंपडलं आणि त्याचा हात धरून त्याला मागच्या सीटवर नेलं आणि झोपायला सांगितलं. तो नीट बोलूही शकत नव्हता. तुटक शब्दांत त्यानं मला सांगितलं की त्याने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, फक्त एक कप चहा आणि एक टोस्टवर तो रिक्षा चालवत होता. माझ्या डोक्यात प्रकाश पडला, त्याच्या रक्तातली साखर एकदम उतरली होती आणि त्याला तात्काळ काहीतरी गोड खावं लागणार होत.
बहुधा माझ्या पर्समध्ये एखादी टॉफी किंवा सुका मेवा असं काहीतरी असतं, पण आज नेमकं माझ्याजवळ गोड काहीच नव्हतं. आम्ही थांबलो होतो तो रस्ता एअरफोर्सचा होता, आजूबाजूला ना कसलं दुकान, ना फेरीवाला, ना कुणाचं घर. फक्त रस्ता आणि तुरळक रहदारी. क्षणभर वाटलं, पोलीसांना फोन करावा. तेवढ्यात थोड्या अंतरावर एक विवांता हॉटेलची इनोव्हा उभी दिसली. एकदम मला सुचलं. हॉटेलच्या गाड्यांमध्ये येणाऱ्या प्रवाश्यांसाठी काही चॉकलेट वगैरे ठेवलेले असतात. मी धावतच रस्ता क्रॉस करून पलीकडे गेले. त्या गाडीचा ड्रायव्हर काचा वर करून झोपला होता, काचेवर टकटक करुन त्याला उठवलं आणि विचारलं त्याच्याकडे काहीतरी गोड आहे का त्या रिक्षावाल्याला देण्यासाठी. तोही तरुणच होता. त्याच्याकडे एका बाटलीत आठ-दहा मेंटोस होत्या. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे माणुसकी होती! त्यानं फक्त मेंटोस दिल्या नाहीत, तर माझी कळकळ बघून माझ्याबरोबर येऊन मदतही केली.
आम्ही त्या मुलाला बसवलं, एका मागोमाग एक अश्या सहा-सात मेंटोस खायला दिल्या आणि पाणी प्यायला दिलं. हळूहळू, अगदी हळूहळू, त्याचे आखडलेले हात सैल झाले. तो सावरून बसला,
थोडं बोलू लागला. त्याच्या सांगण्यावरून त्याच्या फोनवरून नंबर घेऊन मी त्याच्या दोन मित्रांना फोन केले. अनोळखी नंबर म्हणून असेल, त्यांनी उचलले नाहीत. शेवटी त्याने एका डॉक्टरांचा नंबर दिला. त्यांनी सुदैवाने उचलला. मी परिस्थिती आणि त्या मुलाचं नाव सांगितल्यावर त्यांनीही मला तेच सांगितलं की त्याची साखर अचानक कमी झाली असावी, त्याला काहीतरी गोड खायला द्या. मग मी त्यांना आमचं लोकेशन पाठवलं. नंतर त्याच्या बहिणीला त्याच्या फोनवरून कॉल केला व तिलाही लोकेशन पाठवलं. हे सगळं होईपर्यंत त्याला थोडी हुशारी आली होती, पण अजून ऑटो चालवण्याइतकी ताकद त्याच्यात नव्हती. शेवटी त्याची बहीण येते आहे याची खात्री झाल्यावर मी दुसऱ्या ऑटोने निघाले. निघण्याआधी त्याला विचारलं, ‘मी जाऊ का तुझी बहीण येईपर्यंत थांबू?’ तर तो म्हणाला ‘जा’. ‘काहीतरी खायचं ना राव, असं उपाशीपोटी नाही चालवायचं’ असं कळकळीने सांगून तो इनोव्हा वालाही एअरपोर्ट कडे निघाला.
हे सारं मी माझी भलावण करण्यासाठी लिहीत नाहीये, पण अश्या परिस्थितीत तातडीने मदत मिळणं महत्वाचं असतं आणि अशी वेळ कोणावरही येऊ शकते. तो मुलगा फक्त बावीस वर्षांचा होता, माझ्या लेकरांपेक्षा एक-दोन वर्षांनीच मोठा! तिथून निघताना एकच विचार माझ्या मनात घोळत होता, उद्या कधी माझी मुलं जगाच्या कुठल्याही काना कोपऱ्यात अशी अडचणीत असली, एकटी पडली, तर कुणातरी सहृदय व्यक्तीने असंच घटकाभर थांबून त्यांची मदत करावी. कारण कधी कधी इतकंच पुरेसं असतं, घटकाभर थांबणं आणि अश्या परिस्थितीत ‘मला काय त्याचे‘ असे म्हणून निघून जाण्याऐवजी आपल्याला शक्य ती मदत करण्याचा निर्णय घेणं. रात्री फोन करून तो मुलगा सुखरूप घरी पोहोचला आहे याची खात्री करून घेतली तेव्हाच माझा जीव भांड्यात पडला.
— शेफाली वैद्य #🎭Whatsapp status