भारतीय अस्मितेच्या जागृतीचा आविष्कार : श्री शिवराज्याभिषेक...🚩
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला भारताच्या इतिहासात जे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, त्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी तत्कालीन मोगल साम्राज्याची घटना, नीती धोरण समजावून घेणे आवश्यक आहे...
इ.स.१५२६ मध्ये बाबरने हिंदुस्थानात मोगल साम्राज्याची स्थापना केली, पण त्याचा खरा विस्तार अकबराच्या काळात झाला. १५५६ ते १६०५ या आपल्या कारकिर्दीच्या काळात अकबराने आपल्या साम्राज्याच्या सीमा काबूल, काश्मीर, आसाम, गुजरात आणि अहिल्यानगर पर्यंत वाढविल्या. मोगल साम्राज्याच्या विस्ताराचे स्वरूप मांडलिक राजघराणी शिल्लकच ठेवायची नाहीत, या पद्धतीचे होते. या धोरणास अनुसरूनच अकबराने काश्मीर, सिंध, गुजरात, माळवा, बंगाल, ओरिसा, खानदेश इत्यादी राज्ये खालसा करून राजघराणी नष्ट केली आणि त्या त्या प्रदेशांवर आपला अंमल बसविला. अकबराच्या या धोरणाचीच परिपूर्ती शहाजहानने अहिल्यानगर खालसा करून आणि औरंगजेबाने विजापूर व गोवळकोंडा ही राज्ये खालसा करून अमलात आणली...
● मोगलांना सार्वभौमत्वाची दोन चिन्हे :
आपल्या नावाची नाणी आणि आपल्या नावाचा खुतबा मशिदीत पढला जाणे. मोगलांनी प्रादेशिक राज्ये नष्ट करून ही चिन्हे सर्वत्र अंमलात आणली. सतराव्या शतकाच्या सुमारास हिंदुस्थानात मोगलांना मांडलिक म्हणून नांदणारे राजेही नको होते, त्यांना हवा होता फक्त अंमल. मोगलांच्या आव्हान देईल असे स्थानिक लोकांचे म्हणजे बव्हंशी हिंदूंचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात राहिले नाही. १५६५ च्या तालिकोटच्या लढाई नंतर विजयनगरच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आणि सतरा व्या शतकाच्या पूर्वार्धात साम्राज्य झपाट्याने संपुष्टात येऊ लागले होते. आणि ते साम्राज्य नष्ट करू पाहणारे विजापूर अन् गोवळकोंड्याचे सुलतान हे स्वतः मोगलांचे मांडलिक बनले होते. या सुलतानांना क्रमाक्रमाने नष्ट करण्याचे धोरण शहाजहान आणि औरंगजेब आखीत होते. यामुळे औरंगजेब गादीवर आला त्या वेळी मोगलांना आव्हान देणारे एकही स्वतंत्र राज्य हिंदुस्थानात शिल्लक राहिले नव्हते...
१७ व्या शतकाच्या मध्यापर्यंत मोगल बादशहा हे भारताचे एकमेव 'सम्राट' ही भूमिका जनमानसात रूढ होऊन गेली. 'दिल्लीश्वर', 'पृथ्वीपती' असे त्यांच्या बद्दल उल्लेख होऊ लागले. अशा राजकीय परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राज्याची स्थापना केली. कोणत्याही अर्थाने हे राज्य मोगलांचे अंकित किंवा मांडलिक समजले जाऊ नये, यासाठी अधिराज्याची वा सार्वभौमत्वाची जी तीन चिन्हे, छत्र धारण करणे, नाणी पाडणे आणि शक चालू करणे ती त्यांनी अमलात आणली. मोगल साम्राज्याशिवाय या देशात एक स्वतंत्र राज्य राहू शकते आणि त्या साम्राज्याला ते यशस्वीपणे आव्हान देऊ शकते, हे यामुळे घोषित झाले...
मध्ययुगीन भारतात अशी गोष्ट घडली नव्हती किंवा यापूर्वी मोगल काळात असे घडले नव्हते. यावर कोणी म्हणेल की स्वतंत्र राज्यस्थापनेचे अखिल भारतीय व ऐतिहासिक असे महत्त्व काय..? मोगल सम्राट हे लहान सहान राज्ये नष्ट करून एकच प्रबळ राज्य स्थापन करीत होते ना..? त्याला आव्हान देणे किंवा विरोध करणे हा एक प्रकारे प्रादेशिक उपक्रम नव्हे काय..? याचे उत्तर असे आहे की, भारतात मोगलांचे राज्य हे परक्यांचे राज्य होय. मध्य आशियातून आलेल्या तुर्कांचे राज्य होय. मोगल बादशहांना आपण तुर्क असून या देशावर राज्य करीत आहोत, आपण तुर्क व या देशातील लोक हिंदुस्थानी असे सतत वाटे. मोगल राज्ययंत्रणे मध्ये भारतीयांना त्यात हिंदू आणि मुसलमान दोन्ही जमाती आल्या स्थान नगण्य होते...
इराण, तुराण, खुरासान इत्यादी प्रदेशांतून आलेल्या लोकांनी मुख्य प्रधानापासून साध्या कारकुंनापर्यंत असंख्य जागा व्यापल्या. यात भर पडली औरंगजेबाच्या धर्मवेडाची. मोगल राज्य पूर्वी तात्त्विक दृष्ट्या लष्करी साम्राज्य होते. ते इस्लामी बनविण्याचा आणि प्रजेपैकी शेकडा नव्वद हिंदू असलेल्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून वागविण्याचा औरंगजेबाने चंग बांधला. असे परकी घराणे, परक्याने भरलेली अशी यंत्रणा आणि भारतीयांबद्दल ही असहिष्णुता या अटीवर भारत अखंड बनून एका तुर्क घराण्याखाली यावा हे सहन होणे शक्यच नव्हते. ही विचारसरणी मान्य केली तर हिटलरच्या हाताखाली युरोपचे एकत्रीकरण समर्थनीय ठरवावे लागेल...
● परकीय सत्तेला आव्हान :
म्हणूनच शिवाजी महाराजांच्या स्वतंत्र राज्यस्थापनेच्या आव्हानाचे महत्त्व आहे. भारतीय अस्मितेच्या जागृतीचा हा मोठा आविष्कार आहे. मराठे मोगल लढ्याचे स्वरूप यामुळे मर्यादित राहिले नाही. त्याला परक्यांची सत्ता उखडून काढण्याचे अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे मध्ययुगीन भारतात, परकी तुर्क सत्तेला आव्हान देऊन स्वतंत्र भारतीय राज्य स्थापन केल्याची घोषणा होय. या राज्याभिषेकातून महाराजांनी परकीय सत्तेला आणि परकी असहिष्णुतेला जे आव्हान दिले त्यातूनच परकी मोगल राजवटी विरुद्ध भारतीयांचा उठाव होऊन त्याची परिणती औरंगजेबाचा वंशज शहाआलम हा १७८४ मध्ये मराठ्यांचा पेन्शनर होण्यात झाली. यामुळे भारताच्या इतिहासात भारतीय अस्मितेचा प्रखर आणि यशस्वी आविष्कार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व आहे...
● समकालीन या घटनेने किती भारावले होते, याचे उदाहरण म्हणून कृष्णाजी अनंत सभासद यांचे एकच वाक्य पुरे आहे :
“....या पृथ्वीवर सर्वत्र म्लेंच्छ बादशहा असता एक मराठा राजा छत्रपती झाला ही सामान्य गोष्ट झाली नाही....."
श्री शिवराज्याभिषेक सोहळा चिरायू होवो.🚩
ळर #शिवराज्याभिषेक
――――――――――――
श्री शिवराज्याभिषेक सोहळा


