*श्रीमंतांच्या पैशावर पक्षाचे कार्य जर चालू लागले तर पक्षाचे वैशिष्ट्य नष्ट होईल...*
*गरीबांच्या पक्षास देण्या ऊंच भरारी;*
*सदस्य बनविणे गरजेचे घरोघरी* ।
*दि. २७ मार्च १९३८ रोजी नायगाव मुंबई येथे स्वतंत्र मजूर पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्गारले,*
*: भाषण :*
*आजच्या या स्वतंत्र मजूर पक्षाच्या मुंबई शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर राहण्यास मला आनंद वाटतो. आपले स्वतंत्र मजूर पक्षाचे कार्य शिस्तीने व नियमबद्धतेने चालू ठेवण्याकडे लक्ष देणे जरूर आहे. आजची सभा महत्त्वाची आहे. आज सकाळी मी स्वतंत्र मजूर पक्षाच्या मुंबई शाखेच्या ऑफिसला भेट दिली व दोन-अडीच तास तेथे राहून* *चाललेल्या कामाची तपासणी केली. त्यात तेथे जे पाहण्यास मिळाले ते पाहून मला आनंद व आश्चर्यही बाटले. आश्चर्य बाटण्याचे कारण हे की, स्वतंत्र मजूर पक्षाचे येथील कार्य अत्यंत व्यवस्थितपणाने व सुरळीत चालल्याचे मला दिसून आले आणि दुसरा कोणीही माणूस ऑफिसमध्ये जाऊन पाहील तर त्याच्याही मनाची खात्री झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या कोणाला ऑफिसमध्ये जाऊर सदर काम पाहणे शक्य नसेल त्यांची मी खात्री करू शकतो की, एकंदर कामाची व्यवस्था चांगल्या तन्हेने चालली आहे. ऑफिसमध्ये काम करणरे जे स्वयंसेवक किंवा थोडासा मोबदला घेऊन काम करणारे ९-१० वर्कर्स आहेत त्यांनाही या कामाचे श्रेय दिले पाहिजे. आपला पक्ष गरिबांचा असल्यामुळे आपणाला त्यांना भरपूर मोबदला देता येत नाही. असे असून ते व्यवस्थित काम करतात. हे त्यास भूषणावह आहे. आता तुम्हाला जो जमखर्चाचा अहवाल वाचून दाखविण्यात आला त्यावरून तुम्हाला दिसून आले असेल की, आतापर्यंत हजार बाराशे रुपयांचा खर्च झाला आहे व हजार बाराशे रुपये शिल्लक आहेत. या जमाखर्चाची काँग्रेसच्या जमाखर्चाशी तुलना केल्यास काँग्रेसच्या मिठमिशीलाही ही आपली रक्कम पुरणार नाही एवढी थोडी आहे. आतापर्यंत कार्यकारी मंडळातील ४०-५० लोकांनी व बाहेरील २५-३० प्रचारकांनीच हे कार्य केले आहे. तुम्ही सर्वानी जर मनावर घेतले तर यापेक्षाही मोठे कार्य घडून आल्याशिवाय राहाणार नाही. मुंबई शहरात अस्पृश्य वर्गाचीच लोकसंख्या एक लाखावर आहे. त्यापैकी स्वतंत्र मजूर पक्षाचे चार हजार सभासद झाले आहेत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. येथे लोकांची बसण्याची जी व्यवस्था केली आहे. त्यावरून स्त्रियांचे दोन गट व त्याप्रमाणेच पुरुषांचेही दोन गट असलेले मला दिसून आले. चौकशी केल्यावर मला समजले की, स्त्रियांच्या अलिकडील गटातील सर्व स्त्रिया स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभासद आहेत व पलिकडिल गट सभासद न झालेल्या स्त्रियांचा आहे. या दोन्ही गटात सभासद न झालेल्या स्त्रियांचाच गट मोठा दिसतो. ज्या स्त्रियांना व पुरुषांना येथे सभेला येऊन काय कार्य चाललेले आहे हे ऐकावेसे वाटते त्यांना आठ आणे देऊन सभासद होण्याची बुद्धी का झाली नाही, याचे मला आश्चर्य वाटते. हा स्वतंत्र मजूर पक्षाचा एकंदर कारभार कोणाकरिता व कशासाठी आहे, याचा तुम्ही विचार केला आहे काय? हा सर्व कारभार तुमच्या आमच्यावर जो इतरांचा जुलूम आहे तो नाहिसा करण्याकरिता आहे. तेव्हा या कारभाराला मदत करणे, हे तुमचे कर्तव्य नाही काय? या जमलेल्या स्त्रियांमध्ये पुष्कळांना पानसुपारी खाण्याची सवय असेल. त्यासाठी दरमहा त्यांचे रुपया दोन रुपये खर्च होत असतील! असे असता स्वतंत्र मजूर पक्षालाच वर्षाकाठी आठ आणे देण्यास त्यांना जड का वाटावे ? माझी सर्व महार स्त्रियांवरा भिस्त आहे. त्या पुढे येऊन स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभासद होतील तर पुरुषांनाही त्यांचा कित्ता गिरविणे भाग पडेल. आतापर्यंत तुम्ही सर्व स्वतंत्र मजूर पक्षाचे आठ आणे देऊन सभासद झाला नाहीतं याबद्दल मला खेद बाटतो. परंतु मला आशा आहे की, थोड्याच अवधीत तुम्ही सर्वजण स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद व्हाल.*
*पुरुषांनाही मला हेच सांगावयाचे आहे की, तुमच्या हितासाठी स्वतंत्र मजूर पक्ष निघाला असून त्याचे आतापर्यंत चार हजारा सभासद व्हावेत ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आहे. तुम्ही सर्वांनी या पक्षाचे सभासद का होऊ नये, हे मला कळत नाही. काँग्रेसच्या श्रीमंतांच्या कैवारी संस्थेच्याविरुद्ध गोरगरिबांची दाद लावण्याचे कार्य हा स्वतंत्र मजूर पक्ष करीत आहे. आज असेंब्लीत काँग्रेसच्या झिंज्या उपटणारा व गरिबांचा कैवार घेणारा कोणता पक्ष असेल तर तो एकटा स्वतंत्र मजूर पक्ष हाच होय! मला या पक्षासाठी कॉंग्रेससारखे श्रीमंतांकडून पैसे मिळणार नाहीत, असे नाही. मी प्रयत्न केला तर श्रीमंताकडूनही या पक्षाला पुष्कळ पैसे मिळवून देवू शकेन, परंतु अशारीतीने श्रीमंतांच्या पैशाबर पैशाबर जर या पक्षाचे कार्य चालू लागले तर मग या पक्षाचे वैशिष्ट्य नष्ट होईल. हा पक्ष श्रीमंत लोकांनी विकत घेतल्यासारखे होईल. मग या पक्षाला गरिबांच्या हितासाठी कसे झटता येईल? म्हणून गरिबांच्या हितासाठी निघालेल्या या स्वतंत्र मजूर पक्षाला गरिबांनीच मदत केली पाहिजे. असे करण्यानेच तुमचे स्वातंत्र्य कायम राहील. गरिबांचा संसार गरिबांनीच चालविला पाहिजे हे जर तुम्हाला समजले असेल तर मला आशा आहे की, मुंबई शाखेच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभासदांची संख्या चार हजारांची चाळीस हजार होण्यास वेळ लागणार नाही. देशाचे स्वातंत्र्य काँग्रेसचे शेठजी-भटजी मिळवणार नसून ते स्वतंत्र मजूर पक्षाचा श्रमजिवी वर्गच मिळवील ही गोष्ट लक्षात ठेवा...*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर*
*स्थळ - नायगाव मुंबई*
*सोर्स - जनता*
*तारीख २७/३/१९३८*
#🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर