Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
713 views • 6 days ago
दयेची भीक नको
हिंदू समाजातील अस्पृश्यता नष्ट कशी करावी ह्याचा पहिला विचार ह्या भारतात महात्मा फुले यांनी केला. त्याच्या आधी या देशात मोठमोठे साधुसंत, ऋषी, महात्मे होऊन गेले. पण अस्पृश्यता हे हिंदुधर्माला लागलेले एक लांछन आहे, आणि ते दूर झाल्यावाचून तो खऱ्या अर्थाने 'धर्म होऊ शकणार नाही' असे उद्गार त्यापैकी कोणीहि काढलेले नाहीत, किंवा त्या दृष्टीने कोणी प्रयत्नही केला नाही. चातुर्वर्ण्य आणि अस्पृश्यता ही भगवंतानीच निर्माण केलेली असून त्या अवस्थेत आता कोणालाहि ढवळाढवळ करता येणार नाही, अशीच सर्व संतांची समजूत होती. त्यामुळे माणसांसारख्या माणसांना जनावरांपैक्षाहि हीन रीतीने वागविणे हा आमच्या माणुसकीला बट्टा आहे, असा विचारसुद्धां कोणाच्या डोक्यात आला नाही. पंढरीच्या विठोबाने दामाजीपंतांची रसद पोहोचविण्यासाठी 'विठू महारा'चे रूप घेतले, ह्यांचे सर्व संतांनी माना डोलावून मोठे कौतुक केले; पण ज्या महाराच्या देहात प्रवेश करावयाला पंढरीनाथालादेखील संकोच वाटला नाही ती महार जात स्पर्श करण्याच्यासुद्धा योग्यतेची आहे असे काही कोणा साधुसंताला वाटले नाही. श्री एकनाथमहाराजानी रडणारे महाराचे तान्हे पोर उचलून हृदयाशी धरले आणि त्याचे सांत्वन केले, ह्याबद्दल त्या काळची परिस्थिति लक्षात घेतली म्हणजे एकनाथ महाराजाचे कौतुक करावेसे वाटते हे खरे; पण या कौतुकाची मजल येथेच थांबते. पुढे जात नाही. महाराच्या तान्ह्या मुलाला एकनाथानी जसे जवळ केलें तसे साऱ्या महारामांगांना किंवा अस्पृश्यांना जवळ केले पाहिजे, असे काही त्यांना वाटले नाही. सारांश,
'जे जे भेटे भूत । ते ते भासे भगवंत ।।' अशा सर्व भूतमात्रांत भगवंत पाहणाऱ्या आमच्या साधुसंतांना
अस्पृश्यांमध्ये काही भगवंत दिसला नाही, ही गोष्ट मोठ्या खेदाने कबूल करावी लागते. 'ज्यासी आपगिता नाही. त्यासी घरी जो हृदयी, तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा' असे तुकोबांनी म्हणून ठेवले आहे; पण त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या कोणाही साधुसंतांनी अस्पृश्यांना हृदयाशी धरलेले नाही किंवा धरावे असा उपदेशहि केलेला नाही, हा त्यांच्या साधुत्वामध्ये फार मोठा उणेपणा राहून गेला आहे.
इंग्रजांचे राज्य या देशात आले आणि त्यांच्याबरोबर जातिभेद नि अस्पृश्यता असला अमंगळ भेदाभेद नसलेला समतावादी ख्रिस्ती धर्महि या देशात आला. तो पाहून 'लोकहितवादी' आणि महात्मा फुले ह्यांच्यासारख्या न्यायाची आणि माणुसकीची चाड असलेल्या विचारवंतांना एकदम अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करणे भाग पडलें; आणि त्याबरोबर हिंदुसमाजातून अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे असा त्यांनी ताबडतोब निष्कर्ष काढला. पांच हजार वर्षांमध्ये या भारतवर्षांत महारामांगांसाठी कोणी शाळा काढली नव्हती ती महात्मा फुले यांनी काढली. अस्पृश्यांना पुण्यामध्ये पाणी प्यायलासुद्धा हौद नव्हता, तो फुले यांनी प्रथम बांधला. हिंदुस्थानातील जातिभेद अणि अस्पृश्यता नष्ट झाल्याखेरीज या देशाचा उद्धार होणें शक्य नाही, हा साक्षात्कार महात्मा फुले यांना प्रथम झाला; पण स्वराज्य मिळाले तरी धर्मात बदल होणार नाही. चातुर्वर्ण्य आणि अस्पृश्यता आहे तशीच राहील हे जेव्हा त्यांना समजले तेव्हा स्वराज्याबद्दलचे त्यांचे आकर्षण एकदम नष्ट झाले. राजकीय पारतंत्र्यापेक्षा सामाजिक पारतंत्र्य नष्ट करणे, हे अधिक महत्त्वाचे त्यांना वाटूं लागले. डॉ. आंबेडकरांचीसुद्धा हीच भूमिका होती. गांधीजी किंवा नेहरू यांच्याएवढेच ते कट्टर स्वातंत्र्यवादी होते आणि काँग्रेसने आपल्या कार्यक्रमात अस्पृश्यतानिवारणाचा समावेशहि केला होता, पण अस्पृश्यता निवारण करण्याचे काँग्रेसचे मार्ग डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. किंबहुना दोघांच्या मार्गात मूलभूत भेद होता. महात्मा फुले ह्यांच्यानंतर अस्पृश्यता निवारण करण्याचा प्रयत्न करणारे पुष्कळ समाजसेवक होऊन गेले; पण त्या सर्वांचे प्रयत्न स्पृश्यवर्गाची दया, कींव आणि करुणा या भावना जागृत करण्यावर आधारलेले होते. गांधींचा आणि काँग्रेसचाहि अस्पृश्यता निवारण करण्याचा तोच मार्ग होता. 'अस्पृश्यांकडे पाहण्याची स्पृश्य समाजाची दृष्टि बदलली पाहिजे, त्यांचे हृदयपरिवर्तन झाले पाहिजे,' ही महात्माजींची भूमिका होती; पण अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठीं भूतदयेचा आधार आंबेडकरांना मुळींच मान्य नव्हता. पतिपक्षाच्या भूतदयेच्या वृत्तीने व्यक्ति किंवा समाज दुबळा बनतो. मन मरते. बुद्धि परावलंबी बनते. पिढ्यान् पिढ्या नाश करणारे मानसिक दास्य उत्पन्न होते आणि त्यामुळे उद्धार होऊ शकत नाही. अस्पृश्यता कायद्याने मेली पाहिजे आणि त्यांना कायद्याचे संरक्षण मिळाले पाहिजे, या गोष्टीवर त्यांचा सर्वांत जास्त कटाक्ष होती. म्हणूनच राज्ययंत्राची सूत्रे इतरासारखी अस्पृश्यांच्या हाती आली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. अशा रीतीने अस्पृश्यता नाहीशी करण्याच्या आपल्या चळवळीला त्यांनीं राजकारणाचे स्वरूप दिले. अस्पृश्यता निवारण करणें ही तोपर्यंत एक सामाजिक सुधारणेची बाब म्हणून समजली जात होती; पण डॉ. आंबेडकरांनी या चळवळीला राजकीय स्वरुप देऊन तिच्यांत आमूलाग्र क्रांति घडवून आणली!
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
संदर्भ मराठा : ११/१२/१९५६
मुक्तीदाता विशेषांक #✍️सुविचार #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought
15 likes
11 shares