Marathi Social Media
2K views • 8 hours ago
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार
#मुंबई : राज्यातील बहुतांश भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप घेतली असली, तरी आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची तीव्रता वाढू शकते.
बंगालच्या उपसागरात पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, ९ ते १२ ऑगस्टदरम्यान कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात विखुरलेल्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात पावसाच्या सरींची शक्यता असून, घाट परिसरात पावसाचा जोर वाढू शकतो. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, स्थानिक पूर, वाहतुकीवर परिणाम आणि झाडे उन्मळून पडण्याचा धोका आहे. घाट परिसरात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ६३७.१ मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरी ६२२.७ मिमीच्या तुलनेत सुमारे दोन टक्के अधिक पाऊस झाला आहे. तळकोकणात पावसाची संततधार सुरू असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १६०८ मिमी पाऊस झाला आहे.
#rain
#⛈️राज्यात अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी⚠️
10 likes
32 shares