🚩🪷🪷🚩
सार्थ तुकाराम महाराज गाथा
अभंग क्र.३४१८
सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ॥१॥
परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथें हे उपाय न सरती ॥ध्रु.॥
अमृतें सागर भरवती गंगा । म्हणवेल उगा राहें काळा ॥२॥
भूत भविष्य कळों येईल वर्तमान । करवती प्रसन्न रिद्धीसिद्धी ॥३॥
ठान मान कळों येती योगमुद्रा । नेववेल वारा ब्रम्हांडासी ॥४॥
तुका म्हणे मोक्ष राहे ऐलीकडे । येर बापुडें काय तेथें ॥५॥
अर्थ
दगडाचे पर्वत देखील सोन्याचे करता येतील, संपूर्ण रान देखील कल्पतरु करता येईल परंतू विठोबाचे पाय दुर्लभ आहेत तेथे कोणत्याही प्रकारचे चमत्कार किंवा बल मान्य होत नाही. समुद्र गंगा यांना अमृताने भरुन टाकला येईल ,काळाला देखील थोडया वेळ थांब असे म्हणता येईल. भूत भविष्य वर्तमान या गोष्टी आपल्याला कळून घेता येतील, रिध्दी सिध्दीला देखील आपल्याला प्रसन्न करता येईल. वस्तू किंवा घर न पाहाता देखील आपल्याला ते कोठे आहे कोठे नाही ते सांगता येतील, योगमुद्रा आपल्याला सिध्द होतील, प्राणवायू देखील आपल्याला ब्रम्हांडात नेता येईल. तुकाराम महाराज म्हणतात, “तरी देखील मोक्ष अलीकडेच राहातो मग इतर साधने बिचारे यापुढे काय आहेत ?”
संत तुकाराम महाराज
🚩🙏🚩 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏