꧁◉❥❤️SONA PATIL
❤️❥◉꧂
*क्रांतिसिंह नाना पाटील यांना १२५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन *
प्रतिसरकारचे जनक, तुफानी क्रांतिकारक नाना पाटील यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मराठामार्गने त्याचे जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश..
छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन इंग्रजांनी नाही तर आपणच स्वतःचे राज्य चालविले पाहिजे असे म्हणत महाराष्ट्राच्या मातीत 'जनतेचे राज्य' प्रत्यक्ष साकारणारा, अन्यायाविरुद्ध शड्डू ठोकून उभा ठाकणारा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण देशसेवेसाठी समर्पित करणारा हा तुफानी योद्धा कसा होता, त्यांचा जीवनपट, त्यांचा संघर्ष आणि त्यांचे विचार तरुण पिढीने समजून घेणे गरजेचे आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील बहे या गावी (त्यांचे आजोळ) झाला. त्यांचे मूळ गाव येडेमच्छिंद्र (ता. वाळवा, जि. सांगली). घरात वारकरी संप्रदायाचे संस्कार असल्याने बालपणीच त्यांच्या गळ्यात विठ्ठलाची तुळशीमाळ आली.
त्या काळात गावात फक्त तिसरी-चौथीपर्यंतच शाळा होती. पुढील शिक्षणासाठी नानांनी इस्लामपूर, नागराळे, पुणदी अशा विविध ठिकाणी दुसऱ्यांच्या घरी राहून, खडतर परिस्थितीचा सामना करत शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी तलाठी म्हणून नोकरी स्वीकारली. परंतु, केवळ कागदपत्रे हाताळण्यात आणि ब्रिटिशांचे हुकूम पाळण्यात त्यांचा स्वाभिमानी आत्मा रमणार नव्हता.
तलाठी म्हणून काम करत असतानाच त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा खोल प्रभाव पडला. नाना पाटील फक्त बोलणारी नव्हते तर ते स्वतःच्या आचरणातून क्रांती घडवणारे कृतीशील पुरुष होते:
१९२० च्या दशकात, जेव्हा समाजात कर्मठपणा ठासून भरला होता, तेव्हा नानांनी स्वतःचा विवाह अत्यंत कमी खर्चात, कोणत्याही भटजीशिवाय, स्वतः मंगलाष्टका म्हणाव्या अशा 'सत्यशोधक' पद्धतीने केला. समाजाचा आणि कुटुंबाचा विरोध डावलून त्यांनी आपल्या पत्नीला सुशिक्षित केले. आपल्या बहिणीचे व मुलीचे (हौसा आक्का) विवाहही याच पुरोगामी पद्धतीने घडवून आणले. त्यांनी ग्रामीण भागात फिरून प्रौढ साक्षरता, दारूबंदी, अस्पृश्यता निर्मूलन आणि हुंडाबंदीसाठी मोठे प्रबोधन केले. त्यांनी लावलेल्या या विवाहांची साताऱ्यात 'गांधी लग्न' म्हणून ओळख निर्माण झाली.
सरकारी नोकरीत असतानाही नाना पाटील उघडपणे स्वातंत्र्यलढ्याचा आणि सत्यशोधक विचारांचा प्रचार करत असत. हे इंग्रज अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांना नोकरीवरून निलंबित करण्यात आले.
> *ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "माफी मागा, तुम्हाला नोकरीवर परत घेतले जाईल" अशी ऑफर दिली. पण, स्वाभिमानी बाणा असलेल्या नानांनी जुलमी सत्तेची गुलामी स्वीकारण्याऐवजी नोकरीवर लाथ मारली आणि पूर्णवेळ स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले.*
नोकरी सुटल्यानंतर काही काळातच त्यांच्या आजी, वडील आणि पत्नींचे निधन झाले. त्यावेळी नानांचे वय अवघे ३० वर्षे होते. परंतु, वैयक्तिक दुःखात खचून न जाता बहुपत्नीत्वाची पद्धत असताना दुसऱ्या लग्नाचा विचारही मनात आणला नाही. आपली जमीन-जुमला भावांच्या नावे करून आणि चिमुकल्या मुलीला नातेवाइकांकडे सुपूर्द करून त्यांनी संपूर्ण आयुष्य भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केले.
१९३०च्या सविनय कायदेभंग आंदोलनात गांधीजींच्या हाकेला प्रतिसाद देत नानांनी कायदेभंगाच्या आंदोलनात उडी घेतली. १९३२ ते १९४२ या काळात त्यांनी तब्बल ८ वेळा तुरुंगवास भोगला. एकदा तुरुंगातून पॅरोलवर सुटल्यावर, पोलिसांची नजर चुकवण्यासाठी त्यांना काही दिवस इस्लामपूर परिसरात 'पोतेबुवा' बनून भिकाऱ्यासारखे जगणे भाग पडले होते. पण त्यांनी हार मानली नाही. आणि इंग्रजांची माफीही मागितली नाही.
१९४२ मध्ये महात्मा गांधींनी 'भारत छोडो'चा नारा दिला. देशभरात मोठे नेते अटकेत गेले त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांचे मनोबल खचले आणि आंदोलन काहीसे थंडावले. परंतु, साताऱ्याच्या भूमीत क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भूमिगत राहून एक ऐतिहासिक चमत्कार घडवला!
वारणा नदीच्या उत्तरेपासून नीरा नदीच्या दक्षिणेपर्यंतच्या सुमारे १५०० गावांमध्ये ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आणून नानांनी ब्रिटिशांच्या छातीवर धडधडणारे प्रतिसरकार (समांतर सरकार) स्थापन केले.
या गावांत ब्रिटिशांचे कायदे चालत नसत. सावकार, दरोडेखोर आणि इंग्रजांच्या बातमीदारांना धरून त्यांच्या पायावर काठ्या मारून शिक्षा दिली जाई, म्हणूनच याला 'पत्री सरकार' असेही म्हटले गेले.
आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी, जुलमी सावकारांवर व ब्रिटिशांच्या खजिन्यावर छापे मारण्यासाठी त्यांनी तरुण क्रांतिकारकांची तुफान सेना उभारली.
क्रांतिसिंह नाना पाटील स्वतःचा एक तारा निर्माण केला होता. ब्रिटिश संसदेत (House of Commons) तत्कालीन पंतप्रधान आणि विरोधी नेत्यांमध्ये खडाजंगी झाली होती की, "साताऱ्यात सरकार कोणाचे चालते? ब्रिटिशांचे की नाना पाटलांचे?". त्यावेळी क्रांतीसिंह नाना पाटील यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी ५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते (त्या काळातील प्रचंड मोठी रक्कम). तेव्हा नाना पाटील ४४ महिने भूमिगत होते.
१९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला, पण नाना पाटलांचा संघर्ष संपला नव्हता. सत्ता आणि पदाच्या मोहात न पडता त्यांनी आपले उरलेले आयुष्य पुन्हा जनता, शेतकरी आणि कामगारांसाठीच वेचले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या लढ्यात नानांनी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या अमोघ वक्तृत्वाने ढवळून काढला. गोव्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलनात थेट भाग घेतला.
१९५७ मध्ये ते सातारा लोकसभा मतदारसंघातून तर १९६७ मध्ये बीड मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने खासदार म्हणून निवडून आले. संसदेमध्ये पहिल्यांदा मराठीतून भाषण करून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा आणि शेतकऱ्यांचा आवाज देशाच्या सर्वोच्च सभागृहात बुलंद केला. कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या माध्यमातून त्यांनी खंडकरी शेतकरी, धरणग्रस्त आणि भूमिहीनांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला.
दोन-दोन वेळा देशाचे खासदार राहिलेल्या या महान नेत्याने स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी एक गुंठा जमीन किंवा घर बनवले नाही. सर्व काही देशाच्या आणि जनतेच्या कामासाठी अर्पण केले.
आयुष्याच्या शेवटच्या काळात ते पंढरपुरातील रामबागेत राहिले. ६ डिसेंबर १९७६ रोजी जेव्हा या महान क्रांतिसिंहाने जगाचा निरोप घेतला, तेव्हा त्यांच्या मागे संपत्तीच्या नावाखाली काय उरले होते?
तर एक लोखंडी पेटी, पायातील एक चपलांची जोडी, एक घोंगडे आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून सरकारने दिलेला ताम्रपटाचा एक बिल्ला!
नाना म्हणत,
> 💬 *"देशाकरता थोडं कार्य करण्याची नियतीने मला संधी दिली, यातच मी कृतार्थ आहे, तृप्त आहे. सगळेजण मला विसरले, पण अर्धनग्न शेतकरी-माझा बळीराजा मला विसरला नाही. कारण आपल्या मातीचा गुणच तसा आहे!"*
त्यांची शेवटची इच्छा होती,
> 💬 *"मी तिकडे वाळव्याला मेलो तर हुतात्मा किसन अहिरच्या पुतळ्यासमोर क्रांतीचा एक शिपाई म्हणून मला जाळा, आणि पंढरपुरात मेलो तर तिथल्या वाळवंटात वारकरी म्हणून मला जाळा. मी मेल्यावर माझ्या प्रेतावर फक्त एक फूल वाहा आणि म्हणा— नाना पाटील: देशभक्त रयत सेवक!*
> 💬 *"अन्याय सहन करणे हे पाप आहे; आणि स्वतःच्या हक्कासाठी संघटित होऊन लढा देणे हाच खरा पराक्रम आहे!"*
क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान, महात्मा फुलेंची सामाजिक दृष्टी, छत्रपती शाहू महाराजांचा बहुजन-कल्याणकारी विचार आणि महात्मा गांधींचे राष्ट्रप्रेम यांचा जिवंत संगम होते.
आज राजकारणाचा आणि समाजकारणाचा दर्जा घसरलेला असताना, नाना पाटलांचे शुद्ध चारित्र्य, त्याग, निष्ठा आणि निर्भयता हा आजच्या तरुण पिढीसाठी मोठा दीपस्तंभ आहे.
या महान युगपुरुषाला, सह्याद्रीच्या क्रांतीसिंहाला, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या पाठीराख्याला, खऱ्या स्वातंत्र्यवीराला १२५ व्या जयंतीनिमित्त कोटी-कोटी प्रणाम! #माझा कट्टा