भवरखेडे येथे मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी शेतात शिरले;
कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान; शेतकरी आर्थिक संकटात
धरणगाव : तालुक्यातील भवरखेडे येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे भवरखेडे परिसरातील नदी-नाल्यांना पूर आला असून नदी काठावर शेत असलेले शेतकरी युवराज बन्सी माळी व रमेश धुडकू पाटील यांच्या शेतात नदीचे पाणी थेट शेतांमध्ये शिरल्याने या शेतकऱ्यांच्या उभ्या कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके अनेक तास पाण्याखाली राहिल्याने कापूस झाडांचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात लक्षणीय घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
यावर्षी चांगल्या पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी कर्ज काढून तसेच स्वतःची बचत खर्च करून बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत, पेरणी व तणनियंत्रण यावर मोठा खर्च केला होता. वेळोवेळी शेतीची निगा राखून पीक जोमात आणले होते. मात्र, अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर येऊन पाणी शेतात घुसल्याने काही तासांतच मेहनतीवर पाणी फिरल्याची भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
पूराचे पाणी ओसरल्यानंतर शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून अनेक ठिकाणी कापसाची झाडे आडवी पडली आहेत. काही ठिकाणी मुळे कुजण्यास सुरुवात झाली असून दीर्घकाळ पाणी साचून राहिल्यास पिकांवर विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित तलाठी जीवन कुमार खोकले व कोतवाल महेंद्र पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली असून पुढील आदेश आल्यावर तात्काळ पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. शासनाच्या निकषांनुसार नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचा संपूर्ण अहवाल शासनाचे आदेश आल्यानंतर तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकरी युवराज बन्सी माळी व रमेश धुडकू पाटील यांनी आपल्या झालेल्या नुकसानीची व्यथा तलाठी जीवन कुमार खोकले यांच्यासमोर मांडली.
परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात नदीचे पाणी शिरल्याने केवळ कापूसच नव्हे तर इतर खरीप पिकांनाही फटका बसल्याचे चित्र आहे. आधीच वाढलेला शेतीचा खर्च आणि आता झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई जाहीर करावी, पीकविमा योजनेंतर्गत नुकसानभरपाई लवकर मिळावी तसेच विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना त्वरित मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
#SanataSarthiNews #news #breaking news #Jalgaon District #🌾शेती आणि व्यवसाय⚙