पुण्यातील एका शांत कॉलनीत 'आप्पा' एकटेच राहायचे. त्यांच्या पत्नीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांची एकुलती एक मुलगी, 'समीरा', बंगळुरूमध्ये एका मोठ्या आयटी कंपनीत नोकरीला होती आणि नुकतीच ती लग्न करून तिथे स्थायिक झाली होती.
आप्पांची एक सवय होती. गेल्या अनेक वर्षांपासून, घड्याळात रात्रीचे बरोबर १० वाजले, की त्यांचा समीराला न चुकता फोन यायचा. फोनवरचे त्यांचे प्रश्न नेहमी तेच असायचे.
"हॅलो बाळा, ऑफिसमधून घरी पोहोचलीस का? जेवण झालं का तुझं?"
सुरुवातीला समीरा या प्रश्नांची प्रेमाने उत्तरे द्यायची. पण लग्नानंतर आणि नोकरीच्या वाढत्या ताणामुळे तिला आप्पांच्या या रोजच्या फोनचा प्रचंड कंटाळा येऊ लागला. कधी ती मित्रांसोबत बाहेर असायची, कधी नवऱ्यासोबत टीव्ही बघत असायची, तर कधी ऑफिसच्या मीटिंगमध्ये असायची. बरोबर १० वाजता आप्पांचा फोन वाजला, की तिची चिडचिड व्हायची.
एके दिवशी रात्री समीराचे तिच्या नवऱ्यासोबत काहीतरी क्षुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. ती रागातच बेडरूममध्ये येऊन बसली. तिचे डोके भणाणून गेले होते.
तेवढ्यात घड्याळात १० वाजले आणि तिच्या मोबाईलवर 'आप्पा कॉलिंग' असे नाव झळकले. समीराने रागाने फोन उचलला आणि आप्पा काही बोलण्याआधीच ती संतापाने ओरडली.
"बाबा, काय लावलंय तुम्ही हे रोज रोज? मी आता लहान शाळेत जाणारी मुलगी नाहीये! माझं लग्न झालंय, माझं स्वतःचं एक वेगळं आयुष्य आहे. रोज रात्री बरोबर दहा वाजता फोन करून माझी चौकशी करणं प्लीज बंद करा आता. मला माझा 'स्पेस' हवाय. मी सुरक्षित आहे. मला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा मीच तुम्हाला फोन करत जाईन. प्लीज मला रोज हा असा त्रास देऊ नका!"
समीराने न थांबता एका श्वासात सर्व राग आप्पांवर काढला.
पलीकडून काही सेकंद पूर्ण शांतता होती. आप्पांचा फक्त एक जड श्वास समीराला ऐकू आला. थोड्या वेळाने अत्यंत कांपऱ्या आणि दबक्या आवाजात आप्पा फक्त एवढंच म्हणाले, "बरं बाळा... झोप आता. काळजी घे स्वतःची."
आणि फोन कट झाला.
त्या दिवसानंतर आप्पांचा रात्री १० वाजताचा फोन येणे कायमचे बंद झाले. ते फक्त सकाळी व्हॉट्सॲपवर एखादा 'सुविचार' किंवा फुलांचा फोटो पाठवायचे. समीराला खूप मोकळे आणि निवांत वाटले. "चला, सुटले एकदाची या रोजच्या कटकटीतून," असा विचार करून ती स्वतःच्या संसारात आणि नोकरीत मग्न झाली. ती स्वतःहून आप्पांना रविवारी कधीतरी पाच मिनिटे फोन करायची, तेव्हाही आप्पा अतिशय मोजकेच बोलायचे.
असेच सहा महिने उलटून गेले.
एके दिवशी पहाटे साडेपाच वाजता समीराच्या मोबाईलची रिंग वाजली. फोन पुण्याच्या शेजाऱ्यांचा होता. समीराने झोपेतच फोन उचलला आणि पलीकडचे शब्द ऐकताच ती जागीच थिजली.
आप्पांना झोपेतच सायलेंट हार्ट अटॅक आला होता आणि ते कायमचे हे जग सोडून गेले होते.
समीरा वेड्यासारखी रडत, पहिली फ्लाईट पकडून पुण्यात पोहोचली. घरातली ती गर्दी, ते रडणे आणि आप्पांचे ते शांत झोपलेले शरीर बघून समीराच्या काळजाचे तुकडे झाले. सर्व विधी पार पडले. नातेवाईक निघून गेले. चार दिवसांनी समीरा आप्पांची बेडरूम आवरत होती.
आप्पांच्या उशीखाली तिला त्यांचा तो जुना स्मार्टफोन आणि एक छोटीशी डायरी सापडली. समीराने ती डायरी उघडली. त्यातील एका पानावर आप्पांच्या थरथरत्या अक्षरातील ओळी वाचून समीराचा श्वासच कोंडला गेला.
आप्पांनी लिहिले होते:
"समीराच्या आईला जाऊन पाच वर्षे झाली. हे घर खायला उठतं. रात्री १० वाजले की मला घाम फुटायला लागतो, छातीत भयंकर धडधडतं. या एकटेपणाची आणि अंधाराची मला खूप भीती वाटते. पण जेव्हा मी रात्री बरोबर १० वाजता समीराला फोन लावतो, तिचा 'हॅलो बाबा' हा आवाज कानावर पडतो... तेव्हा माझ्या धडधडणाऱ्या काळजाला शांतता मिळते. माझा जीव भांड्यात पडतो. ती सुरक्षित आहे हे समजलं, की मला या रिकाम्या घरात रात्रीची शांत झोप लागते."
समीराचे हात थरथर कापू लागले. तिने पुढचे पान पलटले. ती त्याच तारखेची नोंद होती, ज्या दिवशी तिने आप्पांना फोनवर रागावून सुनावले होते.
"आज माझ्या मुलीने मला फोन करू नको असं सांगितलं. तिला माझ्या प्रेमाचा आता त्रास होतोय. तिचं बरोबर आहे, ती आता मोठी झालीये. मी आजपासून तिला कधीच कॉल करून त्रास देणार नाही. पण... आता रात्रीची झोप कशी येणार? तिचा आवाज ऐकल्याशिवाय मला श्वास घेता येत नाही."
समीराच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिने वेड्यासारखा आप्पांचा तो जुना मोबाईल हातात घेतला आणि त्याचा 'कॉल लॉग' (Call History) उघडून पाहिला.
मोबाईलची स्क्रीन बघताच समीराने एक भयंकर मोठी किंकाळी फोडली आणि ती जमिनीवर कोसळली!
गेल्या सहा महिन्यांत... ज्या दिवशी तिने आप्पांना ओरडले होते त्या दिवसापासून ते काल आप्पा जाईपर्यंत... रोज रात्री बरोबर १०:०० वाजता आप्पांनी समीराचा नंबर डायल केला होता! पण तो फोन 'रिंग' होण्याआधीच अवघ्या दोन सेकंदात त्यांनी तो 'कट' केला होता.
ती रोज रात्री आपला नंबर डायल करायचे, मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारा समीराचा फोटो बघायचे, आणि फोन लागण्याआधीच कट करायचे... जेणेकरून समीराला त्रास होऊ नये! पण स्वतःच्या एकटेपणाशी लढताना, फक्त नंबर डायल करून ते स्वतःच्या काळजाची समजूत काढत होते.
समीरा ढसाढसा रडत होती. ती उशीला घट्ट मिठी मारून ओरडत होती, "मला माफ करा बाबा! मी खूप स्वार्थी आहे. मला वाटायचं तुम्ही माझ्यावर 'कंट्रोल' ठेवण्यासाठी फोन करताय, पण तो फोन माझ्यासाठी नव्हता... तो तुमच्या स्वतःच्या जगण्यासाठी होता! बाबा, प्लीज मला एक कॉल करा... मला तुमचा आवाज ऐकायचाय!"
पण आता रात्रीचे १० वाजून गेले होते, आणि समीराचा फोन पुन्हा कधीच वाजणार नव्हता. #🎭Whatsapp status