🚩🌹🌹🚩
सार्थ तुकाराम महाराज गाथा
अभंग क्र.३५३६
काय जाणें मी पामर पांडुरंगा तुझा पार । धरिलिया धीर काय एक न करिसी ॥१॥
उताविळ झालों आधीं मतिमंद हीनबुद्धि । परि तूं कृपानिधी नाहीं केला अव्हेर ॥ध्रु.॥
तूं देवांचा ही देव अवघ्या ब्रम्हांडाचा जीव । आम्हां दासां कींव कां भाकणें लागली ॥२॥
तुका म्हणे विश्वंभरा मी तों पतितचि खरा । अन्याय दुसरा दारीं धरणें बैसलों ॥३॥
अर्थ
पांडूरंगा तुझे सामर्थ्य मी काय जाणणार आहे ? मी जर प्रसंगी धीर धरला तर तू एक काय करु शकत नाहीस ? परंतू देवा मी फार उतावीळ आहे खरेतर मी मतिमंद आहे अगदी बुध्दीहीन आहे. परंतू हे पांडूरंगा तू कृपानिधी आहेस मी कसाही वागलो तरी तू माझा अव्हेर कधीच केला नाहीस. पांडूरंगा तू देवाचाही देव आहेस ब्रम्हांडाचा जीव आहेस त्यामुळे आम्हा दासांना कीव भाकण्याची गरजच काय उरली कारण तू आमच्या अंत:करणातील सर्व मनोरथ न मागताच पूर्ण करतोस. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा खरोखर मी तर पतितच आहे. पाण्यात बुडविलेल्या माझ्या वह्या तारण्यासाठी मी तुझ्या दारात धरणे धरुन बसलो हा माझा दुसरा अन्याय आहे.”
संत तुकाराम महाराज
🚩🙏🚩 #🌻आध्यात्म 🙏