*शिवकालीन कृषि अर्थव्यवस्था आणि खराज्याचे धोरण*
*रयतेच्या जगण्याचा एकमेव आधार शेती होती. दुष्काळाने गावगाडा उद्ध्वस्त झाला. या गावगाड्यातील हतबल प्रजेला दिलासा देण्याचे काम सर्वप्रथम शिवाजीराजांनी केले. दुष्काळाने वित्तहानी आणि मनुष्यहानी अतोनात झाली. गो. स. सरदेसाई या संदर्भात* *नोंदवतात, उद्ध्वस्त झालेली गावे शिवाजीने कौलनामे देऊन वसवली. नव्याने जमीन कसायला घेणाऱ्यांना बी-बियाणे देऊन व औतफाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिले. नवीन लागवडीखाली आणलेल्या या जमिनींना सुरुवातीची चार-पाच वर्षे महसूलसुद्धा कमी ठेवला.*
*दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या पुणे प्रांतात शिवाजीराजांनी अशारीतीने आपला कार्यारंभ केला. संपूर्ण प्रदेश ओसाड पडलेला. जंगली श्वापदांचे साम्राज्य वाढले. लागवडीखालच्या जमिनीही पडीक पडल्या. गावगाड्यातला माणूस शेतीसह पूर्ण दुभंगला. अशा काळात जहागिरीची व्यवस्था लावण्याचे कार्य शिवबाने दादोजींना सोबत घेऊन केले. लुटारू आणि चोरांची भीती नष्ट करणे हे पहिले काम होते. शिवाजीने गावोगाव चौक्या बसवून लुटारूंना नियंत्रणात आणले. श्वापदांना मारणाऱ्यास बक्षिसे जाहीर केली. शेतीची पडीक अवस्था अशीच कायम राहिली तर उत्पादन वाढणार नाही, त्यासाठी शेतकऱ्याला प्रोत्साहित करण्यासाठी सारा माफी केली. स्वराज्याचा आशय फक्त राजकीय नसून, त्याला समाजजीवनाच्या सुस्थिरतेचा, संपन्नतेचाही संदर्भ असतो, हे जाणून राजांनी गावाला राब्बते केले. शेती आणि शेतकऱ्यांच्या संरक्षणाचे चहूबाजूंनी धोरण आखले.*
*शेती आणि बैल यांचे नाते अजोड आहे. जंगली प्राण्यांना पाळीव प्राणी करून त्यांच्या शक्तीचा वापर शेतीसाठी करणे, ही मानवाच्या उत्क्रांतीची अतिशय महत्त्वाची अवस्था होती. शेतीचे आज एवढ्या मोठ्याप्रमाणात यांत्रिकीकरण आणि आधुनिकीकरण झाले आहे तरी बैलाच्या वापराला पूर्ण पर्याय निर्माण झालेला नाही.* *बैलाचे शेतीव्यवसायातील असाधारण स्थान राजांच्या लक्षात येणे हीच मध्ययुगीन राजेशाही मनोवृत्तीचा विचार करता मोठी बाब होती. शत्रू बैलांना,* *गाईंनाही पळवून नेत असत. दुष्काळाने तर* *पशुधन धोक्यात*
*आलेले.*
*"ज्याला शेत करावयास कुवत आहे आणि त्याला जोतास बैल, नांगर, पोटास दाणा नाही, त्यावीण तो आडोन, निकामी जाला असेल, तरी त्याला रोख पैसे हाती देऊन दो चौ बैलाचे पैसे द्यावे. बैल घेवावे."*
*"बैलाचे व गल्याचे पैके वाढी दिढी न करता मुदलचा उसनेच हळूहळू याचे तवानगी माफीक घेत घेत उसूल घ्यावा. जोवर त्याला तवानगी येई तोवर वागवावे."*
*शिवाजीराजांचे बैलजोडी घेण्याबाबतचे धोरण किती स्पष्ट आणि मूलभूत होते हे या पत्रावरून दिसते. अधिक हतबल झालेला शेतकरी त्याला व्याजाने पैसा देणे, बळजोरीने वसुली करणे ही बाब राजे त्याज्य मानीत होते. त्यासाठी मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांप्रती त्यांनी उदार धोरण स्वीकारले. शेतीची औजारे घेण्यासाठीही बिनव्याजी कर्जाची सोय उपलब्ध करून दिली. शेतकरी वर्गासोबतच गावगाड्यातला बलुतेदारही कोलमडून पडला होता. शेतकऱ्यांकडेच अन्नधान्य नाही तर तो बलुतेदारांना तरी कुठून देणार, शिवाजीराजांनी शेतीची औजारे, औतफाटा, नांगर विकत घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे बी-बियाणे खरेदीसाठीही कर्ज दिले. शेतकऱ्यांना अडीअडचणीत नाडणारा सर्वांत मोठा वर्ग सावकारांचा. पुढील काळात उद्योगधंद्यांच्या विकासासाठी सावकाराबद्दल राजांनी थोडे उदार धोरण स्वीकारले असले तरी सामान्य प्रजेला सावकारापासून असणारा धोका ते ओळखून होते. त्यामुळे कर्जाच्या बिनव्याजी सुविधा बरोबरच गरजवंतांना शिवरायांनी सरकारी धान्यसाठ्यातून धान्य देण्याचीही सुविधा दिली.*
*सभासद बखरीत शेतकऱ्यांविषयी शिवाजीराजांच्या धोरणाचे तपशिलाने वर्णन सभासदाने केले आहे.*
*"पाच हात व पाच मुठीची काठी. हात चवदा तसूंचा असावा. हात व मुठी मिळून बैशी तसूची लांबी काठीची. वीस काठ्या औरस चौरस त्यांचा बिधा एक. बिघे एकशेवीस त्यांचा एक चावर, अशी मोजून आकारून गावाची गावास मोजून चौकशी केली.*
*बिघे यास पिकाचा आकार करून पाच तक्षिमा पिकाच्या करून तीन तक्षिमा रयतेस द्याव्या. दोन तक्षिमा दिवाणात घ्याव्या. येणेप्रमाणे रयतेपासून घ्यावे. नवी रयत येईल त्यास गुरे-ढोरे द्यावी. बीजास दाणा पैका द्यावा. भक्षावयासि दाणापैका द्यावा. तो ऐवज दोहो चोहो वर्षांनी आयुर्दाव पाहून उगवून घ्यावा. ये जातीचे रयतेचे पालग्रहण करावे. गावचा गाव रयतेची रयत कारकुनाचे कमाविस पाहून रयतेपासून वसूल, पिकाचे पिकावर घ्यावा. मुलुखात जमीदार, देशमुख व देसाई यांचे जप्ती खाली कैदेत रयत नाही! याणी साहेबीकडून नागवीन म्हटलियाने त्यांचे हाती नाही."*
*शेतकऱ्याच्या परिस्थितीचे शिवाजीराजांना किती नेमके भान होते ते या नोंदीवरून दिसते. राजा हा प्रजेला जबाबदार असतो आणि प्रजा ही राजाला, याची पूर्ण जाणीव*
*असल्याने वतनदार, देशमुख, देसाई यांच्या जप्तीखाली रयत नाही या शिवाजीराजांच्या धोरणाची नोंद बखरकार घेताना दिसतो. यावरून राजेपणापेक्षाही लोकधार्जिणेपण राजांना विशेष महत्त्वाचे असल्याचे वाटत होते हेच दिसते.*
*वतनदार, मिरासदारांचा बंदोबस्त शिवाजीराजांनी कसा केला याची नोंद सभासद घेतो.* *हा बंदोबस्त करणे का भाग आहे याचीही पुरती जाणीव राजांना होती....*
*पुढील भागात*
*मुक्तीदाता विशेषांक*
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #💪बुद्धांची तत्वे📜 #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस