Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
542 views • 2 days ago
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतायोग
निर्भेळ राजकारणाला भारतात स्थान नाही. त्याला उदात्त तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान हवे. ही गोष्ट या देशातील राजकीय पुरुषांनी अगदी प्रारंभापासून ओळखली. राजकारण हा केवळ सत्ता हस्तगत करण्याचा खेळ नाही. पारतंत्र्याने राष्ट्रांचा अधःपात होतो. स्वातंत्र्याखेरीज मानवी जीवनातील मूल्ये प्राप्त होऊ शकत नाहीत. ह्याच भावनेने भारतातील स्वातंत्र्याच्या चळवळीचा प्रारंभ झाला. ह्या चळवळीचे नेतृत्व दादाभाई नौरोजी, महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले ह्यांच्यासारख्या सच्चरित साधुपुरुषांकडे असल्याने, स्वातंत्र्याच्या राजकारणाला सुरुवातीपासूनच पवित्र आणि तेजस्वी स्वरूप प्राप्त झाले. परकीय राज्यकर्त्यांचे डोळेसुद्धा त्याने दिपले. ह्या राजकारणाला विरोध करण्यासाठी सर्रास दडपशाहीचा एकसारखा अंगीकार करण्याची ब्रिटिशांनासुद्धा लाज वाटली. एक गोष्ट मान्य केली पाहिजे : जीवनातील अत्युच्च मूल्ये इंग्रज लोक मानीत होते. त्यामुळे भारतांतील स्वातंत्र्याच्या चळवळीचा प्रतिकार करताना त्यांची मने त्यांना नेहमीच खात. भारतातील स्वातंत्र्याच्या चळवळीला जर आध्यात्मिक अधिष्ठान मिळाले नसते, तर इंग्रजांपुढे ही नैतिक समस्या कधीहि उत्पन्न झाली नसती. आपली स्वातंत्र्याची चळवळ हे एक जर धर्मयुद्ध असते किंवा परकीय राजसत्तेविरुद्ध नुसतेच बंड असते तर त्याचा बीमोड करतांना ब्रिटिशांना ही नैतिक अडचण कधीच पडली नसती. पण स्वातंत्र्य हा एक मानवतेचा वारसा आहे. परमेश्वराची ती देणगी आहे. राष्ट्राच्या स्वाभिमानाचे ते एक प्रतीक आहे. स्वातंत्र्य मिळाल्याखेरीज राष्ट्राचा आत्मा कदापि शांत होणार नाहीं, ह्या भव्य आणि दिव्य स्वरूपांत
भारताने स्वातंत्र्याची मागणी केली म्हणून तिचे न्याय्य आणि नैतिक स्वरूप ब्रिटिशांना कधीहि नाकारता आले नाही. लोकमान्य टिळक हे महान् तत्त्वज्ञानी होते. गीतेचे मंथन करून त्यांनी कर्मयोगाचे रहस्य त्यातून शोधून काढले. परमेश्वरावर विश्वात ठेवून त्यागबुद्धीने माणसाने सतत कर्म करीत राहिले पाहिजे, हा संदेश यांनी राष्ट्राला दिला. त्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीत एक निराळेच दैवी तेज आणि सामर्थ्य निर्माण झाले, स्वातंत्र्याचा अर्थ महात्मा गांधीनी अधिक स्पष्ट केला. स्वातंत्र्य ही आत्मशुद्धीची चळवळ आहे हे त्यांनी सांगितले. शुद्ध भावनेने आणि शुद्ध साधनाने असत्याचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य जर राष्ट्राच्या अंगी आले तर परकी सत्ता या देशात एक क्षणभर राहू शकणार नाही हे त्यांनी सांगितले. भारतीय राजकारणाची हीच आध्यात्मिक परंपरा डॉ. आंबेडकरांनी पुढे चालविलेली आहे असे म्हटले पाहिजे. महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक या दोघांच्याहि तत्त्वज्ञानाचा चमत्कारिक समन्वय आंबेडकरांच्या राजकारणात झालेला आढळून येतो. लोकमान्यांप्रमाणेच ते प्रखर कर्मयोगी आहेत आणि महात्माजींप्रमाणेच ते जाज्वल्य सत्याग्रही आहेत. जातिभेद आणि अस्पृश्यता हीं असत्ये आहेत. समता हेच जगातील एक महान् सत्य आहे. समता हाच मानवांचा खरा धर्म आहे. जातिभेदावर आधारलेली हिंदू समाजाची चौकट तोडून टाकल्यावांचून अस्पृश्यता नष्ट होणार नाही आणि समता प्रस्थापित होणार नाही हे त्यांनी पुरते ओळखले आहे. बलाढ्य आणि जुलुमी राज्यसत्तेशी असहकार पुकारून याप्रमाणे महात्माजीनी भारताची शक्ति संघटित केली त्याप्रमाणें जातिभेदाने दूषित झालेल्या हिंदु समाजाशी असहकार पुकारून देशातील सात कोटी अस्पृश्यांना आंबेडकरांनी संघटित केले आणि त्यांच्या अंगी नवे सामर्थ्य आणि नवा निर्धार निर्माण केला. आंबेडकरांचा झगडा हा हक्काचा झगडा आहे. ती काही भिकेची याचना नव्हे. अस्पृश्य समाजात आज जो विलक्षण स्वाभिमान निर्माण झालेला दिसतो आहे त्याचे श्रेय आंबेडकरांनाच दिले पाहिजे. हप्त्याहप्त्याने अस्पृश्यता नष्ट करण्याची कल्पना त्यांना अमान्य आहे. अस्पृश्यांना 'हरिजन' म्हणा, त्यांना मंदिराचे दरवाजे उघडून द्या, या सुधारणावादी मार्गाने समाजात समता प्रस्थापित होणे अशक्य आहे ही त्यांची भूमिका आहे. समतेच्या बाबतींत कोणत्याहि ते-हेची तडजोड मान्य करण्याची त्यांची तयारी नाही, म्हणून पुष्कळदा ते हट्टी आणि दुराग्रही असावेत असें त्यांच्या टीकाकारांना वाटते. स्वार्थाचा नि जातीयवादाचाहि आरोप वारंवार त्यांच्यावर केला जातो. आंबेडकरांची चळवळ ही केवळ नोकऱ्या मिळविण्याची आणि सत्ता काबीज करण्याची चळवळ असती तर अधिकारारुढ काँग्रेस पक्षाशी उघडपणे असहकार करुन पराभवाचे माप स्वतःच्या पदरात पाडून घेण्याच्या भानगडीत ते कदापि पडलेन नसते. समतेचा आग्रह धरतांना राष्ट्रीय ऐक्याची दृष्टि त्यांनी केव्हाहि तोडली नाही हे विसरुन कसे चालेल? मुसलमानाच्या...
पुढील भागात
मुक्तीदाता विशेषांक #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #bhimsenik #✍️सुविचार #💙 भीमसैनिक 💙
11 likes
5 shares